RSS

Category Archives: दिर्घकथा

डायरी – एक रहस्यमय प्रेमकथा

————————————————– भाग १ ————————————————–

आई.. आई.. आयई ग्ग..!! शमीन’ने एक कचकचून आळस दिला. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ट्रींग ट्रींग.. ठप्प.. वाजणारा अलार्म बंद केला आणि ताडकन उठून दोन्ही हात गर्र्कन फिरवत आळस झटकून दिला.
“अरे आजकाल काय चालू आहे तुझे? रोज वेळेवर उठतोस”, आई कौतुकानेच म्हणाली.
“अग, सांगितले ना, हल्ली नियम खूप कडक झालेत, त्यात नवीन बॉस आलाय, जावे लागते ग मग अश्यावेळी काही दिवस वेळेवर.” सहजपणेच शमीन’ने उत्तर दिले.
पण शेवटी त्याचीच आई ती. त्याला पुरते ओळखून होती. नेहमी अर्धवट झोपेत तयारी करणारा आपला चिरंजीव आजकाल उड्या मारत ऑफिसला जातो, तयारी करायला जरा उशीर झाला की आता पुढची बांद्रा लोकलच पकडेन असे बोलून खुशाल आणखी अर्धा तास लेट करणारा हा दिवटा हल्ली गरम चहा सुद्धा घाईघाईत ढोसतो पण ७.४५ ची ट्रेन काही चुकवत नाही, यामागे काहीना काही भानगड आहे हे समजन्याएवढी नक्कीच हुशार होती. अर्थात शमीन सुद्धा काही कमी चलाख नव्हता. म्हणतात ना, की एक खोटे लपवायला शंभर खोटे बोलावे लागतात, शमीन हजार बोलायचा, पण बेट्याला आजपर्यंत कधी अजीर्ण झाले नव्हते. मारलेली प्रत्येक थाप पचवून जायचा. पण यावेळी मात्र त्याचा चेहरा त्याची साथ देत नव्हता. एखादी थाप मारताना जे निर्ढावलेले भाव चेहर्‍यावर लागतात, ते ठेवायची कला कुठेतरी हरवून बसला होता. स्वारी प्रेमात जी पडली होती. आता कितव्यांदा हे विचारू नका, पण दरवेळीप्रमाणे यावेळी सुद्धा त्याला खात्री होती की हीच आहे ती अप्सरा, गुलबकावली, बहारों की मलिका. काहीही झाले तरी ही मिळालीच पाहिजे. एकदा हिने होकार दिला की हिच्याशी लग्न करायचे आणि आपला राजाराणीचा संसार थाटायचा. तसेही पोरी पटवने, त्यांना फिरवणे, आणि मग लग्नाचा विषय निघाला की टांग देणे हे त्याच्या स्वभावातच नव्हते. तसे असते तर त्याच्यासारख्या M.E.M.B. मुलाच्या, म्हणजे त्याच्याच भाषेत “Most Eligible Marathi Bachelor” मुलाच्या आजतोवर पाच-सहा गर्लफ्रेन्ड तरी नक्की झाल्या असत्या. पण मुली पटवण्यासाठी छान दिसणे, स्टायलिश वागणे, हुशार, सर्वगुणसंपन्न आणि निर्व्यसनी असणे पुरेसे नसते. इथे गरज असते ते त्यांच्याशी बिनधास्त बोलायची. आणि नेमकी इथेच शमीन’ची बोंब होती. मुलांशी बोलताना तो एकदम बोलीबच्चन अमिताभ बच्चन असायचा पण मुली समोर आल्या की मात्र त्याचा अमोल पालेकर व्हायचा. या बाबतीत तो एकदम लाजरा होता. तोंडातून साधा एक शब्दही फुटायचा नाही. आणि जगात अशी एकही लवस्टोरी नसेल की ज्यात अधेमधे काहीही न बोलता मुलगा मुलीला ‘आय लव्ह य़ु’ म्हणाला आणि तिने त्याला होकार दिला. तरीही आपल्या बाबतीत असेच काहिसे होईल या भाबड्या आशेवर शमीन पुन्हा एकदा एकीत गुंतला होता.

७.४५ ची ट्रेन ७.४७ ला आली. मुंबईमध्ये याला दोन मिनिटे उशीरा आली असे बोलतात. आणखी एखादा मिनिट उशीर झाला असता तर कदाचित त्याची माहीमवरून कनेक्टेड ८.०७ ची बोरीवली चुकली असती आणि त्या दोघांची चुकामुक झाली असती. तसे ती या ट्रेनला असतेच असे नाही पण याबाबत शमीनला कसलाच धोका पत्करायचा नव्हता, कारण एखादा दिवस जरी ती दिसली नाही तरी आयुष्यातील एक दिवस फुकट गेला असे त्याला वाटायचे. हे दिसणे म्हणजे तरी काय.. जेमतेम पंधरा मिनिटांचा खेळ होता, पण तिचे ते दर्शन, ती हलकीशी झलक, दिवसभरासाठी त्याला ताजेतवाणे करून टाकायची. तिचा प्रसन्न चेहरा नजरेस पडला की त्याला असे वाटायचे, की आहा..! आता खरी सकाळ झाली..!

माहीमच्या आधी ती कुठे चढते, कुठे राहते हे शमीनला आजवर माहीत नव्हते. त्याला तिचे दर्शन व्हायचे ते थेट कांदिवली स्टेशनलाच. चुकामुक होऊ नये म्हणून तो लवकरात लवकरची ट्रेन पकडून, वेळेच्या १५-२० मिनिटे आधीच पोहोचून, स्टेशनबाहेर तिची वाट बघत उभा राहायचा. आजही तसाच ताटकळत उभा होता, एका आडोश्याला, कोणी ऑफ़िसमधील बघू नये या भीतीने. खरे तर भिती अशी त्याला कोणाच्या बापाची नव्हती किंवा कोणी पाहिले आणि विचारले, इथे काय करतो आहेस तर उगाच ओशाळल्यासारखे होईल, असेही काही नव्हते. पण तरीही त्याला या विषयाची चर्चा व्हायला नको होती. म्हणून ही काळजी..

इतक्यात ती येताना दिसली… हजारोंमध्ये.. अगदी हजारोंमध्ये नसले तरी लेडीज डब्यातून बाहेर पडणार्या शंभर-एक बायकापोरींच्या थव्यात तरी तो तिला नेमके हुडकायचा.

आजही तेच झाले. जशी ती आली तसा तो लगोलग तिच्या मागे जाऊन बसच्या रांगेत उभा राहिला. असे करणे भाग होते कारण त्या दोघांच्या ऑफिसला जाणार्‍या दोन कॉमन बस होत्या आणि दोन्हींच्या रांगा वेगळ्या होत्या. जी बस आधी येईल ती बस पकडायची. पण ‘ती’ मात्र बर्‍याचदा गर्दी बघून एखादी बस सोडून द्यायची. त्यामुळे शमीन नेहमी तिच्या मागेच उभा राहून ती ज्या बस मध्ये चढायची तीच बस पकडायचा. आजही अगदी तिच्या मागेच उभा होता. जवळपास कोणी ऑफिसमधील बघत तर नाही ना म्हणून एक नजर फिरवली तर नेमका सौरभ नजरेस पडला.

सौरभ हा त्याच्याच ऑफिसचा. दोनेक महिन्याभरापूर्वीच जॉईन झाला होता. तो सुद्धा रोज याच मार्गाने प्रवास करायचा. पक्का बी.बी.सी. न्यूज होता. एखादी गोष्ट त्याला समजली की गावभर पसरलीच म्हणून समजा. त्यामुळे त्याला आपले हे प्रकरण समजू नये याची काळजी घेणे शमीनच्या दृष्टीने गरजेचे होते.
इतक्यात सौरभनेच शमीनला हाक मारली, “ए शम्या..” जसे शमीनने त्याच्याकडे पाहिले तसे त्याने नजरेनेच एक इशारा केला, ज्याचा अर्थ होता की काय मस्त आयटम उभी आहे रे तुझ्या पुढे… आणि नेमके शमीनच्या दुर्दैवाने तिने हे पाहिले. तिच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून शमीनला समजले की ती काय समजायचे ते समजली आहे. शमीनची आता परत तिच्याकडे बघायची हिम्मत काही झाली नाही. त्यानंतर मग पुढच्या पंधरा मिनिटांच्या बसच्या प्रवासात तिनेही त्याच्याकडे पाहिले नाही. तसेही कुठे रोज बघत होती म्हणा. एकतर्फीच तर होते हे प्रेम. अजूनपर्यंत तिला त्याचे हे असे आपल्या मागे मागे फिरणे समजले आहे की नाही याचीही त्याला खबर नव्हती. त्याचे अस्तित्व तरी तिला जाणवले आहे की नाही याचीही खात्री नव्हती. आणि त्याला तरी कुठे काय माहित होते तिच्याबद्दल, हेच की रोज त्याच्याबरोबर बसने प्रवास करते, त्याच्या ऑफिसच्या पुढच्या स्टॉपला कुठेतरी उतरते. तिथे ती कुठे कामाला आहे, काय काम करते, अजून पावेतो काहीच ठाऊक नव्हते. पण तरीही ती संध्याकाळी सहा-सव्वासहाच्या बसला असते हेच त्याच्यासाठी पुरेसे होते… अरे हो… तिचे नाव… ते राहिलेच… गेले २०-२५ दिवस शमीन तिच्या पाठी होता पण अजून तिचे नाव जाणून घेण्यात देखील त्याला यश मिळाले नव्हते. खरे सांगायचे तर त्याला याची बिलकुल घाई नव्हती. आपल्या नशीबात जी मुलगी असेल ती आपल्याला हातपाय न झाडता मिळणार, कारण जोड्या तर वर स्वर्गातच जुळल्या असतात, उलट झगडून विधीलिखित बदलायला गेलो तर उगाच नको ती मुलगी गळ्यात पडायची, असा काहीसा जगावेगळा फंडा होता त्याचा.

ऑफिसमध्ये पोचल्यावर सौरभ समोर आला तश्या चार शिव्या घालाव्या असे शमीनच्या मनात आले. पण त्याने भावनेला आवर घातला. कारण तिच्याबद्दल काही कोणाला सांगायचे नव्हते वा कोणाचे काही ऐकायचे नव्हते. तसे एखाद्या जवळ मन मोकळे करावे, तिच्याबद्दल तासनतास गप्पा माराव्यात असे त्याला बर्‍याचदा वाटायचे. बरेच काही यायचे मनात, कुठेतरी ते खाली करणे गरजेचे होते. पण कुणाजवळही मन मोकळे करावे असा हा विषय नव्हता. किंबहुना त्यालाच तो चर्चेचा, थट्टेचा विषय बनवायचा नव्हता. ऐकणार्यालाही त्या भावनांची कदर असने गरजेचे होते. सहज त्याच्या मनात आले की का नाही मग डायरी लिहायची. सारे काही जे हृदयाच्या कप्प्यात साठवून ठेवले आहे ते कोर्‍या कागदावर रिते करायचे. स्वताच लिहायचे, स्वताच वाचायचे. आपल्यापेक्षा प्रकर्षाने त्यातील भावना कुणाला उमजणार होत्या. ठरले तर मग. एवढे दिवस ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पडून असलेल्या डायरीवरची धूळ झटकली. त्यावरचे साल पाहिले तर “२०१०”. क्षणभर स्वताशीच हसला. दोन वर्षांपूर्वीची होती. आजवर कधी त्याने कामाच्या निमित्तानेही डायरी लिहिणे हा प्रकार केला नव्हता आणि आज चक्क दैनंदिनी लिहायला घेणार होता. पण ही दैनंदिनी जरा अनोखी असणार होती. यातील प्रत्येक शब्दात, प्रत्येक वाक्यात फक्त ती, ती आणि तीच असणार होती. तिचे दिसणे, तिचे हसणे. तिचे बोलणे, तिचे वागणे, तिचे आपल्या आयुष्यात असणे… अजून एकही शब्द लिहिला नव्हता पण तरीही त्याला मनात आतून कुठेतरी वाटत होते की एक अमरप्रेमकहानी जन्मास येणार आहे.

……………………………………………………………………………………………………

आज सोमवार. मध्ये दोन दिवस शमीनला सुट्टी असल्याने आणि आदल्या शुक्रवारी ती न दिसल्याने आज दिसावी अशी उत्सुकता जरा जास्तच होती. सुदैवाने ती जास्त ताणली गेली नाही. पहिल्याच ट्रेनला तिचे दर्शन झाले. आज ती देखील लवकर आली होती. फिकट बदामी रंगाच्या ड्रेसमध्ये ती काहीतरीच झकास आणि लाजवाब दिसत होती. केस मोकळे सोडले होते, कदाचित धुतले असावेत. बसच्या रांगेला आज फारशी गर्दी देखील नव्हती. शमीन तिच्या मागोमाग जाऊन उभा राहिला.. नेहमीसारखाच.. पण आज मात्र तिच्या केसांचा वास त्याला मोहरून टाकत होता. सकाळचे कोवळे उन आणखी कोवळे वाटू लागले होते. जणू नुकतीच पहाट झालीय आणि तो तिच्या केसांची चादर अंगावर ओढून उबदार बिछान्यात पहुडलाय. बाहेर येण्याची इच्छाच वाटत नाहिये. इतक्यात रांग पुढे सरकली आणि तिने आपल्या मानेला असा काही झटका दिला की तिच्या अर्धवट सुकलेल्या केसांत तो पुरता न्हाऊन निघाला. पण दुसर्‍याच क्षणी भानावर आला. रांग पुढे निघून गेली होती. अश्यावेळी आपल्या चेहर्‍यावरचे भाव कोणी पाहिले तर नाही ना म्हणून सहज आजूबाजूला नजर टाकली तर नेमका सौरभ हसताना दिसला. तो शमीनसाठी लकी होता की पनवती होता देवास ठाऊक पण आजच्या डायरी मध्ये त्याचा उल्लेख करणे शमीनला भाग होते. त्याने ठरवलेच होते मुळी. जे काही, जसे काही घडेल, ते जराही काटछाट न करता लिहायचे. त्याक्षणी मनात येणारे सारे विचार भले हास्यास्पद वाटले तरी प्रामाणिकपणे कागदावर उतरवायचे. वर्षभराने परत कधीतरी ते पान वाचताना त्या शब्दांतील उत्कटता आपल्याला तेव्हाही तितकीच जाणवली पाहिजे.

ऑफिसमध्ये पोहोचल्यावर शमीनने नेहमीच्या शिरस्त्यानुसार काल संध्याकाळी तसेच आज सकाळी काय काय घडले ते लिहायला घेतले. एखादा तपशील चुकला किंवा भावना योग्य शब्दात मांडता आल्या नाहीत तर तीच ओळ तो पुन्हा लिहायचा पण आधी लिहिलेले काही खोडायचा नाही. कधी पुढचे मागे व्हायचे, मागचे पुढे जायचे, सारा घटनाक्रम उलटसुलट व्हायचा. वाक्यरचना तर अगदी चौथीतल्या मुलासारखी असायची. पण त्याला याच्याशी घेणेदेणे नव्हते. तो काही नामवंत लेखक नव्हता की ही एखादी कादंबरी नव्हती जी त्याला प्रकाशित करायची होती. ज्या वेगाने विचार डोक्यात यायचे त्याच वेगाने तो ते लिहून काढायचा, अक्षराची पर्वा नव्हती. कधी पाच मिनिटात संपायचे तर कधी वीस-वीस मिनिट लिहीत राहायचा, तर कधी अर्धा तास काय लिहावे हे सुचण्यातच जायचा. पण आज सकाळचा अनुभव मात्र जितके लिहावे तितके कमी असा होता. अगदी गुंग होऊन त्याचे लिखाण चालू होते. कधी सौरभ त्याच्या पाठीशी येऊन उभा राहिला हे त्याला समजलेच नाही. जाणवले तसे दचकून वळला तर पाहिले की सौरभ वाचायचा प्रयत्न करत होता. हो प्रयत्नच.., कारण शमीनचे कोंबडीचे पाय वाचने एवढी साधी सोपी गोष्ट नव्हती. तरीही सौरभला त्यात आपले नाव दिसलेच. त्यामुळे नक्की काय लिहिले आहे हे जाणून घ्यायची त्याची उत्सुकता स्वाभाविकपणे चाळवली गेली. ‘जगात तूच एक सौरभ आहेस का?’ असा नेहमीचा बाळबोध युक्तीवाद करून शमीनने वेळ तर टाळून नेली, पण आता ही डायरी इथे ऑफिसमध्ये ठेवणे सुरक्षित नाही म्हणून त्याने आजच घरी न्यायची ठरविले.

……………………………………………………………………………………………………

शमीनने डायरी लिहायला घेऊन आज १५-१६ दिवस झाले होते. पण अजूनपर्यंत आदल्या दिवशीची डायरी काही त्याने वाचली नव्हती. त्याला वाटायचे की आधीचे वाचले तर पुढच्या लिखाणावर त्या विचारांचा प्रभाव पडेल आणि रोजच्या विचारांशी प्रामाणिक राहणे जमणार नाही. पण अखेर न राहवून आज रविवारचा मुहुर्त साधून त्याने ती वाचायला घेतलीच.

६ जुलै २०१२ – मंगळवार
आज डायरी लिहायचा पहिलाच दिवस… दिसली ती.. आज सकाळीच… गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता… मला जराही आवडत नाही हा रंग… खासकरून स्वताला घालायला… पण तिला किती मस्त दिसत होता… जणू काही एखादे टवटवीत गुलाब… तिच्याकडे पाहून मला स्वताला फ्रेश झाल्यासारखे वाटले… संध्याकाळी मात्र पत्ता नव्हता तिचा कुठे… तिच्या स्टॉपवरून येणार्‍या प्रत्येक बसमध्ये डोकावून पाहिले… पण ती कुठेच दिसली नाही…

७ जुलै २०१२ – बुधवार
आज जरा लेट आली ती… अजून एखादी ट्रेन लेट आली असती तर फुकट मला लेट मार्क लागला असता तिच्या नादात…. आज तिने निळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर आकाशी रंगाचा शॉर्ट सदरा घातला होता… खास म्हणजे डोळ्यावर.. अंह.. डोक्यावर.. गॉगल देखील चढविला होता… प्रत्येक पेहराव किती सूट होतो ना तिला… रोज सलवार कुर्ता आणि पंजाबी ड्रेस घालून येणारी आज या गेटअप मध्ये खूप मॉडर्न आणि डॅशिंग वाटत होती.. आज नुसता खालपासून वरपर्यंत न्याहाळत होतो मी तिला… संध्याकाळी देखील दिसली आज… सकाळचा तिचा ड्रेस आणि तिचे रुपडे डोळ्यात एकदम फिट्ट बसले असल्याने बसमध्ये डोकावताच ती नजरेस पडली… धावत जाऊन बस पकडली… असे वाटले की कदाचित तिला जाणवले असावे की रोज एक मुलगा बसमध्ये डोकावून बघतो आणि आपण नजरेस पडल्यावर पटकन बस पकडतो.. तिने मागे वळून पाहिलेही की मी कुठे बसलो ते.. निदान मला तरी तसे वाटले की ती मला बघायलाच वळली असावी… काही का असेना… तिने माझ्या अस्तित्वाची नोंद घेतली ही जाणीव खरेच सुखावणारी होती…

९ जुलै २०१२ – शुक्रवार
आज सकाळी कुठेच दिसली नाही.. लवकरच्या ट्रेनला आली असावी का.. की लेट आली असावी.. निदान आली तरी असावी का..?? … नाहीतर मग संध्याकाळीदेखील दिसणार नाही… फुकट लेट मार्क पण झाला… सोनालीला सांगून पंच टाईम अ‍ॅडजस्ट करून घ्यावा लागणार आता… आलीच नसावी आज.. हो नव्हतीच आली… संध्याकाळी पण दिसली नाही.. शुक्रवारीच का असे व्हावे…?? … आता परत दोन दिवस सुट्टी आहे…

सोमवारची तर जवळपास दीड-दोन पाने भरली होती. त्यादिवशी दिसतच अशी होती ना की तिच्या वर्णनातच एक पान खर्ची पडले होते. पुन्हा पुन्हा शमीन ते वाचतच होता. तसाच्या तसा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. जणू कालच घडला होता. डायरी लिहायच्या कल्पनेचे चीझ झाल्यासारखे वाटून स्वताच स्वताची पाठ त्याने थोपटवून घेतली.

१४ जुलै २०१२ – बुधवार
आज पुन्हा गुलाबी रंगाच्या ड्रेस मध्ये होती… पण आजचा ड्रेस वेगळा होता… आधीच्यापेक्षा फिकट शेड होती… किती वेगवेगळे ड्रेस होते तिच्याकडे… अजूनपर्यंत एकही रिपीट केलेला आठवत नव्हते… मलाच मग माझी लाज वाटू लागली.. महिनाभर आलटून पालटून दोनच पॅंट… शर्ट काय तो बदलून बदलून वापरतो मी..

१५ जुलै २०१२ – गुरुवार
आज बस मध्ये मागे खूप गर्दी होती… पुढे महिलांच्या जागा मात्र बर्यापैकी खाली होत्या… तरीही काही बायका तिथे बसायच्या सोडून मागे आमच्या जागा का उगाच अडवतात..?? डोक्यात जातो हा प्रकार… उगाच उभे राहायला लागते अश्यावेळी… तिच्या बाजूला देखील जागा खाली होती… पण तिथे बसायचे धारिष्ट्य कोण दाखवणार…?? साधा तसला विचार देखील मनात आणायची हिंमत नव्हती माझ्यात… आणि कोणा महिलेने उठवले असते तर फुकट इज्जतीचा पंचनामा झाला असता… तेवढ्यात अपंगांची सीट खाली झाली… इथे बसायला हरकत नव्हती.. उभे राहण्यापेक्षा हे बरे… कोणी आलाच अपंग तर बघू असे म्हणून बसलो… पण ही सीट एकदम पुढे होती… इथून तिला बघायचे म्हणजे मागे वळावे लागणार होते… जे माझ्याच्याने शक्य नव्हते.. पण तिला मात्र मी पाठमोरा का होईना व्यवस्थित दिसत होतो… जर तिची बघायची इच्छा असेल तर…!! … पूर्ण प्रवास मी आज याच गोड समजात (की गैरसमजात?) पार पाडला, की तिचे डोळे माझ्यावर रोखले आहेत…

१६ जुलै २०१० – शुक्रवार
आज देखील ती दिसली नाही.. मागच्या शुक्रवारी देखील नव्हती… जाते कुठे ही शुक्रवारी…?? … संध्याकाळी दिसायची अपेक्षा नव्हतीच तरी सवयीने बसमध्ये डोकावून बघत होतो.. वेड्या आशेने… वेडीच ठरली..!

१९ जुलै २०१० – सोमवार
आज तर ती परी..अप्सरा..बहारोंकी मलिका वाटत होती.. पांढराशुभ्र वेष परिधान केला होता.. तिचे सगळे ड्रेस एकीकडे आणि आजचा एकीकडे.. तसे तर मला हे रोजच वाटायचे.. रोज ती मला वेगळीच भासायची.. आदल्या दिवशीपेक्षा वेगळी आणि जास्त सुंदर.. माझा स्टॉप आला तरी आज उतरावेसे वाटत नव्हते.. संध्याकाळी परत दिसली नाही तर.. आताच डोळे भरून बघून घ्यावे.. पण दिसली संध्याकाळी.. जेवढी फ्रेश सकाळी दिसत होती तेवढीच आताही.. नेहमीसारखा बसमधून उतरल्यावर तिच्या पाठी-पाठी स्टेशनपर्यंत गेलो.. ठराविक अंतर ठेऊन… बघता बघता ती प्लॅटफॉर्मवरच्या बायकांच्या घोळक्यात हरवून गेली.. त्यानंतर मात्र तिथे त्या दिशेने एकटक बघायची माझी कधी हिम्मत होत नाही… ट्रेन आली आणि तिला घेऊन गेली.. मी सुद्धा तीच ट्रेन पकडली.. पण तिला ट्रेनमध्ये चढताना शेवटपर्यंत बघून मगच धावत जाऊन पुरुषांच्या डब्ब्यात चढलो…

…………………
………….
…..

२० जुलै… २१ जुलै.. २२ जुलै…. ६ जुलैपासून २३ जुलैपर्यंतची सारी डायरी शमीनने वाचून काढली. वरवर पाहता प्रत्येक पानात प्रत्येक दिवसात एक आठवण लपली होती, पण सगळ्याचा एकत्रित विचार करता एकसुरीपणा जाणवू लागला होता. रोज तिचे येणे, न येणे, तिच्या कपड्यांचा रंग, तिची बसमध्ये बसायची जागा, सहज म्हणून तिची आणि त्याची नजरानजर होणे, संध्याकाळी परतताना पुन्हा तिच्याच बसमध्ये चढणे, स्टेशनपर्यंत तिचा पाठलाग करणे आणि शेवटी ती ट्रेनमध्ये चढेपर्यंत नजरेनेच तिला साथ देणे.. सारे काही तेच तेच.. बारीकसारीक तपशील काय तो थोडासा बदलायचा. उद्या आता परत असेच काहीसे घडणार होते आणि शमीन त्या परिस्थितीत पुन्हा तसेच काहीसे वागणार होता. आजवर त्याने याची पर्वा कधी केली नव्हती. म्हणजे आपल्या दोघांत काही घडलेच पाहिजे, ती आपल्याला लवकरात लवकर मिळालीच पाहिजे अशी काही त्याला घाई नव्हती. जे काही चालू होते त्यात तो खुश होता. तिला लांबूनच बघण्यात तो समाधानी होता. तिची एक झलक त्याला दिवसभरासाठी पुरेशी होती. रोज रात्री झोपताना उद्या सकाळी आपल्याला ती दिसणार आहे एवढीच जाणीव त्याला सुखावणारी होती. भले याला कोणी अल्पसंतुष्ट का म्हणेना पण हीच त्याची सुखाची व्याख्या होती.

पण….. मात्र…. आता….

या डायरीने त्याला वेगळा विचार करायला भाग पाडले होते. गेले पंधरा-वीस दिवस तो नियमित डायरी लिहित होता, ती अशी अचानक थांबवने त्याला जमणार नव्हते. आणि तेच तेच लिहिणे, तेच तेच वाचणे त्याला आवडेनासे झाले होते. आता यापुढे ही डायरी पर्यायाने आपली लवस्टोरी ईंटरेस्टींग होईल असे काही तरी झाले पाहिजे, असे काही तरी घडले पाहिजे असे त्याला आता वाटू लागले होते. उद्या असे झाले तर मजा येईल, उद्या तसे झाले तर किती छान, असा नुसता विचार करून तर ते घडणार नव्हते ना. रोज रात्री झोपायच्या आधी तो जे हे स्वप्नरंजन करायचा ते प्रत्यक्षात आता त्यालाच उतरवायचे होते. म्हटले तर अवघड होते पण अशक्य नव्हते. हळूहळू का होईना, आपले ध्येय निश्चित करून आता एकेक पाऊल टाकणे गरजेचे होते. याची सुरुवात आता उद्यापासूनच करायची असे त्याने पक्के ठरवले. उद्याच नव्हे तर येत्या काही दिवसात काय काय करायचे याची मनातल्या मनात उजळणी करतच तो झोपी गेला. पण खरेच शमीनला हे जमणार होते का हा प्रश्न अजूनही अनुत्तरीतच होता…

.
.

…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………

————————————————– भाग २ ————————————————–

…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………

.
.

आज बसमध्ये मागच्या बाजूला बसायला जागा असून देखील शमीन तिथे बसला नाही. मुद्दाम पुढे लेडिज सीटच्या जवळ जाऊन उभा राहिला. आज त्याला तिला केवळ लांबून बघायचे नव्हते तर तिचा सहवास अनुभवायचा होता. जसे पुढचे काही जण उतरले तसा तो आणखी थोडा पुढे सरकला, जेणे करून तिच्या नजरेच्या अगदी समोरच येईल. पण तिचे त्याच्याकडे जराही लक्ष नव्हते.

“काय त्या खिडकीच्या बाहेर बघतेय देव जाणे. रोज रोज तोच रस्ता तर बघायचा आहे ना, मग आज जरा आत बघ, कोण उभा आहे तुझ्यासमोर ते…” शमीनचे स्वताशीच विचार चालू होते.

रोज मागच्या सीटवरून बघतानाही ती आपल्या जवळच कूठेतरी असल्यासारखे त्याला वाटायचे. पण आज तिच्या समोर उभा राहून देखील दोघांमधील अंतर त्याला जास्त जाणवत होते. क्षणभर वाटले, का इथे असे आपण वेड्यासारखे ताटकळत उभे आहोत, मागे जाऊन गप बसून घ्यावे. पण पाय काही हलत नव्हते. त्याने मनोमन पक्के ठरवले होते की काही घडत नसेल तर घडवायचे. कसेही करून तिचे लक्ष आपल्याकडे वेधायला हवे, नाहीतर काही मिनिटातच आपला स्टॉप येईल आणि…. त्याची विचारचक्रे फिरू लागली… आणि एकाएकी त्याला काहीतरी सुचले.. येस्स.. पटकन त्याने खिशातून मोबाईल काढला आणि रिंगटोन सिलेक्ट करायच्या बहाण्याने एकदोन टोन मोठ्या आवाजात वाजवल्या. सोपीशीच युक्ती, पण कामी आली. तिचे लक्ष गेले. आजची त्यांची ही नजरानजर क्षणभरापेक्षा जास्तच होती. त्यानंतरही तिने त्याच्याकडे २-३ वेळा पाहिले. आज पहिल्यांदा त्याने काहीतरी ठरवून केले होते, आणि ते मनासारखे घडले होते. छोटासाच का असेना हा त्याचा पहिला विजय होता. आज डायरी मध्ये काहीतरी वेगळे लिहायला मिळेल म्हणून स्वारी खुश झाली. संध्याकाळी देखील घरी जाताना आता मागे न बसता तिच्या जवळ उभे राहायचे असे त्याने ठरविले. एवढे दिवस मी तुझ्या मागे आहे, तुला बघण्यासाठी रोज सकाळी लवकर उठतो, तुझ्या वाटेवर डोळे लावून रोज सकाळ संध्याकाळ ताटकळत बसतो याची तिला जाणीव करून देणे हे त्याचे पहिले उद्दीष्ट होते. मग पुढे तिचा प्रतिसाद कसाही असेल, त्याला आता याची फिकिर नव्हती. पण दुर्दैवाने संध्याकाळी ती दिसलीच नाही…

सकाळी रोज दिसते पण मग संध्याकाळी नियमितपणे का दिसत नाही? कधी दिसते कधी नसते… तिची ऑफिस सुटायची वेळ बदलत असावी का सारखी?? की ओवरटाईम करते..?? या प्रश्नांचा छडा आता त्याने लवकरच लावायचे ठरवले.

पुढच्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे स्टेशनबाहेर तो तिची वाट बघत उभा होता. समोरून ती येताना दिसली. पण आज ती एकटी नव्हती. तिच्याबरोबर तिची एक मैत्रीण देखील होती. दोघींच्या बोलण्याचालण्यावरून असे वाटत होते की त्या दोघी जुन्या मैत्रीणी असाव्यात. बसच्या रांगेत उभा राहून तो त्यांचे बोलणे ऐकायचा प्रयत्न करू लागला. ती तिची खास मैत्रीण होती. दोघी नेहमी एकत्रच प्रवास करायच्या. एवढे दिवस ती शमीनला कधी दिसली नव्हती कारण बाळंतपणाच्या मोठ्या सुट्टीवरून आजच परत आली होती. दोघींच्या बोलण्यात देखील हाच विषय चालू होता. तेवढ्यात बस आली आणि तिच्या मैत्रीणीने तिला हाक मारायला म्हणून तिचे नाव पुकारले, तसे शमीनचे कान टवकारले गेले. नक्की काय म्हणाली ती, “चल अमू.. बस आली..”. अमू..?? की आणखी काय..?? असे कसे नाव..?? ऐकण्यात तर काही चूक झाली नाही ना.. इतक्यात पुन्हा एक हाक कानावर पडली. अमू… हा अमूच होते. अमू.. अमू.. अमृता.. हेच नाव पहिले डोक्यात आले. तसेही काय फरक पडत होता, अमृता असो वा अस्मिता.. शमीनसाठी ती आजपासून त्याची अमूच होती.

आज बसमध्ये फार गर्दी होती. बसायला जराही जागा नव्हती. तसेही शमीनला बसण्यात ईंटरेस्ट कुठे होता. पुढे जाऊन तो त्यांच्या मागेच उभा राहिला. आज तिलाही बसायला मिळाले नव्हते. दोन मैत्रिणी बर्‍याच दिवसांनी भेटल्या होत्या. तूफान गप्पा चालू होत्या. आज पहिल्यांदा तिचा आवाज त्याच्या कानावर पडत होता. अमृतासारखाच गोड आवाज, आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सुस्पष्ट उच्चार. एखाद्याच्या बोलण्याचा पद्धतीवरून तसेच शब्दांच्या उच्चारावरून त्याच्या सुशिक्षित आणि सुसंस्कृतपणाचा अंदाज बांधता येतो असे म्हणतात. शमीन मनोमन सुखावला होता, आपली निवड काही चुकली नाही असे त्याला वाटू लागले. असेही त्याने आपल्या या आकर्षणाला प्रेम हे नाव दिलेच होते. तेच प्रेम आता आणखी गहिरे झाले होते.

बोलताना तिने एकदोनदा मागे वळूनही पाहिले. दोनच दिवसाच्या प्रयत्नात शमीनचे अस्तित्व तिला जाणवू लागले होते, ही आजची आणखी एक जमेची गोष्ट होती.

आजच्या डायरीत लिहिण्यासारखे बरेच काही होते. कारण आज त्या दोघींमधील संभाषणामुळे शमीनला बर्‍याच नवीन गोष्टी समजल्या होत्या. स्मिता, तिची मैत्रीण. दोघी कॉलेजपासूनच्या मैत्रीणी होत्या. शमीनच्या ऑफिस जवळच्या एका औषधांच्या कंपनीमध्ये कामाला होत्या. नक्की काय काम करत होत्या हे त्याला समजले नाही, पण जेवढे शमीनचे थोडेथोडके ज्ञान होते त्यांच्या क्षेत्राबद्दल त्यावरून त्या Quality Assurance डिपार्टमेंटमध्ये असाव्यात असा अंदाज त्याने बांधला. राहायला देखील दोघी जवळपास एकाच एरीयात असाव्यात, म्हणजे आजपासून त्यांचे जाणे-येणे ही एकत्रच होणार होते. थोडक्यात ही स्मिता शमीनच्या प्रेमकहाणीतील एक मुख्य सहाय्यक पात्र आणि साक्षीदार होणार होती. त्यामुळे तिची नोंद तर डायरीत खासच होती. शमीनचे पुढचे टारगेट आता तिची मैत्रीण स्मिताच होती. अमृताच्या आधी हिच्या मनात स्वताची चांगली इमेज तयार करणे गरजेचे होते. कारण या खास मैत्रीणी पत्त्यांच्या डावातील जोकरसारख्या असतात. या डाव बनवू ही शकतात आणि मनात आणले तर बिघडवू ही शकतात.

पुढचे चार-पाच दिवस विशेष असे काही घडले नाही, पण मागच्यापेक्षा रूटीन नक्की बदलले होते. हल्ली शमीन बसमध्ये नेहमी तिच्या जवळ जाऊन उभा राहायचा. भले मग मागे बसायला जागा रिकामी असली तरी पुढेच जायचा. आणि तिला हे जाणवल्याशिवाय राहिले नव्हते. कदाचित तिच्या मैत्रिणीने, स्मिताने देखील हे हेरले होते. पण चेहर्‍यावरून त्या दोघी तसे काही दाखवत नव्हत्या. बहुतेक रोडसाईड रोमिओंना हाताळायची मुलींची हीच पद्धत असावी. “रोडसाईड रोमिओ”… त्या आपल्याला देखील असेच काही समजतात का..? असा विचार शमीनच्या मनात आल्याशिवाय राहिला नाही. आणि का नसावे? एखाद्याच्या चेहर्‍यावर तर लिहिले नसते ना की तो एका चांगल्या घरातील सुशिक्षित मुलगा आहे. आणि कपड्यांचे म्हणाल तर आजकाल सारेच चांगले आणि स्टायलिश घालतात. म्हणून आता शमीनला तिला आपला खराखुरा स्टॅंडर्ड दाखवायची गरज भासू लागली होती.

शमीन हा स्वता मुंबईतील नावाजलेल्या अभियांत्रिकी कॉलेजमधून पदवी घेऊन नुकताच बाहेर पडलेला एक सिविल ईंजिनीअर होता. त्यांच्या क्षेत्रातील एका प्रथितयश स्ट्रक्चरल कन्सल्टंसी मध्ये सहा-एक महिन्यापूर्वी जॉबला लागला होता. पण बाहेरून पाहता त्यांची कंपनी कुठल्याही अ‍ॅंगलने एक ईजिनिअरींग फर्म वाटत नव्हती. याला कारण होते ते त्यांच्या ऑफिसच्या इमारतीच्या ग्राऊंड फ्लोअरवर असलेले एक टाईल्स कंपनीचे गोडाऊन, आणि दोघांचे मिळून सामाईक असे भलेमोठे जुनाट लोखंडी प्रवेशद्वार. कधी तिने बसमधून शमीनला त्या प्रवेशद्वाराच्या आत जाताना पाहिले असते तर तिला नक्कीच असे वाटले असते की हा या गोडाऊनमध्येच स्टोअरकीपर म्हणून कामाला असावा. त्यामुळे आता स्वताबद्दलची जुजबी पण महत्वाची अशी माहिती तिच्यापर्यंत पोहोचवणे गरजेचे होते जसे त्याला तिच्याबद्दल तिच्या मैत्रीणीशी चालू असलेल्या गप्पांमधून समजले होते. जरी सौरभ त्याच्याबरोबर याच मार्गाने प्रवास करत असला तरी या कामासाठी त्याला विश्वासात घ्यायचे म्हणजे तिच्याबद्दल खरे काय ते सांगायचे जे शमीनला मंजूर नव्हते. आणि पूर्वकल्पना न देता त्याचा वापर करणे तर आणखी धोकादायक होते कारण तो बोलताना कधी काय पचकेल याचा नेम नव्हता. म्हणून शमीनने एक अभिनव शक्कल लढवली. स्वताच खोटा खोटा फोनकॉल करायचा, किंवा आला आहे असे दाखवायचे आणि समोर कोणीतरी मित्र बोलत आहे असे भासवून जे तिच्यापर्यंत पोहोचवायचे आहे ते फोनवर बोलायचे. अर्थात अशी खुफियापंक्ती करण्यात शमीन एक्सपर्ट होता. काहीही तयारी न करता अर्धा-एक तास तरी आरामात फोनवर नॉनस्टॉप नॉनसेन्स फेकाफेकी करेन एवढा स्टॅमिना होता त्याच्यात. पण इथे काहीही निरर्थक बडबड करायची नव्हती तर योग्य तेवढेच मोजक्या शब्दात बोलायचे होते आणि ते ही तिच्याजवळ उभे राहून. इथेच खरी गोची होती. तिच्यापुढे बोलताना आपली नक्कीच फाफलणार हे माहीत असल्याने मग शमीनने प्लॅन थोडासा चेंज करून तिच्या मैत्रीणीबरोबर ही ट्रिक वापरून तिच्यामार्फत हे सारे पोहोचवूया असे ठरवले.

पहिल्यांदा शमीन प्रेमात हे असे काही पाऊल उचलणार होता. त्याच्यासाठी हे एक मिशनच होते म्हणा ना. “ऑपरेशन फोनकॉल.”

काय काय बोलायचे आहे हे मुद्दे ठरवून घेतले. आपले शिक्षण, ईंजीनिअरींगची चांगल्या पगाराची नोकरी, घरची चांगली परिस्थिती, जमल्यास फॅमिली बॅकग्राऊंड, त्यातही एकुलते एक असणे, हे एवढे पुरेसे होते. रात्रभर हे मुद्दे मनातल्या मनात शंभरवेळा घोकून काढले. स्वप्नातही त्याला आपण हीच बडबड करतोय आणि आपले काम बनतेय असे दिसत होते.

सकाळ झाली, कालपासून केलेली सारी रंगीत तालिम प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ आली… पण कसले काय… सारे मनातल्या मनातच राहिले… तिच्या समोर.. अंह.. तिच्याही नाही, तिच्या मैत्रीणीच्या पाठीमागे उभा राहून तो हे सारे बोलणार होता.. पण हेल्लो हेल्लो रॉंग नंबरच्या पुढे गेलाच नाही. ततपप करणेही दूर, तोंडातून शब्द फुटेल तर शप्पथ.. मिशन फेल गेले होते. शमीनची प्रेमकहाणी होती तिथेच राहिली होती.

आजपर्यंत शमीनला बर्‍याच मुली आवडल्या होत्या, काही खरेच भावल्या होत्या. काहींना नुसतेच लांबून बघायचा तर काहींचे रात्ररात्रभर विचारही करायचा. पण यावेळी पहिल्यांदा दैवावर अवलंबून न राहता स्वताहून पुढे पाऊल टाकायचा प्रयत्न करत होता तर त्याला जाणवत होते की आपल्या पायात ती शक्तीच नाही. आजपर्यंत तो आपल्या जागी खूष होता, समाधानी होता, पण आज मात्र त्याला पराभूत झाल्यासारखे वाटत होते. घरी जाईपर्यंत ते शल्य बोचत होते. त्याची सर्वात मोठी चिंता होती की आज डायरीमध्ये तो काय लिहिणार होता. त्या दिवशी तिच्या जरासा जवळ काय उभा राहिला, तिच्याबद्दल जरा काही माहिती मिळवली तर मोठी विजयगाथा लिहिल्याच्या अविर्भावात त्याने या सार्‍याची डायरीत नोंद केली होती. पण आज ती डायरी उघडावीशी देखील वाटत नव्हती. आता शनिवार-रविवार दोन दिवस सुट्टी होती. इतर वेळी कधी ही सुट्टी संपते, सोमवार उजाडतो आणि ती आपल्याला दिसते असे त्याला नेहमी व्हायचे. पण आज मात्र सोमवारची वाट बघावीशी वाटत नव्हती.

रविवारचा दिवस मावळला. अजून त्याने शुक्रवारचे काही डायरीत लिहिले नव्हते. इच्छाच होत नव्हती. जणू डायरी हे प्रकरण आता संपल्यातच जमा होते. पण झोपदेखील येत नव्हती. उद्या परत प्रयत्न करावा का? छे.. नाहीच जमणार आपल्याला.. जे आजपर्यंत कधी जमले नव्हते ते उद्या कुठून जमणार होते. कुठून उसनी हिम्मत आणनार होता. पण तिला विसरनेही शक्य नव्हते. की पुन्हा पहिल्यासारखे वागायचे, जे काय नशीबात घडतेय ते घडू द्यायचे आणि आपण फक्त निमित्तमात्र व्हायचे. कुठून ही डायरी लिहायची अवदसा आठवली असे त्याला वाटू लागले. कारण आता ठरवलेले जमत नाही तर याचा त्याला त्रास होऊ लागला होता. विकतचे दुखणे म्हणतात ते यालाच. एका क्षणी शमीनला वाटू लागले की उद्या सरळ तिला रस्त्यात गाठावे आणि विचारून टाकावे एकदाचे काय ते.. मग भले तिने खाडकन एक कानाखाली खेचली तरी चालेल. निदान एकदाचे काही केल्याचे समाधान तरी मिळेल… पण मग… परत येऊन डायरीत काय लिहिणार होता. आज तिने माझ्या मुस्काटात मारली आणि अश्या तर्‍हेने आमच्या प्रेमकहाणीला पुर्णविराम… त्याला खरेच कळत नव्हते की तो तिला मिळवू शकत नव्हता याचे त्याला जास्त दुख होतेय की आता डायरी मध्ये आपल्याला आपला नाकर्तेपणा लिहावा लागणार ही जाणीव छळतेय.

शमीन आता चोवीस तास तिचाच विचार करू लागला होता. तिच्यापासूनच त्याचा दिवस सुरू व्हायचा आणि तिच्या विचारातच संपायचा. त्यापासून पळून जाणे आता त्याला शक्य नव्हते. अखेर त्याने ठरवले… आजवर आपण रोज जे घडेल ते डायरीमध्ये लिहायचो ना… यापुढे जे घडले पाहिजे ते डायरी मध्ये लिहायचे.. आणि एवढ्यावरच न थांबता ते तसेच घडवायचे.. हो, आपण आता आधी डायरी लिहायची आणि मग दुसर्‍या दिवशी आग लागो वा पूर येवो तेच आणि तसेच करायचे. स्वताच स्वताला एक टारगेट सेट करून द्यायचे आणि कुठल्याही परीस्थितीत ते अचीव करायचेच. जर ऑफिसच्या कामाच्या बाबतीत हे शक्य होते तर प्रेमाच्या बाजीत का नाही. उलट इथे तर त्याचे आयुष्य पणाला लागले होते.

डोक्यातील सकारात्मक विचार निघून जायच्या आधी शमीन उठला आणि तडक डायरी लिहायला लागला. ते लिहायला लागला जे त्याला आदल्या दिवशी जमले नव्हते, तेच जे त्याला उद्या करायचे होते आणि बस… करायचेच होते… गेला शुक्रवार त्याने केव्हाच मागे सोडला होता. त्याचा सोमवार झोपायच्या आधीच उजाडला होता.

डायरीत काहीही वेगळे लिहिले नव्हते, जे शुक्रवारी जमले नव्हते तेच करायचे होते. पण का कोणास ठाऊक आज त्याला वेगळाच उत्साह वाटत होता. लिहिले आहे म्हणजे करायलाच पाहिजे. दुसरा पर्याय नाही. तानाजी स्वताच दोर कापून लढायला उभा राहिला होता. समोर अमृता होती.. नेहमीसारखीच.. बसच्या रांगेत.. त्याच्या अगदी पुढे.. मोबाईलची रिंगटोन त्याने स्वताच एकदा वाजवली आणि मित्राचा फोन आला आहे असे भासवून सुरू झाला. जणू काही त्याचा शाळेतील जुना एखादा मित्र फोनवर त्याची बर्‍याच दिवसांनी चौकशी करत आहे असे दाखवून आपल्या कॉलेजचे नाव, शिक्षण, कामाचे ठिकाण, तेथील स्वताची पोस्ट, नक्की काय काम करतो, एवढेच नाही तर स्वताचा पगार सुद्धा सांगून झाला. प्रत्येक वाक्य-न-वाक्य, शब्द-न-शब्द ती ऐकत आहे याची त्याने खात्री करून घेतली. जिथे संशय आला की तिने ऐकले नसावे तिथे तिथे त्या त्याचा उल्लेख परत परत केला.

तो हे मुद्दाम ऐकवतोय असा संशय तिला आलाही असावा… की नसावा.. याच्याशी त्याला आता घेणेदेने नव्हते… कारण काण्या डोळ्याने आपण काय बोलतोय याचा अंदाज ती नक्की घेत होती हे त्याला समजले होते. मिशन सक्सेसफुल झाले होते. आज बसमध्ये देखील तिची नजर खिडकीच्या बाहेर कमी आणि आतच जास्त होती. जे ठरवले होते, जे डायरीत लिहिले होते ते शमीनने केले होते आणि त्याचा परिणाम देखील झाला होता. आज घरी जाऊन डायरीमध्ये तेच वाचायचे होते आणि उद्या काय करायचे आहे हे लिहायचे होते.

पुढचे दोनतीन दिवस काही करायच्या आधी तिच्यावर काय फरक पडतो हे बघणे जरूरी होते. मग त्यानंतरच पुढे काय करायचे हे ठरवावे लागणार होते. म्हणून त्याने डायरीत खास असे काही लिहिले नाही. ठरल्याप्रमाणे तिचा जास्तीत जास्त पाठलाग करणे चालू होते. तिची नजर नक्कीच बदलली होती. शमीन जवळपास कुठे आहे का याचा ती अंदाज घेऊ लागली होती. उद्या शुक्रवार होता. आठवड्याचा शेवटचा दिवस. आठवडा संपता संपता परत आणखी एक पाऊल पुढे टाकायचे ठरवून उद्याची डायरी लिहायला घेतली.

आज शमीन तिच्या ऑफिसपर्यंत तिचा पाठलाग करणार होता. डायरीतही त्याने हेच लिहिले होते. सारे काही जणू आधीच ठरल्याप्रमाणे ती देखील वेळेवर आली. तिचा स्टॉप नक्की किती लांब आहे हे माहीत नसल्याने शमीनने सरळ लास्ट स्टॉपपर्यंतचे तिकिट काढले. बसमध्ये तो तिच्या मागेच उभा होता. पण शमीनचा स्टॉप आला तरी तो उतरला नाही, तसे तिनेही सहजगत्या मागे वळून तो कुठे राहिला हे पाहिले. शमीनची नजर तिच्यावरच लागली होती. नाही म्हटले तरी तिला थोडे ओशाळल्यासारखे वाटले. मात्र शमीनच्या चेहर्‍यावर एक हास्याची लकेर उमटली. दोनच स्टॉपनंतर ती उतरली. मागोमाग शमीन देखील उतरला. जवळच्याच एका कंपनीच्या गेटमध्ये ती शिरली. शमीनला वाटले की शेवटच्या टर्नला तरी ती मागे वळून बघेन. पण तिने तसे काही केले नाही.

आज शमीनचे ऑफिसच्या कामात जराही लक्ष लागत नव्हते. संध्याकाळी त्याने तिच्या स्टॉपला जायचे ठरवले. पण ऐनवेळी जमले नाही, त्याचे पाय आपोआप स्वत:च्या स्टॉपकडे वळले. वाटले की जे डायरीत लिहिलेच नव्हते ते उगाच का घडवा. आधी ठरवूया नक्की काय करायचे आहे ते, मग ते डायरीत उतरवून काढूया. मग ते तसे घडणारच… असा काहीसा विश्वास आता त्याला वाटू लागला होता. जणू काही डायरीत लिहिल्यावर ते सारे काही आपल्याकडून विधीलिखित असल्याप्रमाणेच घडत असावे.

रविवारी गेल्या आठवड्याची डायरी त्याने परत वाचून काढली. प्रत्येक दिवशी त्याने आधीच लिहिल्याप्रमाणे केले होते, आणि सारे काही त्याच्या मनासारखे घडले होते. आता उद्या संधाकाळी तिच्या ऑफिसच्या स्टॉपला जायचे अशी त्याने डायरीत नोंद केली.

सोमवारी सकाळी पुन्हा तिच्या पाठीपाठी तिच्या ऑफिसपर्यंत जायचा विचार त्याने केला पण इतक्यात त्याला आठवले की अरे, आपण डायरीमध्ये तर फक्त संध्याकाळचेच लिहिले आहे. आता जाणे उचित होईल का?? काय करावे समजत नव्ह्ते. डायरीमध्ये लिहिले आहे तितकेच करायचे असा काही नियम तर नव्हता, आणखी काही केले तर चांगलेच आहे, असा विचार करून त्याने तिच्या ऑफिसपर्यंत जायचे ठरवले. आपला स्टॉप येऊनही उतरला नाही. बसने त्यांचा स्टॉप सोडला तसा एक मोटारवाला कट मारून पूढे जायचा प्रयत्न करायला गेला आणि त्याला नेमकी त्यांची बस धडकली. बघता बघता सगळा ट्राफिक जाम झाला आणि बस तिथेच अडकली. आणखी वाट बघण्यात अर्थ नव्हता, आधीच ऑफिसला उशीर झाला होता. मग त्याला नाईलाजाने तिथेच उतरावे लागले. योगायोग म्हणा वा नियतीचा खेळ म्हणा जे डायरीत लिहिले नव्हते ते घडवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. यापुढे अशी हुशारी दाखवायची नाही असे त्याने मनोमन ठरवले.

संध्याकाळी मात्र तो ठरल्याप्रमाणे तिच्या ऑफिसच्या स्टॉपला गेला. तिथे गेल्यावर त्याला एक नवीन गोष्ट समजली, ती म्हणजे तिच्या स्टॉपवरून स्टेशनला जाणार्‍या दोन बस होत्या. त्यापैकी एक शमीनच्या स्टॉपवरून जायची तर एक मागच्या रस्त्याने फिरून जायची. आणि यामुळेच ती त्याला कधी दिसायची, तर कधी नाही. आता यापुढे दररोज तिच्या बसस्टॉपवरूनच बस पकडायचे असे त्याने ठरवले जेणे करून ती रोज भेटेल. या विचारात असतानाच ती समोरून येताना दिसली. शमीनला असे संध्याकाळी तिच्या कंपनीच्या बाहेर बघून ती जरा चमकलीच. बरोबर तिची मैत्रीण स्मितादेखील होती. अर्थात तिनेही शमीनला ओळखले आणि तिला मुद्दाम कोपरखळी मारून हसायला लागली. आपल्या नावाने तिची मैत्रीणही तिला हल्ली चिडवायला लागलीय हे बघून शमीनला बरे वाटले. त्याची लवस्टोरी आता व्यवस्थित ट्रॅकवर होती. त्याच्या आजवरच्या प्रवासाच्या मानाने गेल्या आठवड्याभरात नक्कीच प्रगती होती. आणि ही सारी त्या डायरीची कमाल होती. नाहीतर शमीन आयुष्यभर त्या बसच्या रांगेपलीकडे गेला नसता.

……………………………………………………………………………………………………

मुंबई उपनगरातील बसचालकांनी पगारवाढीसाठी अचानक बेमुदत संप पुकारला होता. स्टेशनवरून ऑफिसला जायला शेअर रिक्षाचाच पर्याय काय तो उपलब्ध होता. याचाच अर्थ उद्यापासून पुढचे काही दिवस ना बसप्रवास होता ना बसची रांग होती आणि नाही त्या रांगेत तिची वाट बघणे होते. उद्या ती रिक्षा पकडून लगेच निघून जाणार, एखादा क्षणच काय ती दिसणार या विचारांनी शमीन उदास झाला होता. तसेच डायरीमध्ये उद्याचे काय लिहायचे हा ही प्रश्न होताच. उद्या नेहमीच्या रूटीनपेक्षा काहीतरी वेगळे घडणार होते. हे झाले तर मी असे करेन, ते झाले तर तसे, अश्या जरतरच्या भरवश्यावर लिहिण्याला काही अर्थ नव्हता. तरीही सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन, असे काही घडणे जवळपास अशक्य आहे हे माहीत असताना देखील शमीनने डायरीत उद्याची तारीख टाकून नोंद केली, “आज मी रिक्षाने प्रवास केला… तिच्याबरोबर… एकाच रिक्षातून… एकाच सीटवर… तिच्या अगदी बाजूला बसून…!!”

हे आता कसे घडणार होते की कसे घडवायचे होते हे खरे तर शमीनलाही ठाऊक नव्हते. डोक्यातही काही प्लॅन तयार नव्हता, आणि ठरवले तरी असे काही करायची आपली हिम्मत होईल की नाही याची त्याला खात्री नव्हती. तरी डायरीवर भरवसा ठेऊन आज सकाळी नेहमीप्रमाणे तिची बसच्या रांगेत वाट न पाहता तो रिक्षास्टॅंडवर जाऊन उभा राहिला. अपेक्षेप्रमाणे ती तिच्या मैत्रीणीबरोबर आली. कदाचित तिलाही त्याचे तिथे असणे अपेक्षित असावे आणि तिच्या मैत्रिणीलादेखील. त्यांचे एकमेकांकडे पाहून सूचक हसणेच बरेच काही सांगून गेले. शमीनच्या चेहर्‍यावरही हल्ली अश्यावेळी ओशाळलेले भाव न येता त्याची जागा मंदस्मित घेऊ लागले होते. जश्या त्या त्याच्या बाजूने गेल्या तशी त्याची पावले देखील आपोआप त्यांच्या पाठी जाऊ लागली. पण त्यांनी एक रिक्षा पकडली तशी पावले तिथेच थबकली. जणू यापुढे त्याला प्रवेश निषिद्ध होता. थोडावेळ जागेवरच घुटमळला. त्यांची रिक्षा अजून तिथेच थांबली होती. तेवढ्यात आतून रिक्षावाला बाहेर पडला. माझी नजर तिथेच लागली असल्याने जशी आमची नजरानजर झाली तसे त्याने ओरडून विचारले, “कुठे? कॅप्सूल कंपनी का?” शमीन क्षणभर भांबावला, नकळत नकारार्थी मान हलवली आणि उत्तरला, “नाही, चारकोप नाका…”

“चला या लवकर…” शमीनचा अजूनही विश्वास बसत नव्हता. ती खरे तर एक शेअर रिक्षा होती, जी त्यालाही चालू शकत होती. कारण जेमतेम दोन स्टॉपचेच तर अंतर होते त्या दोघांच्या ऑफिसमध्ये. पण आज रिक्षामध्ये तेही मिटले होते. तिच्या अगदी बाजूलाच बसला होता तो. जसे डायरीमध्ये लिहिले होते, अगदी तसेच… साधे बसमध्ये तिच्या बाजूला बसणे त्याच्यासाठी कुठल्या स्वप्नापेक्षा कमी नव्हते. इथे तर रिक्षामध्ये, जेमतेम जागेत, फक्त ती आणि तो. नाही म्हणायला तिची मैत्रीण पलीकडे बसली होती, पण तिलाही हे सारे ठाऊक असल्याने ती गालातल्या गालात हसतच होती. शमीन संकोचून अंग चोरून बसायचा प्रयत्न करत होता तसे रिक्षाच्या हिंदकाळण्याने आणखी तिच्यावर आदळत होता. मग त्याने तो नाद सोडून दिला आणि आरामात बसला. जसा कम्फर्टेबल झाला तसे त्याला वाटू लागले की हा प्रवास असाच चालत राहावा, संपूच नये. पण प्रत्यक्षात थोडीच असे घडणार होते. आणि डायरीत देखील त्याने असे काही लिहिले नव्हते. जसे काही डायरीत लिहिले असते तर त्यांचा प्रवास निरंतरच चालणार होता. आपल्या या विचारांचे त्यालाच हसायला आले..

संध्याकाळी मात्र तिने रिक्षा तिच्या ऑफिसच्या इथूनच पकडली असती, त्यामुळे उगाच तिथे जाण्यात अर्थ नव्हता. पण दुसर्‍या दिवशी सकाळी मात्र आजचीच अनुभुती परत मिळावी अशी त्याची इच्छा होती. बसचा संप संपेपर्यंतच ही ऑफर होती आणि तिचा पुरेपूर फायदा त्याला उचलायचा होता. आणि एका विश्वासानेच त्याने पुन्हा डायरीत तशी नोंद केली.

आजही थोड्याफार फरकाने तेच झाले. पुन्हा तो तिच्या रिक्षाजवळ घुटमळला, यावेळी मात्र जाणूनबुझून. तसे परत रिक्षावाल्याने तिसरी सीट भरायला त्यालाच हाक मारली. आजही पुन्हा तेच सारे, तसेच काही. अचानक त्याच्या मनात आले की अश्यावेळी मस्त पाऊस पडला तर किती बरे होईल. एकाच रिक्षात किंचितसे भिजलेले असे आम्ही दोघे. गारठल्याने आणखी जवळ येणे. रिक्षाच्या दारातून आत येणार्‍या पाण्याच्या शिंतोड्यांमुळे आणखी आत सरकने. यापूर्वी त्याने तिच्या बद्दल कधी असा विचार केला नव्हता पण आज ही कल्पनाच मनाला गुदगुल्या करून गेली. आयुष्यात काही चांगले, सकारात्मक घडत होते तशी त्याची हाव देखील वाढत होती. “येह दिल मांगे मोअर” म्हणतात ना तसेच काहीसे झाले होते. पण निसर्गावर कोणाची हुकुमत असते. भले शमीनकडे डायरी होती आणि त्यात लिहू तसे घडते किंवा आपणच तसे घडवतो असा त्याला विश्वास येऊ लागला होता, पण तरीही डायरी त्याच्या स्वताच्या आयुष्याशी निगडीत होती. त्यात लिहिण्याने पाऊस पडेल अशी आशा बाळगणेही वेडेपणाचे होते. पण प्रेम हे आंधळे, बहिरे, वेडे, नादान, आणि बरेच काही असते. याच वेडेपणात शमीनने आपल्या डायरीत पावसाची नोंद केली होती.

सकाळी उठल्याउठल्या त्याने खिडकीच्या बाहेर एक नजर टाकली. आकाश कोरडेच होते. ऑगस्ट चालू असला तरी गेले पंधरा दिवस पाऊस कुठेतरी दडी मारून बसला होता. त्यामुळे असे काही अतर्क्य घडू शकेल अशी आशा नव्हतीच. तरीही त्याला हिरमुसल्या सारखे झाले. त्याच मूडमध्ये तो तयारी करून निघाला. कांदिवली स्टेशन जवळ आले तसा परत उत्साह जाणवू लागला. त्याचे मन स्वतालाच सांगू लागले, पाऊस का नसेना, ती तर भेटणारच ना, नशीबाने साथ दिली तर परत आज देखील एकाच रिक्षाने जाऊ. कशाला यापेक्षा जास्त हाव बाळगायची. पण स्टेशनच्या बाहेर जेव्हा तो पडला त्याला धक्काच बसला. आभाळ भरून आले होते. बारीक बारीक बुंदाबांदी होऊ लागली होती. इतक्यात तिचीही ट्रेन आली आणि अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली. अनपेक्षित पाऊस आल्याने आज कोणाकडे छत्री ही नव्हती. पाऊस थांबण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. ऑफिसलाही उशीर होत होता. पाऊस कधी कमी होतोय याची जास्त वेळ वाट न पाहता त्या दोघी रिक्षास्टॅंडच्या दिशेने भिजत निघाल्या.

शमीनचा अजूनही विश्वास बसत नव्हता. तिच्या ओलेत्या कपड्यांचा स्पर्श अंगावर एक रोमांच उठवत होता. क्षणाला उब मिळत होती तर क्षणाला अंग गारठून जात होते. पावसात रिक्षेचा वेग सुद्धा मंदावला होता. जिथे एखादा क्षण युगासारखा भासत होता तिथे प्रवासदेखील जरा जास्तच लांबला होता. जगात देव नावाचा प्रकार खरेच असतो की नाही माहीत नाही, पण जर अशी एखादी शक्ती अस्तित्वात असेल तर ती नक्कीच आपल्यावर प्रसन्न झाली आहे याची प्रचिती त्याला गेल्या काही दिवसात येत होती. आणि आता शमीनने त्याच शक्तीची जरा आणखी परीक्षा घेण्याचे ठरवले.

बसचा संप आज मध्यरात्री मागे घेतला जाणार असे बातम्यात दाखवत होते. म्हणजे उद्यापासून हा रिक्षातून एकत्र प्रवास करायचा खेळ थांबणार होता. शमीनला ही बातमी ऐकून अस्वस्थ वाटू लागले. भले ते दोघे अजून मनाने जवळ आले नसले तरी गेले काही दिवस त्याला तनाने जवळ आल्यासारखे वाटू लागले होते. हे असेच चालू राहिले तर लवकरच मनानेही जवळ यायला वेळ लागणार नाही असे त्याला वाटत होते. किंवा खरे सांगायचे तर त्याला याची चटक लागली होती असे म्हणनेही वावगे ठरणार नाही. याच विचारात त्याने डायरी लिहायला घेतली तर खरी, पण उद्या सकाळी संप नक्की सुटणार ही बातमी टीवी वर ऐकतच डोळे मिटले.

पण कोणालातरी हे मंजूर नव्हते. दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा अतर्क्य असे घडले होते. कांदिवली स्टेशनबाहेर सार्‍या बस तश्याच निष्प्रभ पहुडल्या होत्या. रिक्षावाले हाका मारून मारून आपले गिर्‍हाईक बोलवत होते. भल्या पहाटे पुन्हा एकदा संपाची बोलणी फिस्कटली होती. आजही शमीन पुन्हा एकदा तिच्या जोडीनेच प्रवास करत होता.

योगायोग हा एकदा होऊ शकतो, दोनदा होऊ शकतो पण वारंवार… कसे शक्य होते… आपण जे ठरवतो, जे डायरीत लिहितो, तेच आणि तसेच घडते यावर शमीनचा आता विश्वास बसू लागला होता. बसच्या वाढलेल्या संपामुळे आज पुन्हा पाच रुपयांच्या बसच्या तिकिटाच्या जागी दहा रुपये रिक्षाचे भाडे द्यावे लागणार असा विचार करणारे लोक शमीनला अचानक तुच्छ वाटू लागले होते. कारण आता त्याच्याकडे एक शक्ती आली होती. जगाच्या सुखदुखाशी त्याला पर्वा नव्हती, कारण त्याची प्रेमकहाणी तो आता स्वत:ला त्याला हवी तशी लिहिणार होता.

जे घडत होते ते चांगले की वाईट हे त्याला अजूनही समजत नव्हते पण लिहिणारा तो स्वताच असल्याने यातून काही वाईट घडण्याची शक्यता नाही याची त्याला खात्री होती. आजपर्यंत स्वताच्या मुखदुर्बलतेमुळे आणि आत्मविश्वासाच्या अभावापायी प्रेमात खचून जायचे बरेच प्रसंग त्याच्या आयुष्यात वेळोवेळी आले होते. तरीही त्या विधात्यावर त्याने नेहमी विश्वास ठेवला होता की योग्य त्या वेळी तोच आपली नैय्या पैलतीराला लावेल. आज त्याचा तोच विश्वास सार्थ ठरत होता. तरीही शमीन लगेच हुरळून गेला नाही. आज डायरीमध्ये जरा आणखी डिटेल लिहायचे असे त्याने ठरवले. उद्या तिची येण्याची ट्रेन, तिने घातलेले कपडे, त्यांचा रंग… बसमध्ये तिची बसायची जागा, तिचे त्याच्याकडे बघणे, बघून हसणे… त्यांची संध्याकाळची भेट, पुन्हा परतीचा बसचा प्रवास ते तिचे ट्रेनमध्ये चढणे आणि चढता चढता त्याच्याकडे शेवटचा कटाक्ष टाकणे… सारे.. सारे काही डायरीत बारीक सारीक तपशीलासह लिहिले. उद्याच्या दिवसाची उत्सुकता आता जरा जास्तच होती.

रात्री फार चांगली झोप लागली नाही. सकाळी नेहमीपेक्षा जरासा उशीराच उठला. आणि मग नेहमीची ट्रेन पकडण्यासाठी घाईघाईत तयारी करणे.. डायरीबद्दल पार विसरून गेला तो या नादात.

आज विशेष असे काही घडले नाही. नेहमीसारखाच एक दिवस होता. तरी हा दिवस आपल्या आयुष्यात या आधी देखील आला आहे, असेच काहीसे आपल्या आयुष्यात या आधी देखील घडले आहे असे त्याला उगाच वाटत होते. पण ऑफिसमध्ये कामाच्या नादात हे विचार तसेच विरून गेले.

संध्याकाळी हल्लीच्या रूटीनप्रमाणे त्याने तिच्या स्टॉपला जाऊनच बस पकडली.. तिची ती ओळख दाखवणारी नजर.. हलकेसे हसणे.. मैत्रीणीचे तिला छेडणे.. तिचे मानेला अलगद झटका देणे… आणि मागे वळून पाहणे.. हल्ली तिचा पाठलाग करणे खूप बरे वाटू लागले होते.

घरी पोहोचल्यावर नेहमी सारखे कपडे बदलून, फ्रेश होऊन, शमीन आपल्या रूममध्ये गेला. सहजपणे डायरी वाचायला घेतली.. आणि अचानक डोक्यात लक्ख प्रकाश पडला… दिवसभर जे वाटत होते की हे आपल्याशी आधी पण घडलेय, ते घडले नव्हते तर तसे घडणार आहे हे भाकीत त्याने स्वत:च काल रात्रीच डायरीत करून ठेवले होते. शब्द न शब्द जुळत होता. आकाशी रंगाचा सलवार कुर्ता, ठिपक्या ठिपक्यांची डिजाईन आणि त्यावर पांढर्‍या रंगाचा जाळीदार दुपट्टा… जाळीदार दुपट्टा… जो आज तिने पहिल्यांदाच घातला होता… जो कधी शमीनने स्वप्नात ही पाहिला नव्हता.. पण डायरीत लिहिला होता.. योगायोगाच्या पलीकडे गेले होते हे सारे यावर त्याचा आता पक्का विश्वास बसला होता. दुसर्‍या दिवशीचे काय लिहू आणि काय नको असे क्षणभर त्याला झाले. मनात आणले तर आता तो तिला चार दिवसातच मिळवू शकत होतो. त्याही पलीकडे जाऊन काही शृंगारीक लिहावे असेही त्याच्या मनात आले.. पण क्षणभरच.. उत्साहचा हा आवेग ओसरल्यावर तो सावरला. शमीनचा स्वभाव असा नव्हता. त्याच्या भावना थिल्लर नव्हत्या. त्यांच्यात जे काही होणार होते ते दोघांच्या मर्जीने आणि एका मराठमोळ्या मुलीच्या सार्‍या मर्यादा सांभाळूनच याची त्याने स्वताच्याच मनाला खात्री पटवून दिली.

असे म्हणतात की देव जेव्हा एखादी शक्ती देतो तेव्हा त्याच बरोबर एक जबाबदारी देखील देतो. तसेच ती पेलायची ताकद देखील तोच विधाता देतो. गरज असते ती सारासार विचार करून वागायची. शमीनने निर्णय घेतला होता.. या डायरी मध्ये असे काहीही अतिरंजित लिहायचे नाही. जर आपण तिच्या योग्यतेचे असू, तर ती आपल्याला मिळणारच. अगदीच काही जमले नाही तर डायरी आहेच दिमतीला. पण तो आपला शेवटचा मार्ग असला पाहिजे. तोपर्यंत डायरीत उद्या आपल्याला काय करायचे आहे तेच लिहायचे. त्याचे परीणाम काय होतील, त्यावर तिची प्रतिक्रिया काय असेल हे सारे नियतीलाच ठरवून दे. अन्यथा जरी तिला मिळवले तरी तो आपल्या प्रेमाचा विजय नसेल. अश्या मीलनात आपण कधीच समाधान शोधू शकणार नाही. शरीराने शोधले तरी आत्मा नेहमी असंतुष्ट राहील… याच विचारात कधीतरी शमीनचा डोळा लागला.. डायरीत कसलीही नोंद न करताच दिवा मावळला.. आणि या परिस्थितीत जे अपेक्षित होते तेच घडले. दुसर्या दिवशी ती कुठेच दिसली नाही.. कदाचित आलीच नसावी.. पण ना ती दिसली, ना तिची मैत्रीण…

गेले तीनचार दिवस लिहेन लिहेन म्हणत शमीनने मनावर ताबा ठेवला होता. ती काय म्हणेल, कशी रिअ‍ॅक्ट करेल याची त्याला भिती वाटत होती. पण हे पाउल उचलने गरजेचे होतेच. “प्यार दोस्ती होती है” कुठल्यातरी सिनेमात ऐकलेला आणि मनात ठसलेला एक संवाद. खरेच असे असते का माहीत नाही पण प्रेमाची सुरुवात मात्र मैत्रीनेच होते एवढे नक्की. आणि मैत्री होण्यासाठी एकमेकांची चांगली ओळख होणे गरजेचे असते. आजपर्यंत नजरेने बरेच संवाद साधले होते, आता शब्दांची पाळी होती. भावना त्याच पोहोचवायच्या होत्या, फक्त माध्यम बदलायचे होते. धडधडत्या अंतकरणानेच शमीनने डायरी लिहायला घेतली.

दिनांक – ७ सप्टेंबर – मंगळवार –
आज संध्याकाळी मी तिच्या कंपनी जवळच्या स्टॉपला बस पकडायला गेलो… कंपनीच्या गेटमधून ती बाहेर आली… एकटीच.. आज तिची मैत्रीण बरोबर नव्हती… बस आली.. आम्ही चढलो… तिच्या पाठोपाठच उतरलो… स्टेशनपर्यंत तिचा एका हाताचे अंतर ठेउन पाठलाग केला.. पण जसे स्टेशन जवळ आले तसा चपळाईने पुढे जाऊन तिच्या समोर उभा ठाकलो… आणि.. अमृता… मला.. तुझ्याशी… तुझ्याशी… शी… श्या..!! पेनातील शाई पण नेमकी आताच संपायची होती..

हा अपशकून तर नाही ना, अशी शंकेची पाल मनात चुकचुकल्यावाचून राहिली नाही. उद्याचा प्लॅन सरळ ड्रॉप करावा का असा विचारदेखील त्याच्या मनात आला. पण मग वाटले, अर्धे-अधिक का होईना, लिहिले तर आहे ना.. म्हणजे किमान तेवढे तरी केलेच पाहिजे. किंबहुना ते तसे घडणारच होते, ज्याप्रमाणे आजवर लिहिलेले घडत आले होते. आणि तसेही त्याचे भविष्य ती डायरी घडवत होती. पेन काय, एक संपले तर दुसरे घेता येते. मनातील सारे निगेटीव विचार झटकून शमीन उद्यासाठी तयार झाला.

.
.

…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………

————————————————– भाग ३ ————————————————–

…………………………………………………………………………………………………………………………
…………………………………………………………………………………………………………………………

.
.

शमीनचा आजचा सारा दिवस मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करण्यातच गेला. महिन्याभरापूर्वी त्याला तिच्या जवळ उभे राहून खोटे खोटे फोनवर बोलणे देखील अवघड वाटत होते. आणि आज थेट तिच्या समोर उभा राहून, तिच्या नजरेत नजर घालून मैत्रीचा हात पुढे करणार होता तो.. पहिले वाक्य… पहिले वाक्यच खूप महत्वाचे होते.. एकदा का व्यवस्थित सुरुवात झाली की आपली गाडी सुसाट सुटेल यावर त्याचा विश्वास होता. पण नक्की कुठुन सुरुवात करावी हे त्याला समजत नव्हते.. तिचे नाव विचारावे का?? पण सांगेल का?? की आपलेच सांगावे.. की नको.. सरळ तिचे नावच घेऊन सुरुवात करणे ठीक राहील.. अमृता…! अमृता, तुझे नाव तुझ्या चेहर्‍याला सूट होत नाही.. या अनपेक्षित वाक्यफेकीने तिच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्हच येईल ना.. मग आपले किंचित हसून उत्तर…हो खरेच तुझे नाव तुझ्या चेहर्‍याला साजेसे नाहिये… कारण तो अमृतापेक्षा गोड आहे… आणि मग यावर तिचे लाजणे… आहा..! हे सारे विचार देखील शमीनच्या मनाला गुदगुल्या करून चेहर्‍यावर हास्य फुलवीत होते.. पण जमेल का हे आज आपल्याला?? डायरीने देखील काल नेमके मोक्याच्या क्षणीच धोका दिला होता. जर तिथे व्यवस्थित लिहिले गेले असते तर पुढे काय बिशाद होती वेगळे काही घडायची..

संध्याकाळी खरेच तिची मैत्रीण तिच्या बरोबर नव्हती. डायरीत लिहिलेली एक गोष्ट तरी खरी ठरत होती. पण शमीनच्या आता ते डोक्यात नव्हते. आज ती एकटीच असल्याने त्याला बघूनही न बघितल्यासारखे करून ती बसस्टॉपच्या दिशेने चालू लागली. बसमध्येही आज त्यांचे नेहमीप्रमाणे नजरेचे खेळ होत नव्हते. खिडकीच्या बाहेरच कुठेतरी टक लाऊन ती बघत होती. एकंदरीत आज लक्षणे काही ठीक दिसत नव्हती. हा सारा प्रकार शमीनच्या उत्साहावर विरजन टाकत होता पण अवसान गाळून चालणार नव्हते. बोलायचे तर होतेच आणि तेही आजच.. ठरल्याप्रमाणे त्याने बसमधून उतरल्या उतरल्या तिचा पाठलाग करायला सुरुवात केली. स्टेशन जवळ आले तरी अजून तिला ओवरटेक करून पुढे जायची त्याची हिंम्मत काही होत नव्हती. रेल्वेचा पूल ओलांडून ती पलीकडच्या प्लॅटफोर्मवर गेली.. तसा शमीनही तिच्या पाठोपाठच होता.. धडधड करत ती जिना उतरली आणि शमीनचीही धडधड वाढली.. आता तिला गाठले नाही आणि एकदा का ती प्लॅटफॉर्मवरच्या बायकांच्या घोळक्यात मिसळली की मग शमीनला पुढच्या संधीची वाट बघत बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तिला त्या आधीच गाठणे गरजेचे होते. आता वेळ गमावून चालणार नव्हते. प्लॅटफॉर्म बर्‍यापैकी रिकामे होते, तिला इथेच थांबवायला हवे होते.. हीच ती वेळ.. हाच तो क्षण.. त्याने आपल्या मनाला बजावले, चालायचा वेग वाढवून.. खरे तर धावतच.. शमीन तिच्या बरोबरीला आला.. तिलाही अंदाज आला असावा की हा असा लगबगीने आपल्याशीच बोलायला आला आहे… तरीही.. ती तशीच चालत राहिली.. न थांबता.. आणि चालता चालताच शमीनने अलगद तिला ओवरटेक करून… तिच्या अगदी समोर येऊन तिला विचारले, “अमृता… मला जरा तुझ्याशी…….???…
.
.
.
.
ट्रेनच्या पुर्ण प्रवासात शमीनच्या कानात तिचे शब्द घुमत होते. खूपच अनपेक्षित असा धक्का होता हा शमीनसाठी. ती काहीच न बोलता निघून गेली असती तरी चालले असते. तिच्या मौनाचा ही शमीनने आपल्या सोयीने अर्थ काढला असता. पण जे काही बोलली ते शब्द त्याच्या कानात तीक्ष्ण हत्यारासारखे घुसले होते आणि घाव मात्र हृदयाला देऊन गेले होते. “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…” … फालतूगिरी..!! म्हणजे आजवर आपण जे काही करत होतो ती निव्वळ फालतूगिरी होती तिच्यासाठी..?? तिचे ते आपल्याकडे बघणे.. बघून हसणे.. भ्रम होता का हा आपला सारा..?? की ही ती नव्हतीच जिला आपण ओळखत होतो, जिच्या पाठीपाठी एवढे दिवस जात होतो, तिच्याही नकळत जिच्यावर आपण प्रेम करत होतो.. आजपर्यंत सर्वांचा लाडका असा मी, माझ्या मस्तीखोरपणाचे पण मित्रांना किती कौतुक आणि आज जिच्यावर आपण खरे प्रेम केले तिला ती एक फालतूगिरी वाटावी.. निराश अवस्थेतच शमीन घरी पोहोचला.. डोक्यामध्ये तिचा आणि तिचाच विचार होता, डायरी त्याला हातातही घ्यावीशी वाटत नव्हती. आज जे घडले होते त्यापुढे उद्याचे काय लिहिणार होता तो.. काहीच सुचत नव्हते.. पेनातील शाईच नाही तर मनातील शब्दही संपले होते..

रात्री जेवल्यावर सवयीनेच शमीनने डायरी उघडली.. आणि शेवटचे पान उघडून वाचू लागला..
दिनांक – ७ सप्टेंबर २०१२,
वार – मंगळवार.

अमृता मला जरा तुझ्याशी…..

खळ्ळ फट्याक.. कोणीतरी झणझणीत कानाखाली खेचावी आणि कळ एकदम मस्तकात जावी तसे झाले. झटक्यात डायरी त्याच्या हातातून गळून पडली. तरी थरथरत्या हाताने उचलली आणि शेवटचे ते पान पुन्हा वाचायला घेतले. नजर झरझर झरझर फिरत परत शेवटच्या ओळीवर येऊन थांबली.. अमृता मला जरा तुझ्याशी…. मला वाक्यदेखील पुर्ण करू न देता ती म्हणाली, “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…!!”… “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…!!” .. “काहीही फालतूगिरी नाही पाहिजे…!!” परत परत तीच ओळ तेच शब्द तो वाचू लागला. ध्यानात यायला अंमळ वेळच लागला की ते त्याचेच अक्षर होते.. आणि आज जे घडले होते ते त्या डायरीत आधीच लिहिले गेले होते..

शमीनला मात्र आपण काल असे काहीच लिहिल्याचे आठवत नव्हते.. मुळात तो असे काही वेडेवाकडे लिहिण्याचा प्रश्नच उदभवत नव्हता. पण मग कोण लिहिणार होते हे असे अभद्र.., तेही त्याच्याच अक्षरात.., कोणाला माहीत होते जे आज घडले ते.., कधी समजले.., कसे समजले.., काहीच समजत नव्हते, काहीच सुचत नव्हते.. बराच वेळ असाच विचारशून्य अवस्थेत गेला.. भानावर आला तरी त्याचे सारे विचार त्याच प्रश्नांवर येऊन थांबत होते. तर्काने एकाचेही उत्तर सापडत नव्हते. शेवटी तो या निष्कर्शाप्रत येऊन पोहोचला की काल पेनात थोडीशी शाई बाकी असावी आणि आपणच कोणत्यातरी धुंदकीमध्ये हे लिहिले असावे…

……………तरीही मुळात तो जे डायरीत लिहितो ते तसेच घडते ही देखील एक अतार्किक गोष्ट होती…. पण याचा स्विकार शमीनने आधीच केला होता…

कालपर्यंत ज्या डायरीला शमीन एक दैवी देणगी समजत होता त्याची अचानक त्याला भिती वाटायला लागली होती. सारी रात्र चित्रविचित्र स्वप्नात गेली.. स्वप्न-सत्य-भ्रम… सार्यांमधील रेषा धूसर झाल्या होत्या. दुसर्‍या दिवशी तो मुद्दामच उशीरा ऑफिसला गेला. हेतू एकच, की ती नजरेस पडू नये.. किंवा खरे तर तो स्वत: तिच्या नजरेस पडू नये.. ऑफिसमध्ये पोहोचला तसा सौरभ हसत हसत त्याच्या टेबलजवळ आला. कालचा शमीनचा पराक्रम त्याने पलीकडच्या प्लॅटफॉर्मवरून पाहिला होता. अर्थात शमीन आणि तिच्यात काय बोलणे झाले ते त्याला नक्कीच ऐकू गेले नसणार, पण काय घडले असावे याचा अंदाज येण्यासाठी त्यावेळचे शमीनच्या चेहर्‍यावरचे भाव आणि तिची प्रतिक्रिया पुरेशी बोलकी होती. आता सौरभपासून काही लपवण्यात अर्थ नव्हता हे शमीन समजून चुकला. तसे केले असते तर त्याने आपल्या मनाच्या कथा रचून ऑफिसभर पसरवल्या असत्या. म्हणून शमीनने आता त्याला विश्वासात घेऊन सारे काही सांगणेच योग्य समजले…
अर्थात… डायरीचा भाग वगळूनच…

शमीनची दर्दभरी दास्तान ऐकून सौरभच्या चेहर्‍यावर हसू फुलले. पण ते शमीनची टिंगल उडवायला नव्हते तर त्याला धीर द्यायला होते. त्याही परिस्थितीत त्याने शमीनला आशेचा किरण दाखवला. सौरभच्या मते हा शेवट नाही तर ही एक सुरुवात होती. मुली पहिला पहिला अश्याच वागतात. उलट ती अशी वागली नसती तर ही खरी चिंतेची बाब होती. काय लॉजिक होते हे त्या सौरभलाच ठाऊक पण त्याच्याशी हे सारे शेअर केल्याने शमीनचे मन मात्र हलके झाले होते. आणि हो, सौरभबद्दलचे त्याचे मत ही बदलले होते.

संध्याकाळी देखील शमीन तिला चुकवूनच घरी आला. पुन्हा डोक्यात तोच प्रश्न की डायरीत काय लिहायचे. की आता सोडून द्यायचा हा डायरीचा नाद. दुसरा पर्यायच योग्य होता. ज्या शक्तीवर आपले स्वताचे नियंत्रण नाही तिच्यावर अवलंबून राहणे खरेच मुर्खपणाचे होते. त्या रात्री देखील त्याला मनासारखी झोप लागली नाही. आदल्या रात्रीसारखी वेडीवाकडी स्वप्ने काही पडली नाहीत तरी अधूनमधून डायरीची पाने फडफडत असल्याचा भास होत होता. सकाळी उठल्यावर टेबलावरची डायरी तशीच ड्रॉवरमध्ये टाकून तो ऑफिसला निघाला. आजही त्याची तिला सामोरे जायची हिम्मत होत नव्हती, पण त्याचवेळी शुक्रवार असल्याने ती दिसावी असेही वाटत होते. आणि अपेक्षेप्रमाणे ती दिसलीच. पण नेहमीसारखे बसच्या रांगेत तिच्या पाठोपाठ जाऊन उभे राहायची त्याची हिम्मत झाली नाही. दूरवर मागेच उभा राहिला. बसमध्ये चढायच्या आधी तिने आजूबाजूला एक नजर टाकली, आणि जशी शमीनच्या नजरेला मिळाली तशी तिची नजर त्याच्यावरच स्थिरावली. या अनपेक्षित प्रकाराने शमीन गोंधळून गेला. एवढे सारे झाल्यावरदेखील तिला आपले तिच्या मागेमागे येणे अपेक्षित होते तर… सौरभ बरोबरच बोलत होता, एखाद्या मुलीच्या मनात काय आहे याचा अंदाज आपल्याला आला आहे असे कधीही समजायचे नाही. त्या नेमका तुमचा अंदाज चुकवतात..

ऑफिसमध्ये गेल्यावर हे सारे त्याने सौरभशी शेअर केले. आज संध्याकाळी शमीनबरोबर सौरभ देखील तिच्या ऑफिसच्या बसस्टॉपला गेला. तिचे शमीनकडे बघूनही न बघितल्यासारखे करने सौरभच्या मते भाव खाणे होते. काही का असेना, त्याचे हे जे काही फंडे होते त्यांनी शमीनला त्या दिवशीच्या निराशेच्या गर्तेतून बाहेर काढले होते.

शनिवार रविवार मस्त कटला. डायरीचे विचार त्याच्या डोक्यातून निघून गेले होते, एवढेच नाही तर आपल्याला डायरी वगैरे काही लिहायची सवय होती याचाही शमीनला काही काळासाठी विसर पडला होता…. पण डायरी मात्र त्याला विसरली नव्हती…. त्याच्या आयुष्यातील १३ सप्टेंबर २०१२ चा सोमवार डायरीत आधीच उजाडला होता… फक्त शमीन त्याबाबत अनभिद्न्य होता.

आज ती खूप खूश दिसत होती. कदाचित तिची मैत्रीण चारपाच दिवसाने तिला भेटत होती म्हणून असावे. पण तिचा प्रसन्न चेहरा बघून शमीनचा मूड ही चांगला झाला. त्याच्या सोबतीला सौरभदेखील होता. गेले काही दिवस शमीनला त्याचे प्रेम मिळवून द्यायची जबाबदारी स्वतावर घेतल्यासारखे तो वागत होता. आणि त्याच्याच प्लॅननुसार आज शमीन बसमध्ये पुढे तिच्या जवळ बसायला न जाता मागेच बसणार होता. शमीनला खरे तर हे काही पटले नव्हते. तिच्यापासून असे जाणूनबुझून दूर राहणे त्याच्यासाठी सोपे नव्हते. पण सौरभचे मत पडले की आपण तिला जेवढे भाव देउ तेवढे ती जास्त नखरे करणार, म्हणून आज आपण मागूनच बघूया की ती तुला पलटून बघते का ते…

पण सारे अंदाज चुकले. आज अनपेक्षितपणे तीच मागच्या सीटवर जाऊन बसली. पुढे फार गर्दी होती. शमीन आणि सौरभलाही मग आयत्या वेळी काही सुचले नाही. आणि ते देखील मागे जाऊन तिच्याच जवळपास उभे राहिले. तिच्या दूर जायचे ठरवले तरी नियतीने शमीनला तिच्या जवळच आणले होते. याला पुन्हा एकदा त्या विधात्याचीच मर्जी समजून शमीन तिला नकळतपणे न्याहाळू लागला. तिच्या चेहर्‍याकडे एकटक बघत राहिला आणि स्थळ-काळ विसरून स्वतालाच हरवून बसला. बरोबरचे सारे प्रवासी पुढे बघत होते पण शमीनची मान मात्र मागच्या दिशेने तशीच वळून राहिली होती. कुठे आहे, काय करतोय, कशाचेही भान राहिले नव्हते… पण शेवटी भानावर आणले ते तिच्याच शब्दांनी… अमृतासारख्या गोड आवाजात परत तिचे ते विषारी शब्द… “पुढे बघ…!!” … शमीनवर रोखलेली तिची नजर आणि त्याच्या दिशेने उगारलेले बोट… कावराबावरा होऊन शमीन आजूबाजूला बघायला लागला. सारे सहप्रवासी त्याच्याकडेच रोखून बघत होते. आणखी काही तमाशा होऊ नये म्हणून लगेच त्याने मान वळवली आणि पुढच्या दिशेने तोंड करून उभा राहिला. सौरभ देखील भांबावून त्याच्याकडे बघत होता. त्याच्यासाठीही हा सारा प्रकार अनपेक्षित होता. बसमध्ये तिच्या कंपनीतील काही कर्मचारी असावेत, नक्कीच असावेत.. त्यांची एव्हाना आपापसात कुजबूज सुरू झाली होती. प्रसंगाने आणखी वेगळा रंग पकडायच्या आधीच सौरभने शमीनचा हात धरून अक्षरशा खेचतच त्याला पुढच्याच स्टॉपवर उतरवले. खाली उतरताच तो शमीनवर जवळजवळ खेकसलाच, “अरे काही अक्कल बिक्कल आहे की नाही तुला??? असे बघतात का एका पोरीकडे?? स्वतापण मार खाल्ला असतास आणि तुझ्या नादात मला पण पडली असती.. बस्स… यापुढे तुझ्याबरोबर मी येणार नाही परत…”

आता शमीन त्याला काय समजावनार होता… झाल्या प्रकाराने तो स्वतादेखील भांबावला होता. त्याचे स्वताचेच स्वताच्या आयुष्यावरचे नियंत्रण सुटले होते, हे आता तो सौरभला कसे पटवून देणार होता?? कोणी ठेवला असता त्याच्यावर विश्वास??

………पण त्या आधी त्याला स्वताला परत एकदा खात्री करून घेणे गरजेचे होते.

ऑफिसमध्ये जराही मन लागत नव्हते. तब्येत बरी नाही सांगून अर्ध्या दिवसानेच शमीन घरी परतला. आईच्या चौकशीकडे लक्ष न देता तडक आपल्या रूममध्ये गेला, बॅग भिरकावून दिली, सरकन ड्रॉवर खेचून डायरी बाहेर काढली आणि……… “पुढे बघ..” ……. तेच शब्द… तीच घटना… जशीच्या तशी… आजच्या तारखेची नोंद करून डायरीत आधीच लिहिली गेली होती.

आता मात्र खरेच शमीनचा भितीने थरकाप उडाला होता. या आधी तो जे डायरीमध्ये लिहायचा तसेच घडत होते, पण आता मात्र डायरी स्वताच त्याचे आयुष्य घडवत होती. आणि जे घडत होते ते सारे विपरीत घडत होते. जे त्याला नको होते नेमके तेच घडत होते. आणि हे सारे थांबवणे त्याच्या आवाक्याबाहेरचे होते. मुळात हे घडतच कसे होते हेच त्याच्यासाठी एक गूढ होते. अजूनही शमीन डोळे फाडून फाडून डायरीच्या पानांकडे बघत होता. एक खेळ होत होता ज्यात तो पुरता अडकला होता. पण आता सांगतो कोणाला?? कारण खेळ सुरू करणाराही तोच तर होता. ज्यातून बाहेर पडायचा मार्ग आता त्यालाच सापडत नव्हता. यालाच चक्रव्यूह म्हणत असावे का??

………..पण त्याचवेळी
अजूनही शमीनला ती हवी होती.. या ही परिस्थितीत त्याला तिचा चेहरा आठवावासा वाटत होता.. पण आता आपण तिच्या मागे गेलो की परत काही तरी विस्कोट होणार याची त्याला भिती वाटत होती. हा गुंता सोडवायला कोणाच्या तरी मदतीची त्याला गरज होती. आणि अश्यावेळी त्याच्या डोळ्यासमोर एकच व्यक्ती आली. काही का होईना, उद्या आता हे सारे सौरभला सांगायचे असे त्याने मनोमन ठरवले.
.

—————————————— भाग -४ (अंतिम भाग) ——————————————-

.
.

………………………………………………………………………………………………………..

.
.

शमीन एकेक घटना सांगत होता तसे सौरभच्या चेहर्‍यावरचे भाव बदलत होते. अविश्वास आणि थट्टेच्या जागी गांभीर्य येत होते. खरे तर हे असे काही घडत असावे यावर सौरभचा म्हणावा तसा विश्वास बसला नव्हता, पण निदान तो शमीनची वेड्यात गिणती करत नव्हता. जे काही घडत होते, घडत असावे त्या मागचे स्पष्टीकरण सौरभलाही सुचत नव्हते. पण तरी त्याच्या डोक्यात सर्वप्रथम आली ती डायरी, जी या सार्‍या प्रकरणाच्या मुळाशी होती… तिलाच जाळून टाकले तर… शमीनलाही त्याचे म्हणने काही अंशी पटले… जर खरेच डायरीत लिहिलेले घडत असेल तर ती डायरीच का नष्ट करू नये??

सौरभला खरे तर ती डायरी बघायची होती. कारण गेल्या दोन घटनांचा तो देखील साक्षीदार होता. पण शमीनने मात्र आता वेळ न दवडता आजच्या आज ती डायरी जाळून टाकायचे ठरवले.

रात्री जेवण झाल्यावर शमीन स्वयंपाकघरातील काडेपेटी घेऊनच आपल्या रूममध्ये गेला. घरातले सारे झोपी गेल्यावरच डायरी जाळणे योग्य राहिले असते. म्हणून शमीनने उशीरापर्यंत जागायचे ठरवले. तोपर्यंत चाळा म्हणून मग परत त्याने डायरीच वाचायला घेतली. गेले काही दिवस अघटीत घडले असले तरी त्या आधीच्या काही हव्याहव्याश्या वाटणार्‍या आठवणी होत्या त्या डायरीत. त्या काही दिवसांचे वाचताना शमीनला वाटले की ही पाने फाडून बाजूला काढून डायरी जाळली तर… पण नकोच ते.. का विषाची परीक्षा घ्या.. डायरीची ती पाने पुन्हा पुन्हा वाचताना त्याचा पडल्यापडल्याच डोळा लागला. मध्यरात्री कधीतरी पाने फडफडल्याचा आवाज झाल्याने जाग आली तर ती डायरी तशीच त्याच्या छातीवर होती. घरातील सारे झोपले होते. हीच संधी साधून त्याने मागच्या दाराने बाहेर अंगणात जाऊन त्या डायरीची पाने-पाने सुटी करून, ती जाळून, त्याची सारी राख घरामागून वाहणार्‍या नाल्यात टाकली आणि परत आपल्या जागेवर येऊन झोपला.

………….तरी त्याला अजून सुटल्यासारखे वाटत नव्हते. एक दडपण, एक अस्वस्थता अजूनही होती. अजूनही डायरीची पाने फडफडल्याचा आवाज ऐकू येत होता. पण यावेळी मात्र तो कुठूनतरी लांबवरून आल्यासारखा वाटत होता.

सकाळी अलार्म वाजल्याच्या आवाजानेच शमीनला जाग आली. पाहतो तर डायरी त्याच्या जवळच पडली होती. म्हणजे काल रात्री त्याने स्वप्नच पाहिले होते. डायरी जाळायची आपली हिंमत नाही, किंवा हा यातून सुटकेचा मार्ग नाहीच आहे हे आता तो समजून चुकला. डायरीने त्याच्या मनाचा, डोक्याचा आणि त्यांतील विचारांचा ताबा घेतला होता. त्याच्या हातून तरी आता ती नष्ट होणार नव्हती.

दुसर्‍या दिवशी शमीन ती डायरी सौरभला दाखवायला म्हणून आपल्याबरोबर ऑफिसला घेऊन गेला. कदाचित सौरभ यातून काही मार्ग काढू शकेल, कदाचित त्याला ही जाळून टाकणे किंवा हिची विल्हेवाट लावणे शक्य झाले असते. ऑफिसमध्ये पोहोचताच दोघेही ती डायरी घेउन तडक कॅन्टीनमध्ये गेले. सौरभसमोरच शमीनने ती डायरी उघडली आणि एकेक पान उलटत त्याला ती डायरी वाचून दाखवू लागला. गेले महिना-दोन महिने जे काही घडत होते, शब्द न शब्द, एकेक घटना जशीच्या तशी.. त्या दिवशीच्या बसमधील घटनेबद्दलही सौरभने शमीनला जबाबदार धरले होते पण त्याची देखील आधीच डायरीत नोंद होती.. जसे शेवटचे पान संपवून शमीनने सौरभकडेकडे पाहिले तेव्हा सौरभचा चेहर्‍यावर देखील भितीचे सावट पडले होते. त्याने ती डायरी शमीनच्या हातातून खेचून बंद केली आणि याची कुठे वाच्यता करू नकोस असे बोलून ती आपल्याबरोबरच घेऊन निघून गेला.

.
.

………………………………………………………………………………………………………………………..
………………………………………………………………………………………………………………………..

.
.

डॉ. फडके, एक नावाजलेले मानसोपचारतज्ञ.. किडकिडीत शरीरयष्टीचे पण प्रथमदर्शनीच एक असाधारण व्यक्तीमत्व वाटावे अशी देहबोली, बोलण्यात कमालीचा गोडवा आणि हळूवारपणा.. हवे तर जादूच म्हणा ना.. संमोहनशास्त्रावर यांची खास मास्टरी… आजवर गुंतागुंतीच्या बर्‍याच केसेस यांनी सहजगत्या सोडवल्या होत्या. अर्थात तशीच गुंतागुंतीची केस असल्याशिवाय ते लक्षही घालत नसत. थोडक्यात सांगायचे तर बाप होते त्यांच्या क्षेत्रातील. मोठ्या मुश्किलीने सौरभने त्यांची अपॉईंटमेंट घेतली होती. खरे तर त्यांच्याशी संपर्क साधणेच अवघड होते, पण जेव्हा सौरभने शमीनबद्दल त्यांना सांगितले तेव्हा ही केस तशीच खास आणि अर्जंट आहे हे जाणून त्यांनी स्वताहूनच संध्याकाळची अपॉईंटमेंट दिली होती.

आपण एक मानसोपाचाराच्या दृष्टीने क्रिटीकल केस आहोत ही भावना शमीनच्या मनावरचे दडपण वाढवत होती. पण त्याच वेळी आणखी उशीर होण्याआधी योग्य जागी पोहोचलो आहोत ही गोष्ट दिलासा देखील देत होती. कदाचित आपण खरेच मनोरुग्ण असू, आपल्याल वेडही लागले असावे, पण हे असले अतार्किक काही घडू शकत नाही यावर शमीनचा अजूनही विश्वास होता, ही एक सकारात्मक बाब होती. त्याच्या दृष्टीनेही आणि डॉ. फडके यांच्या दृष्टीनेही. आता हे का आणि कसे घडत असावे याची कारणमीमांसा करायचे काम शमीनने डॉ. फडक्यांवर सोडायचे ठरवले.

डॉ. फडक्यांचे अंधेरी हायवेवरील क्लिनिक हे इतर दवाखान्यांपेक्षा वेगळेच होते. संपूर्णपणे पांढर्‍या रंगाचे ईंटीरीयर आणि पार्श्वभूमीला मंदपणे वाजणारी “ओssम.. ओssम….” ची धून त्यांना आल्याआल्या एका वेगळ्याच वातावरणात घेऊन गेली. डॉ. फडक्यांनी शमीनला जास्त वेळ वाट बघायला लावली नाही. थोड्याच वेळात त्याला त्यांच्या केबिनमधून बोलावणे आले. सौरभलाही त्याच्या बरोबर यायला सांगितले. सुरुवात नेहमीसारखी औपचारिक संभाषणाने झाली. शमीनबद्दल त्यांनी बरीचशी माहिती सौरभशी फोनवर बोलून आधीच गोळा केली होती. जुजबी बोलणे करून डॉक्टरांनी सरळ विषयाला हात घातला. पहिल्यांदा त्या मुलीला पाहिल्यापासून, डायरी लिहायचे खूळ शमीनच्या डोक्यात शिरल्यापासून ते कालपर्यंतच्या सार्‍या घटना शमीन त्यांना सविस्तर वर्णन करून सांगू लागला. आपले तिच्या मागे मागे जाणे, तिने भाव न देणे, म्हणून मग आपले तिचे लक्ष वेधून घेण्यासाठी, तिला मिळवण्यासाठी प्रयत्न करने, त्यात काही प्रमाणात यशस्वी होणे, पण मग अचानक सारे काही विपरीत घडणे, आणि याला जबाबदार असणारी ती डायरी… आधी त्या डायरीचे आपल्या तालावर नाचणे, आणि मग आपल्यालाच तिचे घुमवणे.. शमीन एका विश्वासानेच सारे कथन करत होता आणि डॉ. फडके सारे मन लाऊन ऐकत होते.

शमीनचे सारे ऐकून घेतल्यानंतर त्यांनी आपल्या ड्रॉवरमधून एक डायरी काढून ती शमीनच्या हातात दिली. ती डायरी शमीनचीच होती. डॉ. फडक्यांनी ती आधीच सौरभकडून मागून घेतली होती. शमीनला त्यांनी त्यातील गेल्या चार-पाच दिवसांच्या घटना पुन्हा एकदा वाचायला सांगितल्या. शमीन वाचत होता आणि ते दोघे शमीनच्या हालचाली, त्याच्या चेहर्‍यावरचे भाव न्याहाळत होते. वाचताना मध्येच त्याने डॉ. फडक्यांकडे पाहिले तसे त्यांनी नजरेनेच त्याला पुढे वाचायला सांगितले. आपले बोलणे डॉक्टर सरांना पटतेय हे बघून शमीन परत पुढे वाचू लागला. त्याचे वाचून झाले तसे डॉ. फडक्यांनी आपल्या ड्रॉवरमधून आणखी एक तशीच डायरी बाहेर काढली आणि शमीनच्या हातात दिली. शमीनच्याच कंपनीची डायरी असल्याने अगदी त्याच्या डायरीसारखीच होती ती. सहज कुतुहलाने त्याने काही पाने चाळून पाहिली तर जवळपास कोरीच होती. प्रश्नार्थक नजरेने त्याने डॉक्टर फडक्यांकडे पाहिले. तसे ते म्हणाले, “आता त्या डायरीचे पहिले नावाचे पान बघ…”

शमीनला पाहताच धक्का बसला. पहिल्या पानावर त्याचेच नाव लिहिले होते. खालोखाल घरचा अ‍ॅड्रेस, ऑफिसचा एक्स्टेंशन नंबर, त्याचा मेल आयडी, ब्लड ग्रूप ए पॉजिटीव्ह… ही खरी शमीनची डायरी होती. पण मग ती कोरी कशी?? सुरुवातीची दोनचार पानेच काय ती भरली होती.. पुढचे लिहिलेले कुठे गेले?? आणि मगाशी वाचली ती डायरी.. ती कोणाचे होती?? ती जर आपली नव्हती तर त्यात लिहिलेले… ते कुठुन आले? त्यात कोणी लिहिले? आणि यातले कुठे गेले? … थोड्याश्या अविश्वासानेच शमीनने पुन्हा पहिली डायरी उघडली. तर त्यात पहिल्या पानावर सौरभचे नाव होते. म्हणजे एवढा वेळ तो ज्या डायरीत बघून सारे वाचत होता ती सौरभची डायरी होती.. दोघांच्या डायर्‍या ऑफिसच्याच असल्याने सारख्याच होत्या. आत चाळून पाहिले तर पहिल्या चार-पाच पानांवर सौरभने ऑफिसच्या कामासंदर्भात काही लिहिले होते. पण पुढे मात्र कोरीच होती. आता मात्र शमीनच्या चेहर्‍यावर हजार प्रश्नचिन्ह उमटली होती.. आणि हे पाहूनच डॉक्टर फडक्यांनी सारी सुत्रे आता आपल्या हातात घेतली आणि बोलायला लागले,

“हे बघ शमीन, सर्वात पहिले म्हणजे आपल्या मनातून काढून टाक की तुला वेड वगैरे काही लागले आहे. आणि आता मी काय सांगतो ते अगदी शांतपणे ऐक. हा एक मानसिक आजार आहे. जसे सर्दी, ताप, खोकला यांसारखे छोटे-मोठे आजार असतात तसाच हा देखील एक, आणि याचा उपचार सुद्धा आपण तसाच करणार आहोत.

तर… यात घाबरण्यासारखे काही नाही.

काय होते ना शमीन, कधी कधी आपण एखाद्या गोष्टीचा, एखाद्या घटनेचा एवढा विचार करतो की ती सारखी आपल्या आसपास घडत आहे असा आपल्याला भास होतो. तर कधी एखादी घटना घडून गेल्यावर असे वाटते की आपण हे या आधी पण अनुभवले आहे किंवा आपल्याला हे आधीच ठाऊक होते की हे असेच घडणार..” डॉ. फडके त्याच्याशी एखाद्या मित्राशी गप्पा मारल्यासारखे बोलत होते. कदाचित हीच त्यांची ट्रीटमेंट करायची खासियत असावी.

“तसेच तू दुहेरी व्यक्तीमत्वाबद्दल कुठेतरी वाचले असशील किंवा एखाद्या सिनेमात पाहिले असशीलच..” डॉ. फडक्यांनी उत्तराच्या अपेक्षेने क्षणभर शमीनकडे पाहिले. पण तो मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्याच्या स्थितीत नव्हता हे त्यांनी ओळखले आणि स्वताहूनच पुढे सुरू झाले..

“ओके.. दुहेरी व्यक्तीमत्व.. ज्याला आमच्या मेडीकल टर्ममध्ये मल्टीपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असेही बोलतात. यात काय होते ना, आपल्यातीलच व्यक्तीमत्वाचा एक पैलू आपल्याही नकळत बाहेर पडतो. जो बर्‍याचदा आपल्या मूळ स्वभावाच्या अगदी विरुद्ध असतो. आणि मुळात हेच याचे कारण असते. आपल्या एखाद्या विशिष्ट स्वभाव वैशिष्टयाबद्दल आपल्याला कमीपणा वाटू लागतो, आणि कालांतराने तो एवढा वाढतो की एकाक्षणी आपल्याला असे वाटू लागते की आपल्या या स्वभावाने आपण बरेच काही गमावले आहे. आता तरी आपण बदलले पाहिजे. पण स्वभावबदल हा असा अचानक क्रांतीसारखा घडणे शक्य नसते. पण तरीही आपण तो घडवायला जातो. काही अंशी आपण यात यशस्वीही ठरतो, तरीही चोवीस तास तसेच वागता येत नाही परिणामी आपण एकाच वेळी दोन व्यक्तीमत्वे जगायला सुरुवात करतो. सुरुवातीला आपल्यातील ठराविक काळासाठी होणारा हा बदल आपल्याला चांगला वाटू लागतो आणि त्यामुळे आपणच त्याला खतपाणी घालतो. पण हळूहळू आपला त्याच्यावरील कंट्रोल सुटत जातो, जो खरे तर मुळातच फारसा नसतो. आणि मग गुंता वाढत जातो.. तुझ्या बाबतीत पण असेच काहीसे घडत आहे…”

अजूनही शमीन भांबावलेल्या अवस्थेतच होता. डॉक्टर फडक्यांना हे अपेक्षितच होते. त्यांनी आपले बोलने न थांबवता तसेच पुढे चालू ठेवले, “तर.. ही झाली थिअरी, आता याचा तुझ्याशी कसा संदर्भ लागतो हे आपण बघूया, नाही का..”, तसा शमीन आता उत्सुकतेने ऐकू लागला. सौरभही आपली खुर्ची सरसावून बसला.

“तु त्या मुलीमध्ये, काय तिचे नाव.. हा अमृता.. तर तू त्या अमृतामध्ये जरा जास्तच गुंतलास. दिवसरात्र चोवीस तास तिचाच विचार करायचा. त्यात तू तिच्याबद्दल डायरी लिहायला घेतलीस, याचा परिणाम असा झाला की तिच्या विचारांनी तुझ्या मेंदूचा आणखी ताबा घेतला. डायरीत सुरुवातीला जे घडेल ते तू व्यवस्थित लिहायचास, पण जेव्हा त्यात तोचतोचपणा येऊ लागला तेव्हा तुला आपल्या आयुष्यात, या प्रेमकहाणीत काही वेगळे घडावे असे वाटू लागले. पण तुझा बुजरा स्वभाव पाहता ते शक्य नव्हते. आज पर्यंत या स्वभावामुळे कदाचित तू बर्‍याचदा प्रेमात माघार घेतली असावीस. नेमक्या याच गोष्टाचा तुला कुठेतरी त्रास होत होता. या सर्वाचा परीणाम म्हणून मग तुझ्यातील एक लपलेले व्यक्तीमत्व बाहेर पडले. तू स्वता आयुष्यात काही केले नसले तरी उघड्या डोळ्यांनी स्वप्न मात्र बरीच बघितली असणार, की जरा माझ्यात हिंमत असती तर मी असे केले असते, जर मी असा असतो तर तसे केले असते.. बस्स.. हेच तू आता करायला घेतले होतेस. पण हा तुझा मूळ स्वभाव नव्हता. हे जरी तूच करत असला तरी तुझे स्वताचे मन तुला हे पटवून देऊ शकत नव्हते की हे करणारा तू स्वताच आहे. कारण तुझी विचारशक्ती हे मान्य करायला तयारच नव्हती की तू स्वता हे करू शकतोस. मग आता स्वताच्याच बुद्धीला हे पटवायचे कसे?? आणि म्हणूनच तुझ्या मनाने डायरीचा आधार घेतला. तू डायरी मध्ये काही लिहित नव्हतास, जे घडत होते ते तूच घडवत होतास, आपल्या बदललेल्या व्यक्तीमत्वाच्या जीवावर. तरी तू स्वताची अशी समजूत घातली असल्याने की हे सारे डायरीमुळे घडतेय, घरी आल्यावर जेव्हा तू डायरी बघायचास तेव्हा तुला घडलेली घटना आपण आधीच लिहिलेली आहे असे त्यात दिसायचे. ते शब्द म्हणजे निव्वळ भास होता. तुझ्याच मनातील विचार तुला त्या कोर्‍या पानांवर शब्दरुपात दिसत होते. डायरी उघडायच्या आधीच ती घटना, ते शब्द तुझ्या अंतर्मनात छापले गेले असल्याने त्या पलीकडे जाऊन तू कधी विचार करूच शकला नाहीस. आता त्या दिवशीचे ताजे उदाहरणच घे ना, तू आधी त्या मुलीकडे चोरून चोरून बघायचास पण त्या दिवशी बसमध्ये मात्र बेधडक बघू लागलास, आणि त्यावर त्या मुलीची प्रतिक्रिया योग्य अशीच होती. तिचे चिडणे साहजिकच होते. पण याला जबाबदार सुद्धा तू डायरीला धरलेस. आणि घरी गेल्यावर तुला ते डायरीत दिसायला लागले. कारण तुला तुझ्या त्या दुहेरी व्यक्तीमत्वाला दोषी ठरवायचे नव्हते. परिणामी जे घडले ते परत तुला डायरीत दिसू लागले किंवा तू ते बघू लागलास..”

डॉ. फडके बोलायचे थांबले आणि शमीनकडे बघू लागले. शमीनला स्वताहून त्याच्या डोक्यातील गुंता सोडवायला त्यांनी थोडा वेळ दिला.. आता ते शमीनकडून प्रश्नांची अपेक्षा धरून होते.

“…………”

“ह्मम.. विचार विचार, डोक्यात काही ठेऊ नकोस.”

“पण मग.. बसचा संप आणि पाऊस… ?? त्याचे काय .. ?? ” बर्‍याच वेळाने शमीन कसेबसे एवढेच उत्तरला.

“अच्छा.. ते कसे डायरीत लिहिल्याप्रमाणे घडले असावे हेच ना..? पण मुळात तू स्वताच मगाशी पाहिलेस की डायरी तर कोरीच होती. म्हणजे तसे काही घडावे अशी नोंद मुळात तू डायरीत केली नव्हतीसच. पण मग आता नक्की झाले काय… तर जेव्हा तू तिच्याबरोबर एकत्र रिक्षाने प्रवास करायचा अनुभव घेत होतास तेव्हा तुझ्या मनात हा प्रवास असाच लांबावा, रोज रोज घडावा किंवा छानसा पाऊस पडून मस्त रोमॅंटीक वातावरण तयार व्हावे असे येत असणारच.. खरे तर एवढेच नाही तर अश्या बर्‍याच कल्पना मनात येत असाव्यात. पण त्यातील ज्या एक-दोन कल्पना प्रत्यक्षात उतरल्या त्याचा संबंध तू डायरीशी जोडलास. बसचा संप फिस्कटने ही काही फार मोठी बाब नाही, तसेच ऑगस्ट महिन्यात पाऊस पडणे यातही काही नवल नाही. पाऊस पडावा हे तुला आतून रोजच वाटत असावे, पण पाऊस नेमका ज्या दिवशी पडला त्या दिवशीच तुला ते तसे डायरीत लिहिल्याचे दिसले… किंवा जसे आपण मगाशी पाहिले की तुझ्या मनाने तुला ते दाखवले..

शमीनला हळूहळू सारे पटू लागले होते. तसा मुळातच तो बुद्धीवादी जीव होता. पण तरीही आपल्याशी जे घडत होते तो निव्वळ भास होता, आपल्याच मनाचा खेळ होता हे पचवने त्याला जड जात होते.

सौरभनेच मग शांततेचा भंग केला, “थॅन्क यू सर, आज तुमच्यामुळे माझा मित्र मोठ्या संकटातून वाचला.”

तसे डॉक्टर लगेच उत्तरले, “नाही नाही, इतक्यात नाही. आता हे आपण फक्त रोगाचे निदान केले आहे, उपचार करायचा अजून बाकी आहे.”

“म्हणजे?” शमीन दचकूनच म्हणाला, “आता मला समजले आहे ना सारे, की हा माझा निव्वळ भ्रम होता, मग आता अजून उपचार असा काय बाकी आहे.”

“त्याचीच तर भिती आहे..” डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलू लागले, “आता हे जसे तुला समजले आहे तसेच तुझ्यातील त्या दुहेरी व्यक्तीमत्वाला देखील समजले आहे. आता तो तुझ्यावर हावी व्हायचा प्रयत्न करणार. तुला स्वताला ती आवडत असली तरी तू आपल्या मर्यादेत राहून तिला मिळवायचा प्रयत्न करणार. आणि तुझे ते आभासी व्यक्तीमत्व मात्र कोणत्याही मार्गाचा अवलंब करायला मागेपुढे पाहणार नाही. खरा प्रॉब्लेम तर तेव्हा सुरू होणार जेव्हा या दोन व्यक्तीमत्वांच्या लढाईत तुझी मानसिक ओढाताण होणार. आणि त्यांच्यात कोणीही जिंको.. हार मात्र तुझीच होणार.

“पण मग यावर उपाय काय??”, शमीनच्या आधी सौरभनेच उत्सुकतेने विचारले.

“ह्म्म, उपाय तर आहे, पण त्या साठी शमीनच्या मनाची पुर्ण तयारी हवी..” डॉक्टर शमीनकडे बघत म्हणाले,
“म्हटले तर खूप साधा सोपा उपाय आहे पण जर तुझ्या मनाने विरोध केला तर कधीच शक्य होणार नाही असा…..”

“……. काही समजले नाही”

“तुला त्या मुलीला विसरावे लागणार शमीन… अगदी पूर्णपणे विसरावे लागणार.. विसरणे म्हणजे तिला आपल्या विचारांतूनच काढून टाकणेच नाही… तर…, तिची आठवण, तिचे विचार, तिच्याशी संबंधित सार्‍या काही गोष्टी तुला तुझ्या मनातून, डोक्यातून कायमचे काढाव्या लागणार. जसे कॉम्प्युटरची एखादी डिस्क फॉर्मेट करतात किंवा त्यातील अनावश्यक भाग तेवढा इरेज करतात. अगदी तसेच अमृता नावाचा चाप्टर तुझ्या डोक्यातून आपल्याला आजच, आताच क्लोज करावा लागणार. जरा जरी काही मनात राहिले तर पुढे मागे परत द्विधा मनस्थितीत अडकशील आणि मग मेंटल डिसऑर्डरची शक्यताही नाकारता येणार नाही…. ज्याचा परीणाम तुला वेड लागण्यापासून ब्रेन हॅमरेजने मृत्यू ओढावणे पर्यंत काहीही होऊ शकतो…”

“……………………”

डॉ. फडके बोलत होते आणि शमीन शून्यात बघितल्याप्रमाणे त्यांच्याकडे नजर लाऊन ते सारे ऐकत होता. हा उपाय होता की शिक्षा हेच त्याला समजत नव्हते. आणि गुन्हा देखील असा काय तर, एखादीवर गरजेपेक्षा जास्त प्रेम करणे..

तिला न विसरता आपल्यातील ते दुसरे व्यक्तीमत्व बाहेर काढून फेकता येणार नव्हते का?? परत आपण पहिल्यासारखेच तिला लांबून बघत राहू. खूश होतो आपण यातच. ती मिळालीच पाहिजे असा काही हट्ट नाहिये माझा. पण तिला विसरायला नका सांगू….

शमीनच्या चेहर्यावर एक प्रकारची उदासी आली होती जी डॉक्टर फडक्यांनी बरोबर हेरली.

“हे बघ शमीन, जर तू इतर कुठे गेला असतास किंवा एखादा मांत्रिक तांत्रिक केला असतास तर त्याने तुला एखादा गंडा-दोरा दिला असता. ती शुद्ध फसवणूक असते असे मी नाही म्हणनार. कारण जर त्याच्यावर तू श्रद्धेने विश्वास ठेवला असता तर नक्कीच काही काळापुरता तू मानसिकदृष्ट्या सक्षम झाला असतास. पण जशी एखादी हलकीशी विपरीत घटना घडली असती तसे लगेच तुझा त्याच्यावरचा विश्वास उडाला असता आणि तू कमजोर पडला असतास. म्हणून जर हा आजार मुळापासून बरा करायचा असेल तर हाच एक मार्ग आहे आणि तो देखील आज आता ताबडतोब अंमलात आणायची गरज आहे. आणखी उशीर करून चालणार नाही. कारण, ती मुलगी अजूनही तुझ्या मनात असल्याने तू कितीही ठरवलेस तरीही स्वताच्याच नकळत त्या आभासी व्यक्तीमत्वाला पुन्हा उसळी घ्यायला तू स्वताच मदत करणार. म्हणून हे सारे इथेच थांबवावे लागणार..” डॉ. फडके यावेळी स्पष्टच आणि निर्णायक म्हणाले.

शमीन अजूनही शांतच बसला होता. डॉक्टर फडके त्याच्या मौनालाच होकार समजून पुढच्या तयारीला लागले. शमीन जरी द्विधा मनस्थितीत असला तरी त्यांना पक्के ठाऊक होते की या परिस्थितीत काय करायचे आहे. शमीनचे चित्त शांत व्हायला त्यांनी त्याला अर्ध्या तासाचा ब्रेक दिला. पण सौरभला मात्र त्याच्याच बाजूलाच बसायला सांगितले. त्याने सवयीप्रमाणे इकडच्या तिकडच्या गप्पा मारून शमीनला रिलॅक्स करायचा प्रयत्न केला पण त्याचा फारसा काही फायदा झाला नाही.

जवळपास वीस-पंचवीस मिनिटांनी डॉक्टर परत आले. शमीन आता बर्‍यापैकी संतुलित दिसत होता. त्याला त्यांनी जवळच असलेल्या एका आरामखुर्चीवर बसायला सांगितले. आरामखुर्ची खरेच खूप आरामदायक होती. बसल्याबसल्याच झोपावे असे वाटणारी. मगासपासून शमीनच्या डोक्याला जो ताण आला होता तो बसताक्षणीच जरासा निवळल्यासारखा वाटला. रूममधील दिवे मंद केले गेले. एअर कंडीशनची सेटींग चेंज केली तसे कसलातरी दर्प नाकात शिरला. हळूहळू शमीनला आपले डोके जड झाल्यासारखे वाटू लागले. डॉक्टर फडके त्याच्या समोर येऊन उभे राहिले आणि इशार्‍यानेच त्याला न घाबरता थोडावेळ तसेच पडून राहण्यास सांगितले. सौरभ रूम मध्ये होता की नाही हे ही शमीनला समजत नव्हते. मान वळवून त्याला बघणेही अंगावर आले होते. पण आता डॉक्टर साहेबांनी शमीनचा ताबा घेतला होता.. प्रश्नोत्तरांचा राऊंड सुरू झाला होता..

“नाव काय आहे तुझे?”

“शमीन”

“पुर्ण नाव?”

“शमीन नाईक”

“कुठे राहतोस?”

“माझगावला..”

“घरी कोण कोण आहेत?”

“आई, बाबा…”

“काम काय करतोस?”

“सिविल ईंजिनीअर आहे…”

“आता जॉबला कुठे आहेस?”

“ऑब्लिक कन्सलटंट प्रायवेट लिमिटेड…”

“कुठे आली ही कंपनी?”

“कांदिवलीला…”

“ऑफिसला कसा जातोस?”

“ट्रेनने…”

“सकाळी घरून किती वाजता निघतोस?”

“साडेसातला…”

“ऑफिसला कधी पोहोचतोस?”
……..
…..

डॉक्टर प्रश्न विचारत होते आणि शमीन जेवढ्यास तेवढे निमूटपणे उत्तर देत होता. त्याला आधी वाटले होते की लंबक वगैरे फिरवून आपल्याला संमोहीत केले जाईल. पण अजूनपर्यंत डॉक्टरांनी तसे काही केले नव्हते. किती प्रश्न विचारले गेले, किती अजून विचारले जाणार, त्याला काही समजत नव्हते. अजूनपर्यंत त्यांनी अमृताबद्दल काहीच विचारले नव्हते. थोड्यावेळाने त्याला असे वाटू लागले की आपल्याला आता गाढ झोप येत आहे. आणि हळूहळू आपण चक्क झोपतही आहोत. तरीही प्रश्न तसेच सुरू होते. जणू काही डॉक्टर आपला स्वप्नातही पिच्छा सोडणार नव्हते. पण शमीन मात्र शहाण्या बाळासारखे त्यांच्या सार्‍या प्रश्नांची उत्तरे देत होतो. हे संपवून त्याला गाढ झोपी जायचे होते…

डॉक्टरांनी अचानक अमृताचा विषय काढला आणि तिचे नाव न घेताच थेट विचारले,
“किती प्रेम करतोस त्या मुलीवर?”

“प्रेमात किती वगैरे असे काही नसते.. जे काही करतो ते तिच्यावरच करतो.. ती सोडून दुसर्‍या कोणत्या मुलीकडे बघावेसे वाटत नाही.. की इतर कोणाचा साधा विचारही मनात येत नाही.. दिवसरात्र मी तिच्याच विचारात असतो.. तिला वजा केल्यास माझ्या आयुष्यात काही उरणार नाही..”

एवढा वेळ एका शब्दात उत्तर देणारा शमीन अचानक भावनांचा बांध सुटल्याप्रमाणे मनातील सारे रिकामे करू लागला.

“पण तिचे तुझ्यावर प्रेम आहे का?” डॉक्टर सरांनी मध्येच टोकले.

काय फरक पडतो…?? …. शमीनच्या ओठावर आलेले शब्द तसेच विरले..

“नाही.., माहीत नाही”

“मी सांगतो ना, तिचे तुझ्यावर जराही प्रेम नाही. प्रेम तर सोड, राग करते ती तुझा.. तुझा अपमान करायची एकही संधी सोडत नाही ती.” डॉ फडक्यांनी वर्मावरच घाव घातला.

“नाही तुम्ही खोटे बोलत आहात, तसे काही नाहिये.” शमीन कासावीस होत उत्तरला.

“अच्छा, मग त्या दिवशी काय म्हणाली ती तुला सर्वांसमोर… आठवतेय, की मी सांगू… तुला तिच्याबद्दल एवढे वाटते पण ती मात्र तुला जराही भाव देत नाही.. विसर तिला शमीन, मुलींची काय कमी आहे का जगात, एक गेली दुसरी मिळेल.. तसेही ती तुझ्या योग्यतेची नाही आहे.. एवढा हुशार तू, एवढा शिकलेला आहेस, आईवडिलांचा एकुलता एक लाडका मुलगा, लग्नाला उभा राहिलास तर मुलींची लाईन लागेल… काय ठेवलेय तिच्यात.. काढून टाक तिचा विचार आपल्या मनातून..” डॉ. फडके अक्षरशा जिव्हारी लागेल अश्या टोनमध्ये शब्दफेक करत होते. पण शमीन मात्र या क्षणी त्यांच्याच संमोहनाच्या प्रभावाखाली होता.

“हो… खरे आहे… पण तरीही… तिच्या सारखी मुलगी मला नाही मिळणार कुठे…” शमीनच्या बोलण्यातील आत्मविश्वास आता डळमळीत होऊ लागला होता. तसेही गेल्या एकदोन घटना पाहता तिच्यापासून शमीन दुखावला गेला होता हे खरेच होते. त्याचे तिच्यावर प्रेम असले, आणि तो तिच्या कितीही योग्यतेचा असला तरी ती आपल्याला मिळण्याची शक्यता कमी आहे हे त्यालाही ठाऊक होते. डॉक्टरांच्या शब्दांवर त्याचा आता विश्वास बसू लागला होता. किंवा खरे तर तेच त्याच्या सोयीचे होते. ती आपल्याला मिळू शकत नाही यापेक्षा ती आपल्या योग्यतेचीच नव्हती अशी मनाची समजूत घालायला शमीनने सुरुवात केली. डॉ. फडकेंना हेच हवे होते. शमीनच्या डोक्यातून तिचे विचार काढून टाकण्यासाठी आधी त्याच्या मनातील तिच्याबद्दल असलेल्या प्रेमभावना कमजोर पाडणे गरजेचे होते. त्याचे मन या काही क्षणांसाठी कमकुवत करणे गरजेचे होते.

“डोळे उघडून बघ शमीन, जवळपास किती सुंदर मुली आहेत. आणि काय कमी आहे तुझ्यात….” डॉक्टर फडकेंचे शमीनचे ब्रेनवॉश करणे सुरूच होते.

मध्येच हळूवार बोलत तर मध्येच कडक भाषा वापरत हळूहळू डॉक्टरांनी शमीनच्या मनाचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. आता पुढचे काम डॉक्टर सरांसाठी सोपे झाले होते. हीच योग्य वेळ आहे हे जाणून डॉक्टरांनी शमीनच्या डोक्यात त्यांना हवी ती माहिती भरायला सुरूवात केली… ते जसे बोलत होते, तेच आता शमीन बोलत होता…

“अमृता नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही… माझे नाव शमीन नाईक असून मी एक ईंजिनीअर आहे… मी माझगावला राहतो… मी कांदिवलीला कामाला आहे… रोज सकाळच्या साडेसातच्या ट्रेनने प्रवास करतो… तिथून बस पकडून थेट ऑफिस गाठतो… ऑफिसमधील माझे काम उरकले की संध्याकाळी परत तसाच उलटा प्रवास… आधी बसने स्टेशनला येतो मग तिथून ट्रेनने घरी… या प्रवासात ना मला कोणी भेटते ना मी कोणाला ओळखत… अमृता नावाच्या कोणत्याही मुलीला मी ओळखत नाही… माझे कोणत्याही मुलीवर प्रेम नाहीये… अमृता हे नावही मी कधी ऐकलेले नाहीये… कॉलेजमध्ये असताना शमिता नावाची मुलगी मला आवडायची… तेच माझे शेवटचे प्रेम.. त्यानंतर मी कोणत्याही मुलीच्या प्रेमात पडलो नाही… आता माझी झोपायची वेळ झाली आहे… मला झोप येत आहे… मला झोप आली आहे… आता मी झोपलो आहे… अगदी गाढ झोपलो आहे………!!

.
.

…………………………………………………………………………………………………………………….
…………………………………………………………………………………………………………………….

.
.

आज सकाळी शमीनला आपला मूड काहीतरीच फ्रेश वाटत होता. खूप दिवसांचा आळस झटकून उठल्यासारखे वाटत होते. प्रत्येक पहाट एवढी रमणीय असते की आजच काही खास वाटत होते ठाऊक नाही पण मुद्दामच त्याने आज नवीन कपड्यांचा जोड बाहेर काढला. आई देखील म्हणाली, “वाह., क्या बात है.. आज माझे पिल्लू एकदम हिरो बनून चाललेय ऑफिसला..” … पण खरेच, रस्त्याने चालतानाही आज त्याला वेगळाच उत्साह वाटत होता, जसे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जाताना प्रत्येक मुलाला वाटते. रोजचाच रस्ता असूनही त्याने नवीन कात टाकल्यासारखी वाटत होती. पाय नुसते हवेत उडत होते, मनालाही कसलीशी अनामिक हुरहुर लागली होती. ट्रेन थोडीशी लेट आली पण आज नेहमी सारखी त्याने चिडचिड नाही केली. कुठे एवढी घाई होती. ऑफिसमध्ये सर्वात आधी पोहोचून काय झाडू मारायची आहे का, असा विचार करून तो स्वताशीच हसला…

ट्रेन आपल्या ठरलेल्या वेळेला कांदिवली स्टेशनला पोहोचली. नेहमीप्रमाणे कांदिवली स्टेशनच्या बाहेर बसच्या रांगेत जाऊन तो उभा राहिला. रांगेत कोणी ऑफिसचे ओळखीचे दिसते का म्हणून इथे तिथे नजर फिरवू लागला. कोणी खास ओळखीचे दिसले नाही. सौरभही कुठे दिसला नाही. पाच मिनिटे झाली पण बस काही आली नाही. मागच्या ट्रेनने आलेला लोंढा मागे येऊन रांगेत उभा राहिला. मग सवयीप्रमाणे त्यात एखादा बघण्यासारखा चांगला चेहरा दिसतो का म्हणून त्याने पुन्हा नजर फिरवली…. आणि अचानक…. त्याची नजर एका जागी स्थिरावली…. कोण होत्या त्या दोघीजणी… त्यांना या आधीही कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत होते.. त्यातील एकीला तरी नक्कीच… निरखून बघत तो आठवायचा प्रयत्न करू लागला, तसे त्या दोघींचेही त्याच्याकडे लक्ष गेले.. त्यांच्यातील एक जण सहज हसली.. गालातल्या गालातच.. तर दुसरीने उगाचच तोंड फिरवल्यासारखे केले.. शमीननेही मग मुद्दाम मानेला झटका दिला… सुंदर मुलींना का उगाच गरज नसताना भाव खायची हुक्की येते असे त्याच्या मनात येऊन गेले..

इतक्यात बस आली आणि रांग सरकली.. शमीनने पुन्हा एकदा वळून पाहिले, तर त्यांचे लक्ष त्याच्यावरच होते. नजरेत एक ओळख दिसली. पण नक्की काही आठवत नव्हते. त्याच्यापाठोपाठ त्या देखील त्याच्याच बसमध्ये चढल्या. त्या पुढे बसायला गेल्या आणि शमीन मात्र मागेच उभा राहिला. पण त्याची नजर मात्र अजूनही त्यांनाच न्याहाळत होती. कुठे पाहिले असावे बरे यांना या आधी… आपल्या कॉलेजच्या असाव्यात का? की आपल्या शाळेत होत्या? की ट्रेनमध्ये वगैरे कुठे….?? छे..!! काहीच संदर्भ लागत नव्हता.. पण त्यांनी एकदोन वेळा आलटून पालटून मागे वळून पाहिले.. आता मात्र शमीनची त्यांच्याबद्दल जाणून घ्यायची उत्सुकता आणखी चाळवली गेली आणि तो जरासा पुढे सरकून उभा राहिला.. आता त्याला त्यांच्या गप्पा थोड्याफार ऐकू येत होत्या. पण अजून त्यातून काही म्हणावे तसे हाती लागले नव्हते.. कंडक्टरने “कॅप्सूल, कॅप्सूल” करत घंटी मारली आणि आज स्टॉप जरा लवकरच आला असे त्याला वाटले.. उतरायला म्हणून पुढे गेला इतक्यात त्यातील एका मुलीने त्या दुसर्‍या सुंदरश्या मुलीला हाक मारली…….., “अमू……!!”

अमू ????

“……………”

पुढे ती काय बोलतेय म्हणून शमीन क्षणभर तिथेच थांबला, तसे लगेच तिने आपल्या मैत्रीणीला चापटी मारली, “अमू काय ग सारखे… अमृता बोल ना…”

ओहह… अमृता…!!

एवढावेळ शमीनला सारखे वाटत होते की आपण यांना कुठेतरी नक्की पाहिले आहे… आणि आता तिच्या मैत्रीणीने तिला मारलेली हाक… अमू…. अमृता…

छे…!!

या नावाच्या एकाही मुलीला शमीन ओळखत नव्हता… तो आपला निव्वळ भास होता हे त्याला समजून चुकले..

पण मुली दिसायला छान होत्या. खास करून ती अमू.. अमृता.. शमीनला ती आपल्या टाईपची वाटली. कॉलेज सुटल्यावर शमीतानंतर त्याला पहिल्यांदा असे कोणत्या मुलीबद्दल वाटले होते. बस मधून उतरल्यावर मागे वळून पाहण्याचा मोह त्याला आवरला नाही.. तर नेमकी तिच्याशीच नजरानजर झाली.. तिची नजर खिडकीतून शमीनवरच लागली होती.. दोघांच्या पापण्या किंचित फडफडल्या.. शमीनला हा इशारा पुरेसा होता..

आई खरेच बोलत होती, आज तिचा शमीन बाळ नक्कीच हिरो दिसत होता. कधी हा किस्सा सौरभशी शेअर करून भाव खातो असा विचार मनात येऊन शमीनची पावले ऑफिसच्या दिशेने जरा जास्तच झपझप पडू लागली…..

.
.

xxxxxxxxxxxxx ……… समाप्त ……… xxxxxxxxxxxxx

.
.
.

एक महत्वाचे – कथा अंशतः काल्पनिक आहे.

दुसरे (त्यापेक्षाही जास्त) महत्वाचे – या कथेवर कोणाला मालिका, नाटक अथवा चित्रपट बनवायचा असेल तर त्याने खालील ई-मेल पत्त्यावर लेखकाशी संपर्क साधावा. जेणे करून शमीनच्या भुमिकेसाठी कलाकार शोधायचा त्रास वाचेल.. स्मित
अभिषेक नाईक – abhiabhinaik@gmail.com

.
.

धन्यवाद,
…तुमचा अभिषेक

 

भुताच्या गावात अन बाराच्या भावात . . !

 

तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे ती कोणी साधीसुधी कथा नाही तर एक रहस्यमय अशी भयकथा आहे. मुळात ही कथा नसून आम्हाला आलेला एक अनुभव आहे जो तुम्हालाही विस्मयचकीत करून जाईल. “विस्मयचकीत” हा शब्द जर चुकला असेल तर तसे सांगा हा. कारण असा अनुभव या आधी आयुष्यात कधी आम्हाला आला नव्हता ना, तर नक्की काय म्हणतात हे ठाऊक नाही. आता तुम्ही म्हणाल आम्हाला म्हणजे कोणाला? तर आम्ही म्हणजे मुंबईच्या द.ग.डु. अका दयाराम गजानन डुगडुगकर अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाला असलेल्या आणि वर्गाच्या अंतिम बाकावर बसणार्या सात-आठ टवाळ पोरांचे टोळके. आमची अभियांत्रिकीची चार वर्षे आम्ही एकही गटांगळी न खाता कशी पूर्ण केली यावर एक वेगळी कथा बनेल, पण ती पुन्हा कधीतरी. पण हे अंतिम वर्षही तसेच सुटणार याची खात्री असल्याने शेवटचा पेपर झाला तसे आम्ही दरवर्षीप्रमाणे मौजभ्रमंतीचा म्हणजे पिकनिकचा बेत आखायच्या तयारीला लागलो. आता आमच्या ग्रूपमध्ये चार पोरे गरीबाघरची असल्याने उरलेल्या चार खात्यापित्या घरच्या पोरांना यांच्या खाण्यापिण्याचा खर्चही मैत्रीखात्यात उचलावा लागत असल्याने आमची सहल शिमला-कुल्लू-मनाली सारख्या ठिकाणी जाणे शक्य नव्हते. आणि तसेही हे शेवटचे वर्ष असल्याने परीक्षा पास होण्यासाठी जी सेटींग की काय लावावी लागली होती तिचाही खर्च अंदाजापेक्षा जास्त झाला होता. त्यामुळे पिकनिकचे बजेट तंगच होते. पण म्हणतात ना, “हिंमते मर्दा तो मदते खुदा..” हो ना करता कशीबशी जुळवाजुळव करून आमचा गोव्याला जायचा बेत ठरला.

त्याचे झाले असे, आपल्या बंड्याचे गाव कोकणात दूरवर कुठेतरी होते. गोव्यापासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर. “मौजे येडगाव”, गावाचे नावही कधी ऐकले नव्हते. पण गावाला समुद्रकिनारा मात्र भला मोठा लाभला होता. म्हणजे मौजे येडगावला मुक्काम केला तर तिथून गोव्याला ये-जा करणेही परवडले असते आणि त्याचाही वैताग आला असता तर गावच्या समुद्रकिनारीच धमाल करता आली असती. तर या बंड्याचे चुलत चुलत काका जे सध्या मुंबईतच राहत होते, त्यांनी तिथे एक घर बांधून ठेवले होते. पण ते घर त्यांना मानवले नव्हते म्हणून सध्या तसेच खाली पडून होते. ज्याचा आता पुढचे चार दिवस आम्ही ताबा घेणार होतो.

कोकणकन्या एक्सप्रेस मुंबई छत्रपती टर्मिनसवरून रात्री दहाला सुटणार होती. आम्ही सारे मात्र नऊलाच जमलो होतो. आठ-दहा तासांचा प्रवास म्हणजे जागा पकडणे जरूरी होते. तसा आमचा झोपायचा काही प्लॅन नव्हता. उलट पक्या आणि बाबू सारखी अतरंग कार्टी बरोबर असताना आजूबाजूच्या लोकांनाही झोपायला देऊ की नाही ही शंका होती. पक्याच्या पोटात दोन पेग टाकले आणि त्याला चावी दिली की रात्रभर मनोरंजनाची हमी. कोणी ढोलकीवर थाप मारायचा अवकाश की याची भजन-गाणी सुरूच म्हणून समजा. आजही काही वेगळे चित्र नव्हते. गाडीमध्ये मदिरापान निषिद्ध असल्याने तो आधीच बंड्याच्या जोडीने एकेक खंबा मारून आला होता. रात्री तीन वाजेपर्यंत गाण्यांची मैफिल रंगली. जे पिणारे नव्हते त्यांनाही एक प्रकारची झिंग चढली होती. मित्रांच्या सोबत अश्या रात्री रोज रोज थोडी येतात. आज कोणाचाही झोपायचा मूड दिसत नव्हता. गाणी गाऊन थकलो तशी गप्पांची मैफिल सुरू झाली. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा मारून झाल्यावर बंड्यानेच विषय काढला, “उद्या आपण जिथे मुक्कामाला जाणार आहोत तो भाग ‘भुताची वाडी’ म्हणून प्रसिद्ध आहे. “आईच्या गावात..”, पक्याची सर्वप्रथम प्रतिक्रिया. पाठोपाठ एक कचकचीत शिवी. बंड्याच्या एका वाक्याने पक्याची सारी नशा उतरली होती. पक्या घाबरला तसा त्याचा जोडीदार बाबूही घाबरला. पण आम्ही सारे मात्र यामागचा इतिहास जाणून घेण्यास उत्सुकता दाखवली. आजच्या जमान्यात कोणीही भुताच्या गोष्टी सांगाव्यात आणि आम्ही त्यावर सहज विश्वास ठेवावा एवढे पण काही आम्ही हे नव्हतो. कसेबसे काठावर पास होणारे का असेना, द.ग.डु.ची पोरे होतो.

बंड्याने सांगायला सुरूवात केली, अगदीच काही तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट नव्हती. पण बंड्याच्या खापरपणजोबांच्या काळातील होती. बंड्याचे खापरपणजोबा म्हणजे त्या गावचे जमीनदारच म्हणा ना.. कै. विष्णूपंत मोरोजी राणे, सहा फूटांच्या वर धिप्पाड शरीरयष्टी, करारी मुद्रा, त्याला साजेश्या अश्या पिळदार मिश्या.. जमीनदाराला शोभेलसा पेहेराव, कडक इस्त्रीचा कोट आणि पांढरे धोतर. हातात काठी पण आधारासाठी नाही तर एखाद्यावर उगारायला घेतली आहे असे वाटावे. बंड्या त्यांच्या तैलचित्रावरून त्यांचे वर्णन सांगत होता आणि आमच्या डोळ्यांसमोर त्यांची प्रतिमा उभी राहत होती. खरी खोटी देव जाणे पण गावात त्यांचा भला मोठा वाडा होता. नाही, नाही.. त्या वाड्यात मुक्काम करणे आमच्या नशिबी नव्हते. तो तर केव्हाच बंद करून टाकला होता, कडीकुलुपे लाऊन.. विष्णूपंतांच्या आकस्मिक मृत्युनंतर.. कोणी म्हणतात की पाय घसरून पडले तर कोणी म्हणतात की ढकलून दिले. पण त्यांच्या मृत्युनंतर सार्या गावाला अवकळा आली. विस्मयकारकरीत्या एकेवर्षी पूर तर एके वर्षी दुष्काळ, असा सलग दोन वर्षे फटका बसला. गावावर उपासमारीची वेळ आली. परीणामी गावातल्या पोरीबाळींची लग्ने ठरेनाशी झाली. मोठ्या मुश्किलीने गावच्या सरपंचाने आपल्या मुलाचे लग्न जमवले. वरात वाड्यावरूनच निघणार होती, आणि तिथेच घात झाला. बघता बघता वाड्याच्या प्रांगणात बांधलेल्या मंडपाने पेट घेतला. काय झाले, कसे झाले, कोणालाही समजले नाही, आणि ते सांगायला त्या सार्यांपैकी एकही जण जिवीत उरला नाही हे ही एक कोडेच होते. बस्स.. त्या नंतर एकेकाने हळूहळू गाव सोडायला सुरूवात केली. बघता बघता सारा परीसर निर्जन झाला. काही वर्षे उलटली. लोकांची भिती चेपली. मधल्या काळात फारसे अघटीत असे काही घडले नाही. परत एकदा गाव वसायला सुरूवात झाली. पण त्या वाड्याच्या वाटेला जायची आजतागायत कोणाची हिंमत झाली नव्हती. आता याला धाडस म्हणा की मुर्खपणा पण आम्ही तोच करायला चाललो होतो. बंड्या ज्या घराची चावी घेऊन आला होता ते घर वाड्याच्या अगदी समोर बांधलेले होते. बंड्या कितीही म्हणत असला की नुसत्या अफवांनी तो वाडा कुप्रसिद्ध झाला आहे तरी त्या वाड्यासमोरच्या घरात राहणार्या लोकांना काहीतरी वेडावाकडा अनुभव आला असणार जे आता तिथे कोणी राहायला तयार नव्हते. बंड्यावर चिडावे की रडावे ते कळत नव्हते. परत मुंबईला फिरावे तर हसे झाले असते. थेट गोवा गाठावा किंवा कुठेतरी खाजगी विश्रामगृहात मुक्काम करावा तर तेवढे पैसे बरोबर नव्हते. हो ना करता कशीबशी मनाची समजूत काढली. काहीजण अजूनच पिल्यातच होते त्यांनी आमच्या हो ला हो मिळवली. आणि सरते शेवटी आम्ही भुताच्या वाड्यावर स्वारी करायला सज्ज झालो.

कोकणरेल्वेच्या कुडाळ स्टेशनवर आम्ही उतरलो. मौजे येडगावला जाण्याचे हे सर्वात जवळचे रेल्वेस्टेशन होते. ते ही सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर. सात-आठ जण आणि सोबत सामान, बसपेक्षा रिक्षाचाच पर्याय सोयीस्कर होता. स्टेशनच्या बाहेर पडल्यापडल्या रिक्षांची भली मोठी रांग समोर दिसली पण एक रिक्षा मिळेल तर शप्पथ.. ज्याला विचारावे तो त्या गावाचे नाव ऐकून नकारार्थी मुंडी तर हलवायचाच वर उलट आम्ही कुठून आलो आहोत याची अशी काही चौकशी करायचा की आमचे काही बरे वाईट झाले तर तो आमच्या घरी निरोप पोहोचवणार होता. आतापासूनच सारे संकेत असे मिळत होते जे आमचे खच्चीकरण करत होते. पण हे सारे आमच्या भल्यासाठीच होते हे समजायची अक्कल त्या दिवशी आम्ही गहाण टाकली होती. शेवटी एका रिक्षावाल्याचा सांगण्यानुसार आम्ही स्टेशनपासून रिक्षाने बसस्टॅंडपर्यंत जायचे ठरवले. आणि तिथून मग पुढचा प्रवास एस.टी. च्या लाल डब्यातून होणार होता.

लाल डबा कसला, कळकट मळकट, धुळीने माखलेला काळाकुट्ट लोखंडी सांगाडा होता तो. दिवसभरात एकच बस होती जी वर्सोली फाट्यावरून डाव्या हाताला वळून पंधरा किलोमीटर आत वसलेल्या मौजे येडगावपर्यंत जायची. आणि का नसावी, कारण गाव येईयेईपर्यंत तिच्यात फक्त आम्हीच शिल्लक राहिलो होतो. तसे नाही म्हणायला एक धोतरवाले मामा होते, पण ते कुठल्या गावाला उतरणार याची काही कल्पना नव्हती. पुढे रस्ता खराब असल्याचे कारण सांगत बस गावच्या वेशीवरच येऊन थांबली. खाली उतरून पाहिले तर रस्ता तसा थोडाफार खडबडीत होता पण बसची हालत पाहता नक्कीच त्यामानाने चांगला होता. तरी वाद घालण्यात अर्थ नव्हता. इथून पुढे कसे जायचे याची कल्पना नव्हती. म्हणून विष्णूपंतांनाच विचारायचे ठरवले. अरे हो, विष्णूपंत म्हणजे बंड्याचे खापरपणजोबा नाही बरे का, तर मगासचे ते गाडीतले आजोबा. त्यांचा पेहराव पाहता एव्हाना आम्ही त्यांचे विष्णूपंत असे नामकरण करून त्यावरून बंड्याला चिडवून झाले होते. आम्ही त्यांना विचारणार त्या आधी त्यांनीच आम्हाला भुवया ताणून इशार्यानेच “कुठे?” असे विचारले. “भुतांची वाडी”, बंड्या उत्तरला. “बरं बरं..”, सकाळपासून मौजे येडगाव आणि भुताची वाडी ही नावे ऐकल्यावर ही पहिली थंड प्रतिक्रिया होती. जरासे हायसे वाटले. जर या आजोबांनीही डोळे वटारले असते तर इथूनच परतलो असतो अश्या मनस्थितीला येऊन पोहोचलो होतो. पण आता मात्र त्यांनीच दाखवलेल्या रस्त्याने जायचे ठरवले.

रस्ता खूप सोपा होता. झर्याच्या काठाकाठाने अर्धा पाऊण तास चालत जायचे होते, ते ग्रामदेवतेचे मंदीर येईपर्यंत. तिथून पुढे उजव्या हाताला एक पायवाट जी थेट भुताच्या वाडीला जाते. पावसाळा सुरू व्हायला अजून अवकाश होता तरी झरा मात्र आपल्याच नादात खळखळाट करत होता. पायातले बूट काढून त्या थंड पाण्यात उतरलो तसे दिवसभराचा क्षीण गेल्यासारखे वाटले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदांची जाळी पसरली होती. बंड्याने लगेच पानांचे द्रोण बनवले आणि त्यात करवंदे भरून घेतली. एवढे रसाळ फळ आजवर कधी चाखले नव्हते. मे महिन्याची दुपार, डोक्यावर आलेले उन, रात्रभराच्या ट्रेनच्या प्रवासाने आणि जागरणीने थकलेले शरीर, पाठीवर सामानाचे ओझे आणि तरीही आम्ही मस्त शीळ घालत चाललो होतो. खरेच या परीसरात एक प्रकारची जादू होती. उगाच लोकांनी बदनाम करून ठेवले होते या जागेला. ग्रामदेवतेचे मंदीर तर पुरातन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. भिंती भंगल्या होत्या पण खांबांवरची नक्षी त्या काळच्या अप्रतिम कारागिरीची साक्ष देत होती. त्यावर पसरलेल्या वेलबुट्ट्या त्याच्या सौंदर्यात नकळत भर टाकत होत्या. मंदीराच्या आवारात पसरलेला हिरवागार गालिचा, मधोमध असलेले तुळशी वृंदावन, कुंपणापलीकडे चरणार्या गाई आणि सोबतीला पक्ष्यांच्या किलबिलाटाचे पार्श्वसंगीत. अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारे वातावरण. निसर्गाचे हेच रूप टिपण्यासाठी तर आम्ही कॅमेरे बरोबर आणले होते याची आम्हाला अचानक जाणीव झाली आणि पुढचा अर्धा पाऊण तास छायाचित्रणातच गेला. अश्या पवित्र आणि मंतरलेल्या परीसरात भूत काय भुताची सावली देखील असणे शक्य नव्हते. ग्रामदेवतेसोबत असलेल्या महादेवाच्या पिंडीला नमस्कार करून आम्ही पुढे निघालो. आता आम्ही पुन्हा एकदा सहलीच्या मूडमध्ये आलो होतो. मगाशी ज्यांचा उच्चार करायलाही घाबरत होतो त्या भुतांच्या नावाने आता आमची थट्टामस्करी चालू झाली होती. गप्पांच्या नादात कधी पोहोचलो समजलेच नाही. पहिलेच दर्शन झाले ते पंतांच्या एकमजली वाड्याचे. जळाल्याच्या खुणा अंगावर मिरवत दिमाखाने आमच्याकडे पाहत उभा होता. त्याच्यासमोर आमचे मुक्कामाचे घर एखाद्या पर्णकुटीसमान भासत होते. वाड्याचे मुख्य फाटक टाळे लाऊन बंद केले होते. तरी कुंपणाच्या भिंतीची मात्र जागोजागी पडझड झाली होती. एखादे कुत्रेही आरामात त्यावरून तंगडे टाकून जाऊ शकत होते. तरीही वाड्याच्या आसपास एकाही जनावराचा लवलेश दिसत नव्हता, ना मगासची पक्ष्यांची किलबिल ऐकू येत होती. एक प्रकारची नीरव शांतता होती या भागात. तरी तिला भयाण म्हणता आले नसते. अजून रात्र होणे बाकी होते, पण आता तरी आम्हाला त्या वाड्याने भुरळ घातली होती. आम्ही सारे एकमेकांकडे सूचकतेने पाहू लागलो तसे बंड्या ओरडला, “कोणीही जादा हुशारी करायची गरज नाही, पुढचे चार-पाच दिवस आपण या वाड्यापासून दूरच राहणार आहोत.” बस, आमच्यासाठी हा विषय इथेच संपला. आमच्यापैकी कोणीही दिवसा किंवा रात्री त्या वाड्याच्या जवळपासही फिरकणार नाही हा ठराव एकमताने पास झाला. कारण कोणी कबूल नाही केले तरी एक अनामिक भिती प्रत्येकाच्या मनात होतीच.

बंड्याच्या काकांचे घर बरेच दिवसांपासून बंद असावे. घरभर पसरलेल्या जळमटांवरून हे समजत होते. तरी घरातील भांडीकुंडी मात्र इतरस्त्र पडली होती. कदाचित अधूनमधून कोणी इथे राहायला येत असावे. काही का असेना, आम्हाला त्या घराची साफसफाई आणि आवराआवर करण्यात जराही रस नव्हता. होस्टेलवर राहायची सवय असल्याने आम्हाला त्या पसार्यात राहण्यात जराही अडचण नव्हती. घरही दोन खोल्यांचेच होते. एक बाहेरची मोठी खोली, आणि आतले स्वयंपाकघर, ज्याच्या कोपर्यातच एक मोरी बनवली होती. अंगावरचे ओझे काढून ठेवले तसे दिवसभरात पहिल्यांदा भुकेची जाणीव झाली. पण त्यासाठीही हातपाय झाडणे गरजेचे होते. बरोबर काही कडधान्ये, तांदूळ, अंडी आणि नूडल्सची पाकिटे घेऊन आलो होतो. सद्य परिस्थितीत झटपट बनेल असे नूडल्सच होते. बंड्याने कोपर्यातील अडगळीतून स्टोव्ह आणि एक-दोन टोप शोधून काढले आणि सर्वांसाठी एकत्रच मॅगी बनवायला घेतली. जेवण झाले तसे सारे जण जागीच लुडकलो. डोळ्यांवर झापड होतीच. बघता बघता सार्यांचा डोळा लागला. वेळ काय झालीय याचे कोणालाही भान नव्हते, ना कोणाला पर्वा होती. उठलो तेव्हा सगळीकडे अंधार पसरला होता. संध्याकाळ उलटून गेली असावी. एकाला जाग आली तसे एकेक करून सारे उठले. जे अजूनही सुस्तावून पडले होते त्यांनाही लाथा घालून उठवले. बंड्यानेच मग लाईट लावली. स्विचबोर्डजवळ दोन पाली नजरेस पडल्या तसा दचकून मागे सरकला. घरभर नजर फिरवली असता दिसून आले की इथे तर पालींचे साम्राज्य पसरले होते. पालीही कसल्या, तर त्यांचा आकार पाहता भिंतीवरचे सरडे वाटावेत. एक बरे होते की सार्याजणी निपचित पडून होत्या. आम्हीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य समजले. निदान या परीसरात आपण सोडून आणखीही कोणी सजीव प्राणी वास करून आहे यातच समाधान मानले.

पक्याने सर्वांसाठी चहा टाकला. जेवायला मिळो न मिळो, पण सकाळ संध्याकाळ दोन वेळ तल्लफ आली की चहा हा हवाच या हिशोबाने आठवडाभर पुरेल इतकी चहा आणि दूधपावडर बरोबर घेतली होती. पण सध्या त्यापेक्षाही जास्त गरज वाटत होती ती आंघोळ करण्याची. त्याशिवाय प्रवासाचा शीण काही गेला नसता. मोरीमध्ये पाण्याने भरलेला पिंप होता पण त्यावरती पसरलेला धुळीचा जाडसर पापुद्रा पाहता ते पाणी कधीचे असावे याची कल्पना येत होती. तशी पाण्याची काही चिंता नव्हती. घराजवळच एक विहीर होती. अंगणात लावलेल्या बल्बच्या दिव्याचा प्रकाश तिथवर पोहोचत होता. आंघोळीचा कार्यक्रम आम्ही विहीरीच्या काठावरच उरकायचे ठरवले. पाणी काहीतरीच थंडगार होते. प्रत्येकाने कसेबसे दोन तांबे अंगावर ओतून आटोपले. खरे तर आधीची मूळ विहीर वाड्याच्या आतल्या बाजूला होती. पण बंड्याच्या काकांनी ती बुजवून ही बाहेरच्या बाजूला बांधली होती. वाड्याचा जेव्हा जेव्हा विषय निघायचा तेव्हा तेव्हा एक कुतूहल निर्माण व्हायचे पण एक अनामिक भितीही मनात दाटून यायची. सर्वांच्या आंघोळी उरकल्यावर अर्धेजण जेवायच्या तयारीला लागले तर आम्ही तीन-चार जण तिथेच बसून राहिलो. पुरेशी झोप झाल्याने बर्यापैकी फ्रेश वाटत होते. इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू झाल्या. पक्याने सिगारेट शिलगावली. दोन-चार वेळा धूर आतबाहेर केला तसे जरा तरतरी आली. वातावरणातही एक वेगळीच धुंदी जाणवत होती. थंडावा हळूहळू वाढत होता. पण गप्पाही रंगात आल्या होत्या, त्यामुळे कोणी परतायचे नाव घेत नव्हते. गप्पांच्या ओघातच विष्णूपंतांचा विषय निघाला. “थेरडा मेला आणि सारा गाव बदनाम करून गेला”, पक्या सहज म्हणाला तसे एका बोक्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. आजूबाजूला पाहिले तर वाड्याच्या कुंपणाच्या भिंतीवर एक पांढर्या रंगाचा, पण मानेभोवती गडद राखाडी रंगाचा पट्टा असलेला बोका आमच्यावरच नजर लाऊन होता. रात्रीच्या अंधारात त्याच्या मानेच्या काळपट रंगामुळे त्याचे शीर आणि धड एकमेकांपासून वेगवेगळे असल्याचा भास होत होता. गुरगुरण्याची वेळही त्याने अशी साधली होती की नाही म्हणालो तरी सारे थोडे चरकलोच. तरी पक्या हिंमत करून म्हणाला, “या विष्णूपंत या, तुम्हीही दोन झुरके मारा आमच्याबरोबर.” पक्याचा हेतू जराशी गंमत करून वातावरणातील ताण हलका करण्याचा असला तरी त्यानंतर बोक्याचे गुरगुरणे जास्तच वाढले. त्याला ‘शुकशुक’ करून हाकलायचा निष्फळ प्रयत्न केला पण त्याचे लाल होत जाणारे डोळे आम्हालाच तिथून शहाणपणाने जाण्याचा सल्ला देत होते. “चल मरू दे त्याला, जाउया, खूप भूक लागली आहे”, बाबू म्हणाला तसे सारे जण पडत्या फळाची आज्ञा घेऊन तिथून निघालो.

आम्हाला खाली हात परतलेले पाहून बंड्याने आंघोळीच्या बादल्या बरोबर घेऊन नाहीत का आला याची चौकशी केली. तसे आम्ही पुन्हा चरकलो. डोळ्यासमोर परत तोच बोका आला. तिथे आता परत जाण्याचा प्रश्नच नव्हता. काहीतरी उडवाउडवीचे उत्तर देऊन विषयाला बगल देऊ लागलो तसे बंड्याही काय ते समजला. त्यानेही मग विषय ताणून धरला नाही. जेवण तयार झाले होते. टोपावरचे झाकण बाजूला सारले तसे दालखिचडीचा खमंग वास नाकात शिरला. बरोबर उकडलेली अंडी आणि बंड्याने घरून आणलेले लोणचे होते. दिवसभराचा थकवा म्हणा किंवा गावच्या वातावरणाची जादू म्हणा, सारे जण अधाश्यासारखे जेवणावर तुटून पडलो. जेवण झाल्यावर बंड्याने सर्वांसाठी लिंबू सरबत केले. एवढे लिंबू कुठून आले याची विचारणा केली तर म्हणाला की स्वयंपाकघरातील फडताळावर सापडले. “एवढे जुने असूनही रस चांगला निघाला रे”, बाबूने सहज शंका उपस्थित केली. तसे सारेजण चपापले. खरेच विचार करण्यासारखी गोष्ट होती. घराची अवस्था पाहता गेले काही महिने तरी इथे कोणी फिरकले असावे असे वाटत नव्हते. साधे दरवाजा उघडतानाही कुलुपावरची धूळ झटकावी लागली होती. तरीही कधीचे ते लिंबू मात्र अजून सुकले नव्हते. अर्धे सरबत पोटात ढकलून झाले होते, उरलेले तसेच मोरीत ओतले. यावर कोणीही पुढे काही चर्चा केली नाही. सारे जणू काही एका अलिखित नियमाचे पालन करत होते की अश्या कोणत्याही संशयास्पद गोष्टीवर चर्चा करून मनात वेडेवाकडे विचार येऊ द्यायचे नाहीत. रात्री दिवे मालवायच्या आधी घरभर एक नजर फिरवली. संध्याकाळच्या सार्या पाली तशाच आपापल्या जागी निपचित पडून होत्या. अंधार झाल्यावर मात्र सार्या घरभर फिरत आहेत असा भास होत होता. पण उठून दिवा लावायची हिम्मत काही झाली नाही.

सकाळ झाली ती मांजरीच्या आवाजानेच. उठून पाहिले तर बर्यापैकी उजाडले होते. स्वयंपाकघरातील खिडकीवाटे तीन-चार मांजरींनी घरात प्रवेश केला होता. पुन्हा तो कालचाच बोका आठवला. पण या मात्र फार सौम्य वाटल्या. उलट डोक्यावरून हात फिरवून कुरवाळाव्यात अश्या गोजिरवाण्या होत्या. ज्यांना कालच्या बोक्याचा अनुभव नव्हता ते त्यांच्याशी मस्त खेळतही होते. पक्याने मात्र संधी मिळताच एकेकीला अलगद उचलून घराबाहेर काढले.

सर्वांची आंघोळ नाश्ता उरकेपर्यंत अकरा वाजले होते. त्यामुळे आजचा गोव्याला जायचा बेत रद्द झाल्यातच जमा होता. कारण या गावातून बाहेर पडायला एकच काय ती एस.टी. होती जी एव्हाना गेली असावी. तसेही ती एस.टी. पकडण्यासाठी गावच्या वेशीपर्यंत पाऊण-एक तास तंगडतोड करत जाणे भाग होते. आणि एवढे करून जर तिची आणि आमची चुकामुक झाली असती तर तेवढीच परतीची पायपीट. म्हणून आता उद्याच पहाटे उठून वेळेच्या आधी निघायचे ठरवले. आज दिवसभर जो काही धुमाकुळ घालायचा होता तो गावातच घालुया म्हणून तयारीनिशी बाहेर पडलो. नक्की कुठे जायचे याची काही कल्पना नव्हती. आणि कोणी मार्गदर्शकदेखील सोबतीला नव्हता. पण पश्चिम दिशेला, वाड्याच्या उजव्या हाताने सरळ चालत गेलो तर पंधरा-वीस मिनिटात समुद्रकिनारा लागेल एवढी टीप बंड्या आपल्या काकांकडून घेऊन आला होता. तसा वाड्याच्या डाव्या बाजूनेही एक रस्ता थेट समुद्रकिनारी जात होता, पण तो चुकूनही न वापरण्याची सक्त ताकीद मिळाली होती. कदाचित काकांनी शॉर्टकट सुचवला असेल असा निष्कर्ष काढून जास्त विचारमंथन न करता आम्ही उजव्या रस्त्याला वळलो. रस्ता म्हणजे एक रुंदशी पायवाट होती. दोन्ही बाजूंनी झाडीझुडपे आणि त्यापलीकडे लपलेली, गेरूच्या लाल रंगात माखलेली, कोकणातील टिपिकल कौलारू घरे. त्या समोर शेणाने सारवलेले आंगण, छोटेसे तुळशी वृंदावन.. सारी घरे याच पठडीतील आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला रांगेत होती. दोन घरांच्या मध्ये असलेले बांबूंच्या काटक्यांचे कुंपण ते काय त्यांना वेगळे करत होते. पण या सार्यातही एक गोष्ट प्रकर्षाने जाणवून येत होती आणि ती म्हणजे सारी घरे ओस पडली होती. अंगणात सुकत घातलेले कपडे, भांडीकुंडी, एखाददुसरी बाज हे सारे तिथे वस्ती असल्याची चिन्हे दर्शवित होते पण त्यात जिवंतपणा असल्यासारखे काही वाटत नव्हते. आणि याचे कारण म्हणजे आतापावेतो एकही मनुष्य नजरेस पडला नव्हता. काही घरांची दारे सताड उघडी होती तर काही पर्णकुट्या दाराशिवायच होत्या, तरी त्यांच्या आत कोणी दिसत नव्हते. तसे पाहता काल वेशीवर भेटलेल्या आजोबांनंतर मनुष्यप्राणी बघून आम्हाला तब्बल चोवीस तास उलटून गेले होते. एखादी नरभक्षक आदिवासींची जमात जर इथे राहायला आली तर उपासमारीने मरेन अशी सारी परिस्थिती होती. अर्ध्या तासाच्या पायपीटीनंतर आम्ही सरते शेवटी समुद्रकिनारी पोहोचलो. खरे तर त्या एकसारख्या दिसणार्या रस्त्यावर जागीच चालत आहोत आणि हा रस्ता कधीच संपणार नाही असे वाटत होते. पण अचानक रस्त्याने एक वळण घेतले आणि नजरेस पडला तो अथांग महासागर. फेसाळणार्या पांढर्याशुभ्र लाटा आणि सुर्यप्रकाशात चकाकणार्या वाळूचा किनारा. मौजे येडगावला निसर्गाची एवढी मोठी देणगी लाभली होती याचा क्षणभर डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. खरेच एक शापित गाव होते हे..

किती वेळ पाण्यात डुंबून होतो ठाऊक नाही, पण कोणालाही तहानभुकेची, वेळकाळाची जाणीव नव्हती एवढे मात्र नक्की. क्रिकेट आणि फूटबॉल खेळण्यासाठी म्हणून बरोबर बॅट-बॉल वगैरे घेऊन आलो होतो. पण कोणाचीही पाण्यातून बाहेर पडायची इच्छा होत नव्हती. शेवटी बंड्यानेच आवाज देऊन सार्यांना बाहेर काढले. बाहेर येऊन किनार्यावर नजर टाकता लक्षात आले की खेळायच्या नादात किनार्याच्या बर्याच डाव्या बाजूला आलो होतो. कदाचित हवेच्या आणि लाटांच्या वाहण्याच्या दिशेमुळे ओढले गेलो असावो. वरच्या बाजूने नजर टाकली तर इथूनही एक वाट दिसत होती जी वर शिखरावर असलेल्या वाड्याकडे जात होती. कदाचित वाड्याच्या डाव्या बाजूने जाणारा रस्ता हाच असावा. आणि हा तुलनेने छोटा वाटत होता. तसेही आम्हाला परत त्या कंटाळवाण्या रस्त्याने जाण्यात जराही रस नव्हता. म्हणून सामानासोबत असलेल्या दोघाजणांना इथेच बोलावले.

हा रस्ता आधीच्या रस्त्यापेक्षा अगदीच वेगळा होता. आतापर्यंत डोळ्याला सतत सुखावणारा हिरवेगारपणा कुठेतरी लुप्त झाला होता. कोकण सोडून कुठल्याश्या भलत्याच रुक्ष प्रदेशात आल्यासारखे वाटत होते. पायाखाली वाळू पसरली असल्याने पाऊलेही मोठ्या मुश्कीलने उचलत होती. थोड्याच वेळात दमायला झाले. तरी मध्ये कुठे क्षणभर विश्रांती घ्यावी अशी सोय नव्हती. शिखरावरचा वाडा अजून तेवढाच दूर दिसत होता जेवढा की सुरूवातीला. चालता चालता एका मोकळ्या जागी येऊन पोहोचलो. दुपारची वेळ असूनही हा भाग काहीसा अंधारून आल्यासारखा वाटत होता, पण खरे तर सुर्याच्या किरणांना जमिनीवर पोहोचण्यास रोखायला फारशी झाडेही या परिसरात नव्हती. तरीही इथे मानववस्तीच्या खुणा होत्या. नुसत्या खुणा नाही तर चक्क माणसेही होती. आम्हाला पाहिले तसे एकेक जण आपापल्या घरातून बाहेर पडू लागला. सारे जण आमच्याकडे संशयास्पदरीत्या बघत होते. खरे तर मनातून थोडेसे चरकलोच, तरीही भुतांपेक्षा माणसे परवडली असा विचार करून त्यांच्याशी संवाद साधायला सुरूवात केली. आम्ही मुंबईहून खास त्यांच्या गावाला फिरायला म्हणून आलो आहोत हे त्यांना समजले तसे सारे आमच्याशी मोकळे झाले. त्यांच्या या दुर्लक्षिल्या गेलेल्या गावाला भेट द्यायला एवढ्या दूरून ते ही मुंबईसारख्या शहरातून कोणीतरी येते आणि त्यांच्या गावाच्या परीसराची तारीफ करते ही गोष्ट नक्कीच त्यांना सुखावणारी होती. फणसासारख्या बाहेरून सख्त आणि आतून गोड असणार्या कोकणी माणसांच्या पाहुणचाराबद्दल ऐकले होते पण आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. तशी त्यांची आर्थिक स्थिती जेमतेम वाटत होती तरी आम्ही त्यांच्या घरचे पाहुणे असल्यागत जेवायचा आग्रह करत होते. आम्ही नकार दिला तरी आंबे, काजू, फणसाचे गरे आणि त्यापासून बनवलेले विविध पदार्थ आणून आमच्या समोर ठेवले. सारेच पदार्थ रुचकर होते. जरी आम्ही जेवणाला नकार दिला असला तरी भूक मात्र प्रत्येकाला सडकून लागली होती. प्रत्येकाने पोट भरेपर्यंत ताव मारला. त्यानंतर त्यांनी ताडीने भरलेले मडके आमच्यासमोर धरले. आतापर्यंत चाखलेल्या पदार्थांची चव पाहता ही देखील सोमरसापेक्षा कमी नसणार याची प्रत्येकाला खात्री होती, तरी बंड्याने इशारा केला तसे सावधगिरी म्हणून आम्ही तिची चवही घेणे टाळले. त्यांचा निरोप आणि दुसर्या दिवशीचे जेवणाचे आमंत्रण घेऊन आम्ही तिथून निघालो.

मुक्कामाच्या जागेवर पोहोचेपर्यंत अंधारून आले होते. गेल्या गेल्या दिवा लावला. कालच्या सार्या पाली तश्याच आपापली जागा पकडून स्थितप्रज्ञासारख्या बसल्या होत्या. त्यांना मनातल्या मनात नमस्कार करून आम्ही जेवायच्या तयारीला लागलो. उद्या गोव्याला जायचे होते म्हणून आज दारूचा उरलासुरला स्टॉक संपवून टाकायचे ठरवले. नेहमीचा शेव-फरसाणचा चकणा होताच, जोडीला सुके बोंबीलही भाजले. जेवणात अंड्याचे कालवण आणि भात केला होता. सारेच मटणमच्छी खाणारे असल्याने काही प्रश्नच नव्हता. आज कोणाला भूक जास्त नव्हती तरी लवकर उरकून घेतले. उद्या सकाळी गोव्याला जाण्यासाठी लवकर उठायचे होते ना.. घरातले पाणी संपले होते. रात्रीचे बाथरूमला वापरायला म्हणून थोडेतरी पाणी हवेच या हिशोबाने विहीरीवर गेलो. अर्थात तिघे चौघे मिळूनच. पक्या आणि बाबू होतेच. तेवढाच त्यांना सिगारेटी ओढायचा मौका. गेल्या गेल्या पहिला सभोवताली नजर फिरवली. एक नजर वाड्याच्या कुंपनावरही टाकली. कालचा बोका कुठेच दिसला नाही. पक्याने मग सिगारेटचे पाकीट बाहेर काढले. बाबूने हंडा विहीरीत सोडला आणि माचिस काढून सिगारेट शिलगावली. दोन झुरके मारून सिगारेट पक्याच्या हातात दिली आणि हंडा वर खेचायला घेतला. वजन जरा जास्तच भासले. जणू काही आत दगडे भरली असावीत. कसाबसा खेचून वर आणला तसा क्षणार्धात हलका झाला. उपडा करून पाहतो तर पाण्याचे दोन थेंब काय ते ओघळले. चक्रावून परत आत टाकला. आम्ही काय झाले विचारले तर काही बोलला नाही. परत दुसर्या खेपेलाही तेच. हंडा वर खेचायला नेहमीपेक्षा जास्त ताकद लावावी लागत होती. पण बाहेर काढला तो परत एकदा रिकामाच. आम्हाला वाटले, बाबूची काहीतरी गडबड होत आहे, म्हणून पुढच्या खेपेस पक्याने स्वता हंडा आत सोडला. यावेळी तर खेचायला आम्हा दोघांना ताकद खर्च करावी लागली. वर येईपर्यंत दोर हातातून सटकतो की काय नाहीतर आम्हालाच आत खेचून नेतो की काय असे वाटू लागले. एक शेवटचा जोरदार हिसका देऊन खेचला तसे हंडा दोरीतून सुटून तीनताड उडाला. टण टण टण आवाज करत वाड्याच्या कुंपणावरून आत जाऊन पडला. आतमध्ये जाऊन हंडा आणायचा विचारही कोणाच्या मनाला शिवला नाही. तरी हंड्याचे नक्की काय झाले हे बघण्याची उत्सुकता आम्हाला कुंपणापर्यंत घेऊन गेली. टाचा वर करून आत डोकावून पाहिले पण आत पुरेसा प्रकाश पोहोचत नसल्याने काही दिसायला मार्ग नव्हता. एकाएकी आत काहीतरी हालचाल झाल्यासारखी जाणवले. आवाजाच्या दिशेने पाहिले तसे काही समजायच्या आत एक पांढरी आकृती वीजेच्या वेगाने आमच्या अंगावर झेपावली. तिने पक्याच्या मस्तकाचा वेध घेतला तसे त्याने झटका बसल्यासारखे तिला पकडून दूर भिरकावून दिले. हवेतून अलगद जवळच्या झाडीत पडताना जाणवले की तो कालचाच बोका होता. झाडीत कुठे गडप झाला समजले नाही. एकटक त्याच दिशेने बघत राहिलो तसे हळूहळू अंधारात दोन लाल-पांढरे डोळे चमकू लागले. बघता बघता दोनाचे चार, चाराचे आठ… आकडा वाढतच होता. नक्की किती श्वापदे तिथे दडली होती देव जाणे.. त्यानी एकसाथ आमच्यावर हल्ला केला तर काय होईल याची कल्पनाही करवत नव्हती. दहा-बारा बोक्यांशी एकवेळ झुंजलोही असतो, पण जर यामागे एखादी अमानवीय शक्ती असेल तर तिच्यापुढे आमचा काय निभाव लागणार होता. अचानक झालेल्या प्रकाराने तिघेही पुरते हादरून गेलो होतो. कसेबसे अंगातले त्राण एकवटून तिथून पळ काढला. घरापर्यंतचे पन्नास पावलांचे अंतर पन्नास मैलांचे भासले. सतत पाठीमागे कोणीतरी लागले आहे असा भास होत होता. धापा टाकतच आत शिरलो. दोनच मिनिटात सार्या शरीराला पाणी सुटले होते. काही न विचारताच बंड्याने सर्वप्रथम आतली कडी लाऊन घेतली. कोणालाही आमचा अनुभव खरा खोटा करायचा नव्हता की त्यावर अविश्वास दाखवायचा नव्हता. दुसर्या दिवशीच इथून निघायचे असे सर्वांनी एकमताने ठरवले. जमल्यास गोव्याला जायचे किंवा थेट मुंबई गाठायची. फक्त आजची रात्र निर्विघ्नपणे पार पडू दे आणि पडल्यापडल्याच झोप लागू दे अशी प्रार्थना करून आम्ही दिवा मालवला.

सकाळी उजाडले तसे आम्ही आवरायला घेतले. रात्रभर कोणाचा डोळ्याला डोळा लागला असेल असे वाटत नव्हते. तरीही सारे आळस झटकून निघायच्या तयारीला लागले होते. आजची बस चुकता कामा नये हे सार्यांना ठाऊक होते. चालताना सर्वांच्याच डोक्यावर एक प्रकारचा ताण होता. येताना याच रस्त्याने आलो होतो पण आता मात्र तेव्हासारखे सभोवतालच्या निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटणे जमत नव्हते. पक्यानेच मग सर्वांचा ताण हलका करायला एक शीळ घातली आणि गोव्याच्या समुद्रकिनार्यावर वीतभर कपड्यात बागडनार्या ललनांचा विषय काढला. तसा अचानक सार्यांचा नूर पालटला. ही देखील एक निसर्गाचीच किमया होती. वेशीपर्यंत तर पोहोचलो पण बस आली की गेली की कधी येणार हे समजायला काही मार्ग नव्हता. वाट पाहण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. तेवढ्यात तिथे विष्णूपंत अवतरले. म्हणजे ते पहिल्या दिवशी दिसलेले धोतरवाले आजोबा आले. त्यांच्याकडून समजले की आज बस काही येत नाही. काल रात्री बसच्या रस्त्यात असलेल्या नदीवरील पूल तुटला होता. म्हणजे आता पुढचे चार-पाच दिवस तरी बस किंवा कोणतेही वाहन इथे फिरकणार नव्हते. या गावातून बाहेर पडायला दुसरा कोणता मार्ग आहे का म्हणून त्यांच्याकडे चौकशी केली तसे त्यांनी वर आकाशाकडे बोट दाखवले. त्यांच्या या कृतीचा काहीच अर्थ लागला नाही. आणि लावण्याचा भानगडीतही आम्ही पडलो नाही. परत मागे फिरण्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता. आता फक्त एकच आशेचा अंधुकसा किरण दिसत होता आणि ते म्हणजे काल भेटलेले गावकरी.

महादेवाला नमस्कार करून आम्ही परत घरच्या दिशेला फिरलो. गावाकडे जाणारा रस्ता परत त्या विहीरीसमोरूनच जात होता. दिवसाची वेळ होती तरी एकमेकांचा हात धरून साखळी करूनच चालत होतो. कालचे झाडीमागून लुकलुकणारे डोळे, गुरगुरण्याचा आवाज, अजूनही आम्ही विसरलो नव्हतो. गावात पोहोचलो पण गावकर्यांचा कुठे पत्ता नव्हता. दिवसा हे सारे गावकरी जातात कुठे हा प्रश्नच होता. निदान बाईमाणसे तरी घरी असावीत, तर ती ही कुठे दिसत नव्हती. सारी वाडी निर्मनुष्य पडली होती. कदाचित यावरूनच भुतांची वाडी हे नाव पडले असावे. दिवस उतरू लागला तसे सारे कासावीस होऊ लागलो. सकाळपासून फारसे काही खाल्ले नव्हते. पण चिंता भूकेची नव्हती तर इथून सुटका कशी करून घ्यायची याची होती. आणि हे दिवस मावळायच्या आधीच शक्य होते. चारच्या सुमारास समुद्रकिनार्याच्या दिशेहून सारे गावकरी परतताना दिसले. चौकशी करता समजले की दर शुक्रवारी त्यांच्यात दर्यावर जाऊन मासेमारी करून किनार्यावर शिजवून खायची प्रथा होती. सारे काही अजबच होते पण आमची जेवणाची सोय मात्र झाली होती. त्यांचे बर्यापैकी जेवण उरले होते जे आम्हाला पुरेसे होते. गावातून बाहेर पडायला आणखी एक मार्ग होता. गावच्या दक्षिणेला असलेल्या वडाच्या पारावरही दिवसाला एक एस.टी. यायची पण ती दुपारी बाराची असल्याने आता आम्हाला आणखी एक दिवस मुक्काम करण्याशिवाय गत्यंतर नव्हते. सकाळी आम्हाला कोणी आणखी एक रात्र थांबण्याबद्दल सांगितले असते तर आम्ही तो सल्ला तेव्हाच धुडकावून लावला असता. पण आता गावकर्यांच्या दिलाश्याने थोडीफार हिंमत आली होती. त्यांच्या म्हणण्यानुसार हे सारे आमच्या मनाचे खेळ होते. आम्ही आधीच या गावाची अपकिर्ती ऐकून इथे आलो होतो. त्यामुळे प्रत्येक घटनेकडे संशयाच्या नजरेनेच बघत होतो. खालच्या वाडीतील माणसे चार दिवस जत्रेला गेली होती म्हणून आम्हाला काल त्यांची घरे खाली दिसली होती, ज्याचा आम्ही वेगळाच अर्थ काढला होता. येथील हवामान देखील बरेच लहरी होते. कधी थंडी पडते तर कधी उकडायला लागते. तर कधी अचानक जोरदार वारे वाहायला लागतात. उन-सावलीचा खेळ तर चालूच असतो. या सार्यालाही आम्ही भुताटकी समजत होतो. गावच्या ठिकाणी बोके आणि रानमांजरे असणे काही विशेष गोष्ट नव्हती. हातात एक काठी घेतली असती किंवा त्यांच्या दिशेने एक दगड भिरकावला असता तरी कधी आमच्या वाटेला गेली नसती. इतकेच नाही तर त्यांच्यामते काल विहीरीवर घडलेल्या प्रसंगामागेही मांजरीच होत्या ज्या रात्रीच्या पाणी प्यायला विहीरीत उतरतात आणि पाणी उपसायला कोणी हंडा टाकला की त्याला धरून वर यायचा प्रयत्न करतात. त्यांचे बोलणे ऐकून आम्हाला असे वाटू लागले की गेले दोन दिवस आम्ही आमची तर्कबुद्धी गहाण टाकली होती की काय.. सर्वांनी अजून एक नाही तर गावकर्यांच्या आग्रहाखातर अजून दोन-चार दिवस राहायचा निर्धार करून कोलंबीचा रस्सा आणि तळलेल्या बांगड्यांवर ताव मारायला सुरूवात केली.

गावकर्यांचा निरोप घेऊन निघालो. वाटेत पुन्हा विहीर लागली. नाही म्हणाले तरी मनावर थोडेफार दडपण होतेच. रात्री परत विहीरीवर यायची हिम्मत होईल ना होईल, आणि झालीच हिम्मत तरी का विषाची परीक्षा घ्या. त्यापेक्षा अंधार पडायच्या आतच आम्ही पाणी भरून घ्यायचे ठरवले. आजचा सारा दिवस फुकटच गेला होता. काही न करता उगाच दमछाक झाली होती. त्यात सकाळी लवकर उठलो होतो, म्हणून लवकर झोपायचे ठरवले. तेवढीच रात्रही छोटी झाली असती. घरी परतलो आणि पाहिले तर अंगणातील बल्ब फुटून त्याच्या काचा दारापाशी विखुरल्या होत्या. आता हे आणि कोणाचे काम असावे मांजरीचेच की आणखी एखादे जनावर, की अचानक वाहणार्या जोरदार वार्याने झाले असावे. आणखी किती गोष्टींचा तर्क लावावा लागणार होते देव जाणे. एवढा वेळ आणलेले उसने अवसान गळून पडते की काय असे वाटायला लागले. घरात शिरलो तर अंदाजाप्रमाने पाली आधीच बस्तान मांडून बसल्या होत्या. यांच्याबद्दल मगाशी गावकर्यांना विचारायचे राहिलेच. या अश्याच गावभर पसरलेल्या होत्या की आमच्याच नशीबी होत्या. पण खरे तर या पालींची आम्हाला भिती वाटण्याऐवजी सोबतच वाटू लागली होती.

गावकर्यांसोबत पोटभर जेवण झाले होते, त्यामुळे आता रात्रीच्या जेवणाची चिंता नव्हती. दारूचा स्टॉक संपला होता पण शेव-फरसाण बर्यापैकी बाकी होते. भूक लागलीच तर झटपट मॅगी नूडल्स करता येणे शक्य होते. आतासे कुठे आठ वाजत होते. मुंबईच्या पोरांनी आदल्या रात्री कितीही जागरण केले असले, दिवसभरात कितीही थकले असले तरी त्यांना आठ-नऊ वाजता झोप येणे शक्य नव्हते. म्हणून मग पत्त्यांचा डाव रंगला. पत्ते खेळताना आम्हाला कोणाला स्थळकाळाचे भान उरायचे नाही. परीक्षेचा अभ्यास करायचा बहाणा करून होस्टेलमधील एखाद्या मित्राच्या रूमवर सारे पत्ते कुटत बसायचो. आताही तसाच माहौल तयार झाला होता. रात्र चढू लागली तसे एकेक जण पेंगू लागला. शेवटी आम्ही नेहमीचे तीनचार हौशी कलाकार उरलो. पण अचानक वातावरणात एक प्रकारची शांतता जाणवू लागल्याने आम्हीही आता झोपणेच शहाणपणाचे समजले. लाईट काढून किती वेळ पडून होतो माहीत नाही पण झोप लागत नव्हती. मनात उलटसुलट विचार येत होते. अजूनही बर्याच गोष्टी पटल्या नव्हत्या. लहान असताना रामसे बंधूंच्या भयपटात असेच सारे पाहून खूप घाबरायचो. प्रत्येक वेळी सिनेमा बघताना नकळत स्वताला त्या कलाकारांच्या जागी ठेऊन हे असेच आपल्याशी घडले तर काय होईल असा विचार मनात आल्याने ही भिती वाटायची. नंतर जसेजसे मोठे झालो तसे हे सारे खोटे असते, प्रत्यक्षात असे काही घडत नाही असा विश्वास आल्याने अश्या सिनेमांनी घाबरवायचे बंद केले. कालांतराने ते कंटाळवाणे किंवा विनोदी वाटू लागले. आज प्रत्यक्ष अनुभव घेत होतो. जोपर्यंत हे सारे झूठ आहे, निव्वळ मनाचेच खेळ आहेत हा विश्वास येणार नव्हता तोपर्यंत मन घाबरणारच होते. उद्या कदाचित आम्हीच या सार्या प्रकारावर हसत असू. पण अजून तो उद्या उजाडायचा होता. त्या उद्याचीच आतुरतेने वाट बघत असल्याने झोप येत नव्हती.

छतावर काहीतरी वाजल्याचा आवाज झाला. कदाचित वार्याने झाडाची फांदी वगैरे तुटून पडली असावी. थोडावेळ अंदाज घेऊन डोळे मिटले तसे पुन्हा कौले वाजली. यावेळी आवाज जरा मोठा होता. कोणीतरी दणकन उडी मारल्यासारखा. चपापून आम्ही दोघेतिघे एकमेकांकडे बघू लागलो. आता हे काय नवीन संकट उभे ठाकलेय याचीच चिंता सार्यांच्या डोळ्यात दिसत होती. टपटप करून आवाज वाढू लागला. जणू काही माकडांची एखादी टोळी कौलावर चढली होती. कोकणात माकडे असणे अशक्य नसले तरी मुंबईहून निघाल्यापासून अख्ख्या प्रवासात आम्हाला एकाही माकडाने दर्शन दिले नव्हते. त्यामुळे अचानक त्यांनी एवढ्या मोठ्या संख्येने हजेरी लावणे “तर्कात” बसत नव्हते. एव्हाना आवाजाने सारे उठून बसले होते. बंड्याने नेहमीसारखे घरमालकाच्या हक्काने पहिला उठून दिवा लावला. नक्की काय गोंधळ चालू असावा काही कल्पना येत नव्हती. दार उघडून बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता. पाच-दहा मिनिटांनी आवाज थांबला. पण तो केवळ जाहीरातींचा ब्रेक घेतल्यासारखा. थोड्याच वेळाने पुन्हा टपटप सुरू झाली. मध्येच आवाज काही काळासाठी थांबायचा आणि आता पुन्हा येणार नाही असा विश्वास येताच परत सुरू व्हायचा. येथील हवामान कितीही लहरी असले तरी मे महिन्यात इथे गारा नक्कीच पडणार नव्हत्या. आणि खरोखरच पडत असल्या तरी अशी आवाजाची उघडझाप करत पडल्या नसत्या. दार उघडून बघायचीही सोय नव्हती. बाहेरचा दिवाही फुटला असल्याने अंधारच नजरेस पडला असता. नाही म्हणायला एक टॉर्च जवळ होता पण त्याचा प्रकाशही जेमतेम दहा पावलांवर जाऊन थांबेल एवढाच होता. दुष्काळात तेरावा महिना, आगीतून फोफाट्यात या आशयाच्या सार्या म्हणी एकाच वेळी आठवल्या जेव्हा बाबूने सांगितले की त्याच्या पोटात कळ मारतेय आणि त्याला त्वरीत परसाकडे जाणे गरजेचे आहे. थोड्याच वेळात सार्यांचे नाक चुरचुरले तसे जाणवले की तो सांगतोय त्यात खरेच तथ्य आहे. आता खरी पंचाईत झाली. बाथरूमला जायची सोय आत होती पण संडास मात्र बाहेर होता. बाबूनेही धमकी दिली की जर काही मार्ग नाही काढला तर तो आत मोरीतच करेन. आणि हे आम्हाला परवडण्यासारखे नव्हते. बाबूला आता भुताच्या बापाचेही काही पडले नव्हते. त्याच्यासाठी कोणत्याही परीस्थितीत हलके होणे गरजेचे होते.

कौलांवरचा आवाज गेले पाच-दहा मिनिटे थांबला होता. तरी कोणत्याही क्षणी पुन्हा सुरू होईल याची खात्री नव्हती. त्या आवाजापेक्षाही याची भिती होती की आम्ही दार उघडायची वाट बघत बाहेर कोणी दबा धरून तर बसला नसेल. शेवटी तयारीनिशी बाहेर पडायचे ठरवले. बंड्या हातात टॉर्च घेऊन सर्वात पुढे होता. पाठीमागे दोघे तिघे काठ्या घेऊन. सार्यांनी प्रत्येकाकडे देवाचे चिन्ह असलेली एखादी चैन, अंगठी यासारखी वस्तू जवळ असल्याची खात्री करून घेतली. बंड्याने दरवाजा उघडून पहिला चारही दिशेने टॉर्चचा प्रकाश फेकून जवळपास काही संशयास्पद तर दिसत नाही ना हे बघितले. बंड्याचे खरेच कौतुक वाटत होते. तसा तो मुळातच धाडसी होता, पण इथे आपल्यामुळे बाकीचे सारे संकटात सापडले आहेत तर सोडवणेही आपलेच कर्तव्य आहे याची जाण ठेऊन तो प्रत्येक वेळी पुढाकार घ्यायचा. बंड्याने ग्रीन सिग्नल दिला तसा एकेक करून साखळी बनवूनच आम्ही बाहेर पडलो. प्रत्येकाने आपला मोबाईल बरोबर घेतला होता. त्याचा जेमतेम प्रकाश एकेमेकांचे चेहरे तरी दाखवत होता. छताकडे बघायची कोणाची हिंमत नव्हती. तसाही तिथे अंधारच पसरला होता. टॉर्चचा प्रकाश कदाचित तिथे थोडाबहुत पोहोचला असता पण बंड्याने तो संडासाच्या दिशेनेच रोखला होता. अर्थात तेच आमचे लक्ष्य होते. तोच एक गड काबीज करायचा होता आणि परत फिरायचे होते. बाबू आत शिरला. अर्थात दरवाजा उघडाच ठेवला होता. तो आत जीव मुठीत धरून बसला होता आणि आम्ही सारे बाहेर नाक मुठीत धरून उभे होतो. कोणाला काय बोलावे सुचत नव्हते पण शांतता जास्त भयप्रद वाटत असल्याने मध्येच कोणीतरी उगाच एखादे वाक्य फेकून तिचा भंग करायचा प्रयत्न करत होता. एकेक क्षण युगासारखा भासणे म्हणजे नक्की काय याची प्रचिती येत होती. अश्याच काही सहस्त्र क्षणांनंतर बाबूचे कार्य आटोपले तशी आणखी एकदोघांना हुक्की आली. मनात खरे तर लाखो शिव्या येत होत्या पण नकार द्यायचीही सोय नव्हती. एकदा घरात परतलो तर पुन्हा बाहेर यायची हिंमत होणार नव्हती. त्यापेक्षा एकदाच काय ते सार्यांचे उरकून जाऊ दे असा विचार केला. सारा वेळ मनात धाकधूक होतीच की आता परत आवाज सुरू होईल, आता कोणीतरी अंधारातून अंगावर झेपावेल. पण सुदैवाने तसे काही झाले नाही. जसे शिस्तीत आम्ही बाहेर आलो तसेच परत आत गेलो. दाराची कडी लावली ती आता थेट सकाळी उघडण्यासाठीच.

पण अजून रात्र संपणे बाकी होते. थोडावेळ डोळा लागतो न लागतो तोच पुन्हा दारावर थपथपवण्याच्या आवाजानेच. फार मोठा आवाज नव्हता पण शांततेचा भंग करून आमच्या मनात धडकी भरवण्याइतपत पुरेसा होता. पुन्हा एकदा बंड्यानेच धीर एकवटून “कोण आहे?”, म्हणून आवाज दिला. पण काहीच प्रत्युत्तर नाही आले. परत काही विचारायची आमची हिंमत झाली नाही आणि पुन्हा तो आवाजही नाही आला. पानांची सळसळ मात्र बराच वेळ ऐकू येत होती. आता पुन्हा डोळा लागणे कठीण होते. तसेही तीन वाजले होते. उरलेली रात्र आम्ही तशीच पडल्यापडल्या जागून काढली.

उजाडल्या उजाडल्या सर्वात पहिले दरवाजा उघडून छतावर नजर टाकली. सारी कौले जागच्या जागी होती. त्यावर साधे पानही पडले नव्हते. रात्री नक्की काय चालू होते माहीत नाही पण जे काही होते त्याची एकही निशाणी दिसत नव्हती. आता आणखी या गावात राहण्यात काही अर्थ नव्हता. गेल्या तीन दिवसात मौजमजा कमी आणि भितीचेच अनुभव जास्त घेतले होते. काल गावकर्यांनी सांगितल्याप्रमाणे दुपारी बाराची एस.टी. होती. पण ती जिथून पकडायची होती तिथवर जायला किती वेळ लागतो हे माहीत नव्हते. बरे गावकरी देखील दिवसा जागेवर सापडतील की नाही याची खात्री नव्हती. फारसा विचार न करता पटापट आवरून गावच्या दिशेने निघालो. सारे सामान बरोबरच घेतले होते. परतायची सोय झाली तर तिथूनच परस्पर निघायचे ठरवले. सुदैवाने गावकरी भेटले. त्या क्षणाला ते आम्हाला खरेच देवदूतासमान भासत होते कारण आता तेच आम्हाला या भुताच्या वाडीतून बाहेर काढू शकत होते. कालचा सारा वृत्तांत त्यांना सांगितला तरी अजून त्यांचे हेच म्हणने होते की आम्ही आणखी चार दिवस इथे राहावे. काल जे आमच्या छतावर नाचत होते ती गावातीलच माकडे होती ज्यांना अधूनमधून असा दंगा करायची लहर येते, तरी आजपर्यंत त्यांनी कोणाला त्रास दिल्याचे ऐकीवात नव्हते. पण दारावर थाप कोणी मारली असावी याचे उत्तर मात्र त्यांच्याकडे नव्हते. तरीही आम्ही आमचा विचार बदलावा म्हणून गावकरी सातत्याने मनधरणी करत होते. आम्ही मात्र आमचे मन बनवून आलो होतो. त्यांचा आग्रह केवळ औपचारीकता म्हणून ऐकून घेत होतो. त्यांच्या जागी ते योग्यच होते. आम्ही असा इथून पळ काढणे म्हणजे त्यांच्या गावावर बसलेला बदनामीचा शिक्का आणखी गहिरा होणार होता. पण आमच्या दृष्टीने विचार करता, आता कोणत्याही किमतीत या “भुताच्या गावात राहून बाराच्या भावात जाण्यापेक्षा” इथून पळ काढण्यातच सार्यांचे भले होते. सार्यांबरोबर आठवण म्हणून एक फोटो काढायची इच्छा होती, पण त्यांनी नाराज होऊन यास नकार दिला. म्हणाले की पुढच्या वर्षी परत याल तेव्हा नक्की काढू. वाद घालण्यात किंवा हट्ट करण्यात अर्थ नव्हता आणि पुढच्या वर्षी परत येण्याचा प्रश्नच नव्हता.

सात-आठ गावकरी बरोबर घेऊन आणि बाकी सार्यांचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. इथून आता परत बरेच चालावे लागणार असे वाटले होते. पण एक छोटेसे टेकाड ओलांडले आणि दहा मिनिटातच इच्छित जागी पोहोचलो. एक भलामोठा वटवृक्ष आडवाउभा पसरला होता, ज्याच्या बुंध्याशी आम्ही उभे होतो. वर शेंड्याला शेकडो वटवाघुळे लटकली होती. बरेच जुने खोड दिसत होते. कदाचित विष्णूपंतांच्या काळातील असावे. जाताजाताही विष्णूपंतांची आठवण यावी… कधी एकदा बस येते आणि या गावापासून आणि त्याच्या विचारांपासून दूर जातोय असे वाटू लागले. गावकर्यांनी पुन्हा एकदा विचारणा केली.. शेवटचीच.. पण आमचाही निर्धार ठाम होता. इतक्यात बस आली. हिरमुसलेल्या गावकर्यांना शेवटचा रामराम करून आम्ही बसमध्ये चढलो. बस सुटली तरी आमची नजर गावकर्यांवरच लागली होती. मागच्या खिडकीतून आम्ही त्यांना हात दाखवू लागलो तशी एक “विस्मयकारक” घटना घडली. झूप.. झूप.. झूप.. करून सारे गावकरी आम्हाला हात दाखवतच हवेत उडाले. आणि बघता बघता त्यांची वाघुळे बनून झाडाला लटकली. आमचा क्षणभर डोळ्यांवर विश्वासच बसेना. गेले दोन दिवस आम्ही यांच्याबरोबर राहिलो, यांच्याकडचे खाणे खाल्ले, यांच्या आग्रहाखातर एक ज्यादा दिवस थांबलो, आणि तरी समजू शकलो नाही. या आपल्या मुर्खपणावर रडावे की एवढे होऊनही आपण मुंबईला सुखरूप जात आहोत याबद्दल देवाचे आभार मानावेत हे समजेनासे झाले. पण थांबा… अजून तरी आम्ही कशावरून सुखरूप होतो. बसमध्ये एक नजर फिरवली तर सार्या नजरा आमच्याकडेच लागल्या होत्या. कंडक्टर मात्र आपल्याच नादात पुढे बसला होता. अजूनही तो आमच्याजवळ तिकीटाची विचारणा करायला आला नव्हता. पुढचा मागचा विचार न करता आम्ही सरळ बेल वाजवली आणि गाडी थांबली तसे सरळ खाली उतरलो. शेवटचा मुलगा उतरला तशी बस आपल्या मार्गाने निघून गेली. आम्हीही त्याच वाटेने पुढे चालू लागलो. मागे जाण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. पंधरा-वीस मिनिटांनी एक बसस्टॅंड दिसला. चौकशी करता समजले की अर्धा-पाऊण तास झाला पण या वाटेवरून एकही बस गेली नाही. आता आमची बस कुठे गेली असावी याचा अंदाज लावणे आमच्यासाठी कठीण गोष्ट नव्हती. ती सुद्धा अशीच झाडाला लटकली असावी किंवा पाताळात शिरली असावी. आम्हाला आता त्याची फिकीर नव्हती. सरतेशेवटी आम्ही आपल्या माणसात म्हणजे मनुष्यप्राण्यात आलो होतो. जे काही आम्ही अनुभवले त्याची या अनोळखी लोकांत वाच्यता करून आम्हाला आमचे हसे करून घ्यायचे नव्हते, ना आम्हाला त्यांच्या सहानुभुतीची गरज होती. गोव्याला जायचा बेत कधीच रद्द झाला होता. सर्वांना मुंबईचे वेध लागले होते.

तर मित्रांनो, गोव्याला आम्ही गेलो असतो तर तिथे काय धमाल केली असती यावर पुढच्या वेळी नक्कीच एखादी काल्पनिक कथा लिहेन, पण या सत्यघटनेवर मात्र आपला विश्वास बसला असेल अशी अपेक्षा करतो. बाकी ज्यांचा नसेल बसला ते स्वता भुताच्या वाडीला भेट देऊन याची खात्री करू शकतात. आणि हो, जमल्यास गावकर्यांबरोबर एखादा फोटो काढायला विसरू नका, आमचा जरा राहिलाच… चला तर मग, जगला वाचलात तर भेटू इथेच.. राम राम..!!

————– xxx ————————– xxx ————

अहो वाईच थांबा की, स्टोरी अजून बाकी आहे मंडळी,

मित्रांनो, मी स्वता कोकणातील आहे. त्यामुळे या कथेचा उद्देश कोकणात भुते असतात असा गैरसमज पसरवणे नक्कीच नव्हता. उलट कथेची मांडणी कोणी भुतांवर विश्वास ठेऊ नये आणि घाबरू नये अशीच ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. कोकण काय जगाच्या पाठीवर कुठेच भूत नसते या ठाम मताचा मी आहे. भूत कुठे असते तर ते आपल्याच मनात असते. म्हणून एवढेच सांगू इच्छितो की द्या कुठेतरी भिरकावून त्या आपल्या मनातल्या आयच्या घोवाक भुताला आणि बिनधास्त आमच्या गावाक येवा.. कोकण आपलाच असा ..!

— x — ० — ० — x — समाप्त — x — ० — ० — x —

. . . तुमचा अभिषेक

 

माझी गडचिरोली सफर – एक थरारक अनुभव.

“गडचिरोली” नाव ऐकुनच डोळ्यासमोर काही येत असेल तर ते घनदाट अरण्य आणि नक्षलवादी …

बाकी याबद्दल काही माहित होते तर ते एवढेच की महाराष्ट्राच्या एखाद्या कोपर्‍यात वसलेले गाव.. की जिल्हा… की जंगल असावे.. पण तो नक्की कोणता कोपरा हे देखील मी कधी महाराष्ट्राच्या नकाशावर शोधण्याचे कष्ट घेतले नव्हते..

पण माझ्या गावीही नसलेल्या ह्या गावी मला आयुष्याच्या एका महत्वाच्या वळणावर जावे लागेल हे माहित नव्हते..

मी अभिषेक अशोक नाईक, अका तुमचा अभिषेक, शाळेतील एक हुशार मुलगा, पण मुळातच अभ्यासाची आवड नसल्याने आणि आळशी स्वभावामुळे कसेबसे माझे शिक्षण झाले. आणि झालो एकदाचा स्थापत्य अभियंता. मुंबईतील V.J.T.I. या नावाजलेल्या कॉलेजचा विद्यार्थी असल्याने Campus Interview मधुन कान्दिवलीच्या एका चांगल्या कंपनी मध्ये नोकरीही लागली. पहिल्याच दिवशी कंपनीच्या मालकानी सर्व नवीन मुलांची शाळा घेतली. आपल्याकडे काय काम चालते, कसे चालते, हे सांगितले. कंपनीची लाल करुन झाली. शेवटी म्हणाले, “मुलानो तुम्ही Civil Engineering मध्ये आला आहात, इथे Hardwork ला पर्याय नाही…” पहिल्याच दिवशी माझ्यासारख्या कामचुकार योद्ध्याचे खच्चीकरण करण्याचा यापेक्षा दुसरा सोपा मार्ग नसावा. मनात आले, की सर तुम्ही आधी का नाही भेटलात, आलोच नसतो या लाईन ला..

पुढे ४-५ महिन्यातच मला कळून चुकले की इधर मेरे जैसे आलसी इन्सान का टिकाव लगना मुश्कील है.. पाच आकडी पगाराने सुरुवात तर झाली होती पण पुढची जवानी तो सहा आकडी करण्यात मला घालवायची नव्हती आणि मग दुसरे पर्याय शोधायला सुरुवात झाली. अशातच MPSC ची जाहिरात आली आणि सरकारी नोकरीचा साधा सरळ पर्याय दिसू लागला. फ़क्त एक परीक्षा की काय पास व्हायचे होते. फॉर्म भरला आणि आठवडाभर सुट्टी टाकून दिली. अभ्यास फारसा केला नसुन देखील परीक्षा बरी गेली. मग सुरु झाली ती निकालाची प्रतिक्षा… वर्ष सरले.. सरकारी कारभार ना.. मनोमन ठरवले, ठिक आहे, मी सुद्धा तुमच्याकडे कामाला लागल्यावर अशीच टंगळमंगळ करतो बघा प्रत्येक कामात.. मधल्या काळात नोकरी बदलली, रिलायंन्स मध्ये कामाला लागलो. हो ना करता वर्षभराने लागला एकदाचा निकाल. चांगल्या मार्काने पास होऊन तोंडी मुलाखतीच्या राऊंडसाठी माझी निवड झाली होती. Interview ला जाताना माझी lady luck रिलायन्स मधील माझी बेस्ट फ्रेन्ड प्रेरणा हिला बरोबर घेउन गेलो. Interview छान गेला. पण याचा निकाल देखील यथावकाश ३-४ महिन्याने लागला. आणि अपेक्षेप्रमाने झालो होतो सिलेक्ट.. असिस्टंट ईंजीनिअर (सार्वजनिक बांधकाम विभाग)… आता वाट बघायची होती ती फक्त पोस्टींग कुठे होते याची. पण यालाही परत सहा महीने लागतील असे वाटले नव्हते..

साधारण सहा सात महिन्याने एका मित्राचा फ़ोन आला. अरे नेट चेक कर, तुमची लिस्ट लागली बघ. ऑफिस मध्येच होतो. लगेच PWD ची साईट ओपन करुन चेक केले. पण काही जणांचीच नावे लागली होती त्यात… अर्थातच माझे नव्हतेच, म्हणजे अजून काही दिवस, काही महिने वाट बघा.. त्या लिस्ट वरुन एकदा नजर टाकली तर ३८ पैकी १९ जणांची पोस्टींग मुंबईला झाली होती. मी स्वता मुंबईचा असल्याने आणि संबधित पोस्टसाठी मेरिट मध्ये सुद्धा सर्वप्रथम असल्याने माझी पोस्टींग सुद्धा होईल मुंबईला असा एक विश्वास वाटू लागला.

त्यानंतर मग रोज ऑफिस मध्ये गेल्या गेल्या आधी एकदा PWD ची वेबसाईट चेक करायचो आणि मगच कामाला लागायचो. आणि अश्यातच एकदा हवी होती ती सूचना झळकली. बाकी सारे ठीक होते, पण कसे कोणास ठाऊक, मुंबईच्या जागी मला नागपूर दिसत होते…

पण आता दुसरा पर्याय नव्हता. दोन वर्षे ज्याची वाट बघत होतो तो जॉब केवळ नागपूरला जावे लागणार म्हणून सोडायचा नव्हता. अर्थात नागपूर म्हणजे काही दुर्गम प्रदेश अश्यातला भाग नव्हता, पण मुंबई पासून फार दूर होते. एक महिन्याच्या आत भरती व्हायचे होते. म्हणून सर्वप्रथम काही केले तर ते नोकरीचा राजीनामा दिला.

नागपूर जायची तयारी सुरु झाली. इंटरनेटवरून तिकिटे बूक करून झाली, नागपूरचा मॅप मिळविला, नागपूरच्या जवळपास राहणार्‍या मित्रांकडे चौकशी केली, काय काय बरोबर लागेल याची खरेदी झाली.. थोडक्यात नागपूरला जायची मनाची पण तयारी झाली.

पण….. नागपूरला जायला १० दिवस उरले होते आणि अश्यातच घरी एक पत्र येउन थडकले….. नागपूर विभागातर्फे, नागपूर विभागाअंतर्गत… माझी पोस्टींग…. गडचिरोली येथे झाली होती…

थोडावेळ कोणाला काय बोलायचे हे सुचत नव्हते. आधीच रिलायन्सचा जॉब सोडुन बसलो होतो, राजीनामा मागे घेण्याची अंतिम तारीख देखील टळून गेली होती. आता एकच पर्याय शिल्लक होता, तो म्हणजे जे काही होईल ते होईल, बिनधास्त जा गडचिरोलीला किंवा मग घरी बसा.

दुसर्या दिवशी ऑफ़िसला गेलो. मित्र म्हणाला की एकदा बोलुन तर बघ बॉसशी, काय बोलतो ते.. कदाचित घेइल तुला परत.. पण अंगात मराठ्यांचे रक्त ना, तानाजीने दोर कापून टाकला होता, आणि हा खुद्द तानाजीलाच माघार घ्यायचा सल्ला देत होता. आता जायचेच गडचिरोलीला असे ठरवून नेटवरून गडचिरोलीची माहिती जमा करायला सुरुवात केली. नागपूर ते गडचिरोली – सुमारे १७० कि.मी. अंतर.. आधीच ट्रेनचे नागपूरचे तिकिट बूक केले होते, आता तिथुन आणखी १७० कि.मी. जायचे होते. तिथवर ट्रेन जात नव्हती. म्हणजे गाडीघोड्याची काय व्यवस्था ते पण बघने गरजेचे होते. याच विचारात घरी आलो तर समोर दारातच आणखी एक पत्र घेउन आई उभी.. ही नोटीस गडचिरोली विभागातर्फे आली होती.. त्यानी माझी पोस्टींग गडचिरोली विभागातील, आलापल्ली या उपविभागातील, सिरोंचा इथे केली होती. काहीही रीअ‍ॅक्ट न करता मी सरळ लॅपटॉप उघडला आणि गूगलमॅप वर सिरोंचा शोधू लागलो. गडचिरोली पेक्षा आता आणखी काही वाईट होऊ शकत नाही हा विश्वास…., जो पुढील पाचच मिनिटात तुटला.. सिरोंचा हे ठिकाण गडचिरोलीपासुन १८० कि.मी. अंतरावर होते.. म्हणजे नागपूरपासून तब्बल ३५० कि.मी. झाले होते आता..

जास्त विचार करुन डोक्याला त्रास देण्यापेक्षा थोडावेळ ऑर्कुट वर टाईमपास करायचे ठरविले. आणि कल्पीताई ऑनलाईन दिसल्या..

कल्पीताई म्हणजे कल्पी जोशी, यांची आणि माझी ओळख तशी काही दिवसांपूर्वीच ओर्कुट वरील मुक्तपीठ या कम्युनिटी मधील, आणि ती ओळख सुद्धा त्या नागपूर विभागात राहायच्या म्हणून पुढे मागे कामात येतील या थोड्याश्या स्वार्थी विचारातून झालेली. अर्थात त्या फारशी मदत करतील अशी खास आशा-अपेक्षा नव्हतीचे. कारण त्या तेथील एक नावाजलेल्या कवियत्री ज्यांचे नुकतेच एक कवितांचे पुस्तक आणि गाण्यांची कॅसेट प्रकाशित झाली होती, आणि मी एक असाच टवाळक्या करणारा सभासद. सहज त्याना “हाय” केले आणि आता नागपूर विभागात गडचिरोली मधील सिरोंचा की कुठे जात आहे असे सांगितले.

“अरे व्वा, जा की मग…” समोरुन एक अनपेक्षित प्रतिक्रिया आली. पुढे बोलताना मला समजले की कल्पीताई या सध्या चंद्रपूरला राहायला असून आलापल्ली आणि सिरोंचाच्या आजुबाजूच्या परीसराबद्दल त्यांना थोडीफार माहिती आहे. तसेच त्यांचे काही दुरचे नातलगही तिथे जवळपास राहताते. एवढेच नाही तर त्यानी मला मदत करायची सुद्धा तयारी दर्शवली. बुडत्याला काडीचा आधार असतो, पण इथे तर हातात ओंडका आला होता आणि मला पुढचा मार्ग सुद्धा आता तोच दाखविणार होता.

कल्पीताईंचा फोन नंबर घेउन त्याना “बाय” केले आणि बघतो तर समोर अपर्णा उभी. मी नागपूर नाही तर गडचिरोलीला जात आहे ही खबर लागली होती या बाईसाहेबाना. या बायकांचे नेटवर्क बाकी खूप भारी असते. कुठून खबर काढली देव जाने आणि आता माझ्याबरोबर गडचिरोलीला यायचा हट्ट धरून बसली होती. काय म्हणे तर क्रेझ आहे नक्षलवादी एरिया बघायची.

अपर्णा….!
तशी आमची ओळख ओर्कुटवरच झालेली, पण ऑर्कुट हे तिचे माझ्या आयुष्यात येण्याचे एक माध्यम असावे फक्त.. माझ्यामुळे हसणारी, माझ्यासाठी रडणारी… मला चिडवणारी, पण माझ्यावर कधी न चिडणारी… प्रत्येक मुलाला आपल्या आयुष्यात एखादी तरी अशी मैत्रीण असावी असे वाटावे, अशी माझी बेस्ट फ्रेन्ड अपर्णा.

कोणत्या मुर्खाला वाटणार नाही की हि प्रवासात आपल्या बरोबर असावी, पण मी काही माथेरान किंवा महाबळेश्वरला फिरायला जात नव्हतो. पण आता हे या वेडाबाईला कोण समजवणार..? बरे आईला सांगावे तर ती सुद्धा नेहमीप्रमाणे हिच्याच पक्षात, काय म्हणे तर मुलगी बरोबर असेल तर तुझी कोणीतरी मदत तरी करेल, नाही तर रस्त्यावर झोपायची वेळ येईल. राहता राहिला हिच्या सुरक्षिततेचा प्रश्न तर हा तिने स्वताच सोडविला होता. पर्समध्ये मिरचीपूड ठेउन… आता बोला, बाईसाहेब एवढ्या तयारीत आल्या होत्या तर त्याना नाही तरी कसे कसे बोलणार… शेवटी हो ना करता आम्ही दोघे एकत्रपणे गडचिरोलीवर स्वारी करायला सज्ज झालो..

दुसर्‍या दिवशी कल्पीताईना फोन केला. त्यानी चार धीराचे शब्द सुनावले, आणि बिनधास्त ये असे म्हणाल्या. निदान जायच्या आधीच मनातल्या मनात जे अतिनाटकीय चित्र उभे करुन ठेवले होते ते तरी बर्‍यापैकी निवळले. मी त्याना माझ्याबरोबर अपर्णासुद्धा येत आहे हे सांगितले, तर त्यांनी मला आधी चन्द्रपूरला यायचा सल्ला दिला, अर्थात ते सल्ला कम आमंत्रण होते. कारण कल्पीताई स्वता चन्द्रपूरला B.S.N.L. च्या सेवेत होत्या. त्यामुळे मग पुढच्या सर्व प्रवासाचे प्लॅनिंग कसे करायचे हे ठरवायला त्यांची फार मदत झाली. मला कोणत्याही परिस्थितीत १६ नोव्हेंबर, मंगळवार पर्यन्त सरकारी खात्यात जमा व्हायचे होते. म्हणून आधी नागपूरचे तिकिट रद्द करून रविवारची सेवाग्राम गाडीची चन्द्रपूरची २ तिकीटे बूक केली, अर्थात माझे आणि अपर्णाचे. दुपारी ३ वाजताची गाडी होती, जी चन्द्रपूरला सोमवारी सकाळी १० पर्यंत पोहोचनार होती. तिथुन बस पकडून अहेरीला जायचे ठरले, जे चन्द्रपूरपासून १०० कि.मी अंतरावर होते, अहेरीला रात्री मुक्काम करून मग दुसर्‍या दिवशी म्हणजे मंगळवारी सिरोंचाला पोहोचून तिथे पोस्टींग.

अहेरीला मुक्काम कुठे करायचा हा प्रश्न सुद्धा कल्पीताईनीच सोडविला होता. त्यांच्याच नात्यातील एक सदग्रुहस्थ श्री आतिशकुमार यांचा नंबर त्यानी मला दिला. त्यांच्याशी फ़ोनवर बोलल्यावरसुद्धा बरेच हलके वाटले, सोमवारी रात्री आमच्याच घरी मुक्कामाला या असे त्यांनी सांगितले. कोण कुठच्या कल्पीताई, चार दिवसांची ऑर्कुटवर झालेली ओळख, आणि त्यांच्या नात्यातील अहेरीचे आतिशकुमार. खरेच, आयुष्यात चांगली माणसे भेटायची असेल तर ती कशीही कुठेही भेटतात. अर्थात, जी मुलगी विश्वासाने माझ्याबरोबर गडचिरोलीसारख्या जागी येत होती त्या अपर्णाची आणि माझी ओळख सुद्धा ऑर्कुटवरच तर झाली होती..

Everything is planned…. असे जेव्हा असते तेव्हा सुद्धा तसेच घडेल याचा नेम नसतो, आणि इथे तर सगळे तोडकेमोडके रामभरोसे होते. बरे, शुक्रवारी नेटवरून आलापल्ली बांधकाम विभागाचा फोन नंबर मिळविला आणि तिथे फोन केला तर समजले की सारे जण कोणत्यातरी लग्नसमारंभाला गेले आहेत, आणि शनिवार-रविवार सुटटी असल्याने आता सोमवारीच काय ते भेटतील. परत एकदा मनात आले, सरकारी कारभार… ठिक आहे.., येतोय मी हि.., तुमच्यातीलच एक व्हायला..

जायचा दिवस उजाडला, अपर्णा सकाळीच आमच्या घरी आली होती. पाचेक दिवसांचा काय तो प्रवास होता आणि या बाईसाहेबांनी ८-१० कपड्यांचे जोड आणले होते. म्हणाली की आम्हा मुलीना तेच तेच कपडे रीपीट करायला नाही आवडत. कॅमेरासुद्धा बरोबर घ्यायचा हट्ट करत होती, पण मोबाईल जिंदाबाद बोलून समजावले कसेबसे. बाकी मस्त गॉगलवॉगल डोक्यावर चढवून तयार झालेली, म्हणजे मॅडम एकदम पिकनिकच्याच मूडमध्ये होत्या तर…

निघायच्या आधी परत एकदा नेटवर तिकिट कन्फर्म केले, तर RAC 2, RAC 3 दाखवत होते. म्हणजे निदान बसायची तरी सोय झाली होती. अर्धा तास लवकरच स्टेशनवर पोहोचलो. गाडी आधीच लागली होती पण लिस्टवर आमचे कुठेच नाव दिसत नव्हते.. A/C 3 Tier चे फक्त २ डब्बे होते. चुकुन सेकंड A/C मध्ये झाले असावे म्हणून तेथील लिस्ट चेक केली, तर तिथेही नाव नाही..

दुपारी ३ ची गाडी ३ लाच सुटली पण आमच्या जागेचा पत्ता नव्हता… शेवटी कुठच्यातरी डब्ब्यात चढलो आणि एक रिकामी जागा बघून सामान ठेवले. थोड्यावेळाने T.C. आला. त्यानेही आपली लिस्ट चेक करून सांगितले की, “आपका तो नाम ही नही है, आप without ticket हो, चलो अगले स्टेशन पर उतर जाओ अभी…” झाले, अपर्णाची लगेच टेन्शनने रडायला सुरुवात, खरे तर मलाही टेंशन आले होते, कारण जर ही ट्रेन चुकते तर माझी पोस्टींगची लास्ट डेटही चुकली असती. तरीही हातातल्या Electronic Slip वर भरवसा होता, यात RAC लिहीलेय म्हणजे निदान बसायला तरी नक्की दिले पाहिजे. कुठेतरी काहीतरी चुकत होते, पण नक्की काय ते मला समजत नव्हते आणि तो T.C. काही समजुन घेणार्‍यातील वाटत नव्हता. त्याचे मग्रुरीने बोलने पण एवढे डोक्यात गेले ना कि या रेल्वेमधील भैय्या लोकांविरुद्ध आज जे काही मराठी नेते आवाज उठवत आहेत ते योग्यच आहे असे वाटू लागले. शेवटी सरळ भाषेत त्याला सांगितले, “मेरा इंटरनेट से टिकिट बूक है, पैसा भी कटा हुआ है, अभी मेरा नाम यहा क्यू नही ये मेरेको मालूम नही, मै इस ट्रेन मे से उतरने वाला नही हू… बस…!!” त्याने लगेच एक फोन फिरविला. वाटले आता रेल्वे पोलिस नाहीतर रेल्वे स्टाफची चार पोरे येतील आणि आपल्याला धक्के मारून उतरवतील पण पाचच मिनिटात आणखी एक T.C. आला. नशीबाने हा मराठी होता. बाकी काहिही बोला, अश्यावेळी मराठी माणूस भेटणे खरेच आधाराचे असते. काका-मामा करून हळुहळू त्यांना सगळा प्रॉब्लेम समजवून सांगितला. त्यांनी माझी स्लिप हातात घेउन चेक केली आणि…. दुस‍र्‍याच क्षणाला मोठमोठयाने हसायला लागले…

C.S.T. Mumbai वरुन सुटणारी सेवाग्राम एक्सप्रेस हिचे खरे म्हणजे २ भाग असतात. वर्धा जंक्शन इथे पोहोचल्यावर एक भाग तसाच नागपूरला जातो, तर दुसरा भाग ईजिंन पासून वेगळा होऊन पॅसेंजरला जोडला जातो आणि मग ती गाडी चन्द्रपूरमार्गे बल्लारशहा इथे जाते. असे काही असते हे आम्हाला माहीत नव्हते, आणि चुकून आम्ही नागपूरला जाणार्‍या डब्यात चढलो होतो. अर्थात ही चूक त्या आधीच्या T.C. ला कशी लक्षात आली नाही याचा राग आलाच, पण शेवटी एका टेंशन मधून मुक्त झाल्याच्या आनंदात त्या दोघांचे आभार मानून आमच्या डब्याकडे रवाना झालो.

एव्हाना सहा वाजले होते, तीन तास तणावाखाली कसे गेले समजलेच नव्हते. रात्री नऊ वाजता भारतीय रेल्वेचे जेवण करून झाले. अपर्णा बरोबर असल्याने झोपायचा प्रश्नच नव्हता, रात्रभर गप्पांची मैफल रंगली, अर्थात एकतर्फीच… तिची बडबड ऐकता ऐकता कधी झोप लागली समजलेच नाही. सकाळी लवकरच जाग आली. तशी मला झोपायची आवड असली तरी अश्या प्रवासात मात्र सकाळी उठून बाहेरचे निसर्गसौंदर्य बघायची संधी मी सोडत नाही. चन्द्रपूर जवळ आले तसे कल्पीताईंना फोन लावला, पहिला हॉल्ट तिथेच होता. कल्पीताईंचे ऑफिस चन्द्रपूर स्टेशनच्या बाहेरच होते. चन्द्रपूरला आल्यावर तसे बरे वाटत होते. स्टेशनच्या जवळपास बर्‍याच सरकारी इमारती होत्या. अजूनपर्यंत तरी कोणत्या दुर्गम भागात आल्यासारखे वाटत नव्हते. B.S.N.L. चे ओफ़िस शोधून कल्पी जोशी यांची चौकशी केली तर एकाने थेट त्यांच्या टेबलपर्यंत आणून सोडले. अपेक्षेपेक्षा चांगले स्वागत झाले, जणू काही माझी एखादी मावशीच भेटत होती मला. ख्यालीखुशाली विचारून झाली, चहापाणी झाले. मग कल्पीताईंनी ऑफिसच्या लोकांना आमची ओळख करून द्यायला सुरुवात केली. मुंबई वरून आलेत, PWD मध्ये Asst. Engg. म्हणून सिलेक्शन झालेय हे सांगितल्यावर समोरच्याच्या डोळ्यात दिसणारे कौतुक माझी पोस्टिंग सिरोंचा इथे झाली आहे हे समजल्यावर सहानुभूती मध्ये बदलत होते. प्रत्येकजण मग तिथे कसे राहायचे, कसे वागायचे याच्या सूचना देऊ लागला. एका क्षणी वाटले की कुठे या पोरीला घेऊन पुढे जायचे, इथुनच परत फिरुया. पण अपर्णानेच जायची तयारी दर्शविली. खरेच, कौतुक वाटले या पोरीचे.

चन्द्रपूरहून निघायच्या आधी आलापल्ली बांधकाम विभागाला परत फोन केला, एव्हाना वर्‍हाड लग्नावरून परत आले होते. श्री. जयराम म्हणून कोणी Jr. Engineer होते, त्यानी फ़ोन उचलला. माझे नाव सांगताक्षणीच ओळख पटली, कारण त्यांच्याकडे सुद्धा नोटिसीची एक प्रत पोहोचली होती. “आप आ जाओ साहब, मै स्टॅंड पे आ जाता हू.. आपको लेने के लिए..” खूप विश्वास आला या शब्दांनी. एक म्हणजे तिथे कोणीतरी आहे ज्याला आपली काळजी पडली आहे, आता मी एकटा नाही आहे तर आपली मदत करायला, पुढचा मार्ग दाखावायला आहे कोणीतरी तिथे. आणि दुसरे म्हणजे ‘साहेब’ हे सबोंधन. जोईन करायच्या आधीच डिपार्टमेंटचा माणूस झाल्यासारखे वाटू लागले होते.

कल्पीताईंचा निरोप घेऊन आलापल्लीच्या दिशेने रवाना झालो, इथून पुढचा प्रवास बसने करायचा होता. त्यामुळे गाडी लागल्यावर उलटी होऊ नये म्हणून गोळ्या घेतल्या. अपर्णाला गाडी लागायचा खूप त्रास होतो नेहमी, त्यामुळे अश्या प्रवासाच्या आधी ती काही खात नाही की प्रवासात काही बोलत नाही. आज सोमवारचा तिचा उपवास असल्याने तसेही तिने काही खाल्ले नव्हतेच, पण तिचे न बोलणे म्हणजे माझ्यासाठी सुद्धा एक प्रकारचा उपवासच होता.

चन्द्रपूर बसस्टॅण्डवर तेव्हा आम्हीच सेंटर ऑफ अ‍ॅट्रेक्शन वाटत होतो. साहजिकच होते म्हणा, आमचा गेट-अपच तसा होता. अपर्णा ही जीन्स-कुर्ता मध्ये, माझी सिक्स पॉकेट आणि डेनिमचे डार्क ब्लू शर्ट, दोघांच्या डोळ्यावर गॉगल, पाठीवर मोठाल्या सॅक, हातात पाण्याची बॉटल ज्यातून दर दोन मिनिटाने पाण्याचा एक घोट मारणे सुरूच. पण आम्हाला मात्र उगाच लोकांच्या डोळ्यात भरायचे नव्हते. कारण कल्पीताईंच्या ऑफिसमधील लोकांनी दिलेल्या सूचनाच तश्या होत्याप… प्रवासात कोणाला सांगू नका की आम्ही बांधकाम विभागाचे आहोत म्हणून, बसमध्ये तुमच्या बाजूलाच एखादा त्यातील बसला असेल की तुम्हाला ओळखता ही येणार नाही. दिसायला आपल्यासारखेच एज्युकेटेड असतात ते, स्थानिक लोकांमध्ये सुद्धा त्यांचे एवढे कनेक्शन असतात की एखादा सरकारी अधिकारी तिथे पोहोचायच्या आधीच त्यांना खबर असते, २-४ दिवसातच तुमच्या फोन नंबर पासुन सगळे डिटेल त्यांच्या अकाउंटला जमा झाले असतील, तिथे राहताना देखील आजूबाजूला काय चालू आहे याचे आपल्याला काही देनेघेणे नाही असाच आपला अ‍ॅटिट्यूड ठेवा, स्थानिक लोकांशी तर मु्ळीच वाद नको, आपली चुक नसली तर कान पकडून चुकलो म्हणायचे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे… कोणी कितीही आग्रह केला तरी सरकारी गाडीतून फ़िरु नका..!

याच विचारात असताना बस स्थानकात शिरली. अपर्णाची बसायची चांगली सोय व्हावी म्हणून त्वरीत दाराकडे धाव घेतली. बसमधील सर्व जन उतरल्यावर विजयीविराच्या आवेशात आत चढलो आणि बघतो काय तर प्रत्येक सीटवर कोणाचा न कोणाचा रुमाल, फडके, बॅगने आधीच जागा अडविली होती. इतरवेळी नक्कीच इकडचा रूमाल तिकडे करून काहीतरी झोल केला असता, पण इथे कोणाशी पंगा घ्यायचा नव्हता. तरीही थोडेफार झगडून लास्ट सीट वर दोघांपुरती जागा मिळविली. पण मग एका वृद्ध जोडप्याला बसायला जागा देउन स्वता उभा राहिलो. पुढचा ३ पैकी २ तासाचा प्रवास मग उभ्यानेच झाला. म्हातारे जोडपे मात्र बसायला जागा मिळाली म्हणून खूश होते बाकी माझ्यावर. त्यामुळे प्रवास तसा कंटाळवाना झाला नाही. प्रवासभर त्यांची बडबड चालूच होती. बोलता बोलता समजले की त्यांचा मुलगा गडचिरोली फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये कामाला आहे. त्यामुळे सहज विश्वासाने मी सुद्धा त्यांना माझ्याबद्दल सांगितले. त्याचबरोबर आजूबाजुच्या २-४ लोकांचेसुद्धा कान टवकारले गेले. अर्थात नंतर अपर्णाने मला यावरून बरेच सुनावले.

दुपारी ४ वाजता गाडी आलापल्लीला पोहोचली. स्टॅंडला उतरलो तोच डिपार्टमेंटची दोन माणसे पुढे आली. तसे आम्हाला ओळखणे फारशी कठीण गोष्ट नव्हती. त्यांच्यातील एक श्री जयराम होते, ज्यांच्याशी माझे फोनवर बोलणे झाले होते. आणि दुसरा मात्र माझ्यासारखाच पोरसवदा मुलगा होता. अजय पोटे, जो माझ्याबरोबरच सिलेक्ट झाला होता. वीसेक दिवसांपूर्वीच सिरोंचा इथे जॉईन झाला होता पण आज काही कामानिमित्त आलापल्ली इथे आला होता. चेहर्‍यावर थोडेसे कौतुकाचे भाव होते त्याच्या. कारण मी मुंबई वरून एवढ्या लांब काही येत नाही असेच त्याला वाटले होते. त्यांच्याबरोबर बोलत ऑफिसपर्यंत पोहोचलो जे स्टॅंडपासून पाचच मिनिटांच्या अंतरावर होते. महाराष्ट्रातील कोणत्याही सरकारी ऑफिससारखेच होते ते. बाहेरच सरकारी पांढरी गाडी उभी होती जिला पाहताच चुकूनही तिच्यात बसायचे नाही हि सूचना आठवली. सर्वांशी ओळख झाली, चहापाणी झाले. सुदैवाने मला जॉईन करण्यासाठी सिरोंचाला पोहोचायची गरज नव्हती कारण इथूनच पुढचे सोपस्कार होणे शक्य होते. फक्त जॉईन व्हायच्या आधी सहाय्यक कार्यकारी अभियंता (Asst. Exe. Eng.) श्री. पाटील यांच्याशी एकदा भेट घेण्यास सांगितले.

पाटीलसाहेबांच्या चेहर्‍यावर सुद्धा तसेच भाव दिसत होते जसे इथे आल्यापासून मी सार्‍यांच्या चेहर्‍यावर बघत होतो. कोण हा येडछाप मुंबई वरून इथे मरायला आला आहे. बाकी आता याची सवय़ झाली होती. पण रिलायन्समधील Design Engineer चा जॉब सोडून आलो आहे हे ऐकल्यावर तर ते आणखीनच वाढले. अर्थात मुलगा हुशार असणार अशी एखादी कौतुकाची छटा सुद्धा त्यात दिसल्यासारखी वाटली. साहेबानी जॉईन तर करून घेतले, पण म्हणाले आला आहेस तर ५-६ महिने राहा इथे, फिर जरा, आजूबाजूचा परिसर बघ, मग बघू कामाचे काय ते… म्हणजे मी इथे टिकत नाही याची त्यांनाही पुर्ण खात्री होती तर.. पाटील साहेबांनीच मग आमची त्या रात्रीची राहायची सोय आलापल्ली PWD Guest House वर केली.

त्यानंतर शेवटचा भेटायचा कार्यक्रम होता तो कार्यकारी अभियंता, आलापल्ली उपविभाग (Executive Engineer) यांच्याबरोबर.. आणि त्या पदावर चक्क एक महिला होती. भोसले मॅडम, जसे नाव तसेच व्यक्तीमत्व. भारदस्त आणि प्रसन्न. मॅडम आपल्या कामात काहिश्या व्यस्त होत्या, म्हणून मी सहज त्यांच्यामागचा बोर्ड वाचू लागलो. माजी कार्यकरी अभियंत्यांचे नाव आणि कार्यकाल लिहिला होता त्यात. गेल्या ४-५ वर्षाच्या कालावधीत १५-१६ नावे दिसली, आणि चालू वर्षातील या मॅडम सुद्धा पाचव्या होत्या. एक जण तर केवळ ११ दिवसांचा पाहुणा होता त्यात… ती लिस्ट पाहता आता मी किती दिवस टिकतोय हाच विचार मनात येऊ लागला…

“भीती वाटते का?” समोरून अचानक आलेल्या प्रश्नाने विचारांची लिंक तुटली. उत्तरादाखल केवळ हसलो. भीती वाटत असती तर आलोच नसतो ना एवढ्या लांब, हेच त्यातून दाखवून द्यायचे होते.

“नक्षलवाद्यांबद्दल बरेच ऐकले असशील ना..?”, भोसले मॅडमनी विचारले.

हो, ते तर बरेच उलट-सुलट ऐकून आलोय, बाकी खरे काय खोटे काय ते समजेलच काही दिवसात… मनातल्या मनातच म्हणालो.. आणि उत्तरादाखल पुन्हा फक्त हसलो.

माझ्याशेजारी तेव्हा पांढरा सदरा-लेंगा घालून एक सद्ग्रुहस्थ बसले होते. त्यांची ओळख झाली तसे समजले की ते तेथील राजकारणातील एक बडे प्रस्थ तसेच नावाजलेले समाजसेवक होते. श्री बाबा कदम, स्थानिक व्रुत्तपत्रांमध्ये सतत झळकनारे एक नाव, ऐकल्या-वाचल्यासारखे वाटले कुठेतरी. मुंबईवरून एवढ्या लांब त्यांच्या विभागात आलो म्हणून बाबासाहेबांना सुद्धा माझे तसे कौतुकच वाटत होते. त्या रात्रीला ते देखील मुक्कामाला आमच्या बरोबर गेस्टहाऊसलाच राहणार होते.

एवढा वेळ बिचारी अपर्णा मात्र माझी वाट बघत एकाच ठिकाणी बसून होती. तिला बरोबर घेउन मग आम्ही गेस्टहाऊसकडे निघालो.

गेस्टहाऊस तसे बर्‍यापैकी छान होते. एकूण आठ खोल्या होत्या. पण त्या आठवड्यात तिथे कुठला तरी समारंभ असल्यामुळे सगळ्या फुल झाल्या होत्या. बाबासाहेबानी आपल्या मोठेपणाचा जराही बाऊ न करता, तेथील एका सहकार्‍याच्या रूम मध्ये स्वताला अ‍ॅडजस्ट करून घेतले. पण माझ्याबरोबर अपर्णा असल्याने तेथील एका रूममधील सर्व लोकांना दुसरीकडे वळवून आमची सोय करण्यात आली. “एखादी मुलगी बरोबर असली की राहण्याची काही ना काही सोय होते, हे आई बरोबरच बोलत होती हे जाणवले. रूमदेखील छान मोठी आणि ऐसपैस होती. आत शिरताच सामान सोफ़्यावर फेकून स्वताला बेडवर झोकून दिले. प्रवासाचा थकवा जाणवू लागला होता. त्यातच सकाळपासून फारसे असे काही खाल्ले देखील नव्हते. आंघोळ करून मग आधी जेवनाची ऑर्डर दिली. एव्हाना अंधारून आले होते. रात्र झाल्यावर इथे बाहेर पडू नका अशी विनंती कम सूचना बरोबरच्यांनी आधीच केली होती, आणि ती मानण्यातच शहाणपण होते. जेवन यायला अजून अर्धा तास लागनार होता, तो पर्यंत गप्पा मारायला म्हणून बाबासाहेब आमच्या रूमवर आले. थोड्यावेळातच आमची ट्यूनिंग छान जमली. आणि मग बाबासाहेब सुरु झाले. तिथे गेल्यावर पहिल्यांदाच कोणीतरी माझ्याशी एवढे नक्षलवाद्यांबद्दल बोलत होते आणि मी ते विश्वासाने ऐकत होतो,

“नक्कीच आदिवासींवर अत्याचार होतात. मी गेल्यावर्षी सिरोंचा आणि भामरागडला साधारण १ महिना होतो. तिथे खरेच डोके सुन्न करणारी परिस्थिती आहे. नक्षलवादी तेथील आदिवासींवर खूप अत्याचार करतात. तेथील युवकाना शाळेत जाऊन देत नाहीत. खूप दहशत आहे त्यांची. तिथे दि एड विद्यालय आहे पण स्थानिक आदिवासी एकही नाही. तेन्दु पत्ता, बांबू कापणी साठी नक्षलवादी खूप अत्याचार करतात. खूप कमी पगारावर त्यांना राबविले जाते आणि नक्षलवादी लोकांविरुद्ध काही बोलले तर मारुन टाकले जाते. नक्षलवादी आणि टेंडर मालक आणि तेथील नेता यांच्या संगनमताने ही सगळी पिळवणूक चालते. यातून मिळणार्‍या पैश्यांवर अंकुश ठेवण्यासाठी नक्षलवादी लोकांचा वापर केला जातो. अर्थात त्यातील मोठा भाग या नक्षलवादी लोकाना दिला जातो. आता जर हे आदिवासी लोक सुधारले तर या टेंडरमालकांचे, नेत्यांचे, आणि नक्षलवाद्यांचे खूप प्रॉब्लेम होतील म्हणून हे नक्षलवादी अश्या प्रकारची डेवेलपमेंट जाणूनबुजून होऊन देत नाहीत. मध्यंतरी या सर्व आदिवासीना गाई म्हशी दिल्या होत्या आणि दुधाचा प्रकल्प सुद्धा सुरू केला होता पण या नक्षलवादी लोकांनी आदिवासींना दूध न देण्याबदद्ल धमकावने सुरू केले. परिणामी दुधाचा प्रकल्प बंद झाला. गायी म्हशींचा वापर सध्या शेणासाठी केला जातो. तर थोडक्यात अशी आहे ही सगळी परिस्थिती….”
आता या सर्वांमध्ये मी कुठे येतो आणि मला नक्की येथील स्थानिक लोकांपासून भीती आहे की नक्षलवाद्यांपासून की यातले काहीच नाही, म्हणजे मी भला आणि माझे काम भले असा अटिट्युड मला ठेवायचा आहे की आणखी काही… काही कळेनासे झाले. तेवढ्यात जेवण आले आणि बाबासाहेब आमचा निरोप घेउन निघाले.

काही का असेना दुसर्‍या दिवशी आम्हाला सिरोंचासाठी निघायचे होते. दिवसभराच्या थकव्याने लगेच डोळे मिटले, सकाळी सुद्धा बरीच उशिरा जाग आली. पाटीलसाहेबांची भेट आणि परवानगी घेउन आम्ही सिरोंचाला निघालो. अपर्णाला गाडी लागायचा त्रास होतो म्हणून यावेळी खाजगी वाहनाने प्रवास करायचे ठरविले. आलापल्ली ते सिरोंचा (९८ कि.मी.) म्हणजे साधारण २ तासांचा प्रवास होता. आलापल्ली सोडून जशी गाडी हायवेला लागली तसा मस्त वारा वाहू लागला. रस्त्याच्या दोन्ही बाजुने मस्त घनदाट जंगल होते. नेटवर गूगलमॅप आणि छायाचित्रांमध्ये जंगल बघणे आणि स्वता ते जंगल कापत पुढे जाणे यातील फरक अनुभवत होतो. याची मजा काही औरच होती. दोघांच्याही मनात यावेळी जराही भिती नव्हती, उलट कॅमेरा बरोबर का नाही घेतला याची हळहळ वाटत होती. अपर्णा पाठीमागे इतर बायकांबरोबरच बसली होती आणि मी पुढे ड्रायव्हरच्या बाजूला बसलो होतो. वासिम शेख, ड्रायव्हर मुसलमान होता. दुसर्‍या दिवशी ईद असल्याने स्वारी खुशीत होती. गाडीत पाठीमागे एक नर्स बसली होती. ती सुद्धा सिरोंचाला कामाला होती. नेहमीची सवारी असावी. ड्रायव्हरच्या आणि तिच्या गप्पा चालू झाल्या. ड्रायव्हरचा हिंदी बोलायचा टोन हैदराबादी होता, त्यामुळे ऐकायला मज्जा वाटत होती. थोड्याचवेळात मी सुद्धा त्यांच्या गप्पात सामील झालो. त्या दोघांकडून सिरोंचा बद्दल बरीच माहिती समजली.

जेव्हा मी त्यांना सांगितले की माझी तिथे सहाय्यक अभियंता म्हणून पोस्टींग झाली आहे तेव्हा तो ड्रायव्हर लगेच म्हणाला, “अरे आपके चौधरी साहब तो मेरे खास पेहचान के थे. मेरे गाडी मे ही आते जाते थे. तीन महीने पहिले कार्लेश्वर मंदीर के यहा कही सर्व्हे करने गये और उधरही मर गये.” मी आणि अपर्णा दोघे दचकून एकमेकांकडे बघू लागलो… मर गये या फिर मार दिये गये..??

कदाचित ते ड्रायव्हरच्या लक्षात आले असावे. त्यावर तो हसून म्हणाला, “अरे वैसे नही, हार्टअ‍ॅटेक से गये..” तरीही सारे संशयास्पद आहे असाच भाव आमच्या चेहर्‍यावर होता. मग त्या ड्रायव्हर आणि नर्स कढून हळूहळू तिथे घडलेल्या नक्षली कारनाम्यांची माहिती मिळू लागली. गेल्या ३-४ महिन्यांच्या कालावधीत बरेच काही घडले होते या सिरोंचा नावाच्या छोट्याश्या गावात. दोन पोलिस मारले गेले होते, चार-पाच सरकारी अधिकार्यांच्या एका टीमचे अपहरण झाले होते. गावचा सरपंच सुद्धा पोलिसांचा खबरी म्हणून मारला गेला होता. ज्या रोड ने आम्ही आता प्रवास करत होतो तो तर घातपातांसाठी प्रसिद्ध असा होता. अर्थात ते तसेही आम्हाला कळून चुकले होतेच. कारण अधूनमधून काही ठिकाणी भर रस्त्यात झिगझॅग पॅटर्नमध्ये १०-१२ ड्रम मांडलेले दिसायचे, जेणेकरून गाडीचा वेग मंदावण्याशिवाय पर्याय नाही. आणि मग तिथेच कुठेतरी रस्त्याच्या कडेला साध्या वेषातील स्टेनगनधारी पोलिस दिसायचा. अर्थात तो पोलिस आहे हे सुद्धा आम्हाला त्या ड्रायव्हरने सांगितले म्हणून समजले नाहीतर आधी आम्हाला तो नाना’च वाटला होता. “नाना” हा कोडवर्ड मी आणि अपर्णाने नक्षलवाद्यांसाठी बनविला होता.

त्या ड्रायव्हरने आम्हाला थेट बांधकाम विभागाच्या ऑफिसपर्यंत आणून सोडले. आजूबाजूचा परिसर छान होता. ऑफिसला लागूनच आमचे राहण्याचे क्वार्टरस होते. माझ्याआधी जॉईन झालेले दोघेजण आणि आधीपासून तिथे असलेला एक Jr. Engineer तिथेच राहत होते. खरे म्हणजे नुसते घर नाही तर त्यांचे ऑफिससुद्धा तेच होते. कारण त्यांची सगळी कामे तिथेच बसून चालायची. कॉम्प्युटर, ईंटरनेट, प्रिंटर, फोन सगळ्या सोयी-सुविधा त्या Jr. Engineer च्या क्वार्टरमध्येच होत्या. एवढेच नव्हे तर त्याची स्वताची कारसुद्धा होती, आणि दर महिन्याला एकदा तो आपल्या घरी किंवा बायकोच्या माहेरी जाउन यायचा, ते सुद्धा विमानाने. हैदराबादचे विमानतळ तिथून जवळ पडायचे. थोडक्यात काय, तर जिथे कनिष्ठ अभियंता एवढे छापत असेल तिथे माझ्यासारखा सहाय्यक अभियंता नक्कीच उपाशी मरणार नव्हता.

त्या दिवशी आमची राहण्याची सोय Guest House मध्ये केली होती. खाली कोणीतरी दुसरे थांबले होते, वरचा मजला आम्हाला दिला होता जो VIP गेस्टरूम होता. आई खरेच बरोबर म्हणाली होती, मुलगी बरोबर असेल तर राहायची व्यवस्था नेहमी चांगली होते, हे पुन्हा एकदा पटले. गेस्ट हाऊस खरेच भारी होते, आणि त्यापेक्षा भारी होते ते त्याच्या व्हरांड्यातून दिसणारे दृष्य. व्हरांडापण कसला जणू काही टेरेस फ्लॅटच होता तो. पोहोचलो तेव्हा संध्याकाळ झाली होती आणि खरे सांगतो, एवढा नयनरम्य, डोळ्यांचे पारणे फेडनारा कि काय म्हणतात तो सुर्यास्त आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवत होतो, आणि तो सुद्धा अनपेक्षितपणे. अपर्णा तर हरवूनच गेली. मी सुद्धा पटकन मोबाईल काढून त्या सर्वाचा एक विडिओ चित्रित केला. सिरोंचाच्या ज्या नदीबद्दल ऐकून आलो होतो तिचे असे सुर्यास्ताच्या पार्श्वभूमीवर विलोभनीय दर्शन घराच्या व्हरांड्यात बसल्याबसल्या होणे हा खरच सुखद धक्का होता. खाली डाव्या बाजूला प्रशस्त आवार होते आणि मधोमध एक मंदीर, ज्यामुळे एकंदरीत वातावरणाला आपसूक एक मांगल्य आले होते. उजव्या बाजूला पाठीमागे पसरलेले सिरोंचा गाव दिसत होते. एकंदरीत ते गेस्ट हाऊस एका मोक्याच्या जागेवर होते जिथून सार्‍या गावाचा व्ह्यू मिळत होता. अपर्णाला सुद्धा माझ्याबरोबर मुंबईहून एवढे लांब आल्याचे सार्थक झाल्यासारखे वाटले. पहिल्यांदाच मला ही असे वाटले कि जर खरेच असे निसर्गसौंदर्य अनुभवता येणार असेल तर राहूया खुशाल इथे वर्षभरासाठी… पण ते वाटणे शेवटचेच ठरले..

रात्रीच्या जेवणाची सोय गेस्टहाऊसमध्येच झाली असती, पण आमचा खानसामा ४ दिवसांसाठी रजेवर गेला होता. म्हणून मग बरोबरच्या २ ईंजिनीअरसह बाहेर खानावळीत जायचे ठरविले. ते साडेसहा-सातलाच जायचे बोलत होते, पण ही कसली जेवायची वेळ असे बोलून आम्ही साडेसात पर्यंत टाईमपास केला. पण साडेसहा आणि साडेसात मध्ये काय फरक असतो हे आम्हाला त्या दिवशी समजले. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. रस्त्यांवर दिवे असण्याचा प्रश्नच नव्हता. उलट आम्हाला आमच्या बॅटरीचा प्रकाशसुद्धा फार कमी वाटत होता. तरी एक बरे होते की बरोबरच्या दोघाना रस्ता व्यवस्थित माहीत होता. खानावळ सुद्धा जेमतेमच होती. कसेबसे जेवण उरकून बाहेर पडलो. अपर्णाला रात्री खाण्यासाठी काहीतरी घ्यायचे होते म्हणून आजूबाजूला एखादे दुकान दिसते का हे बघायचे ठरविले होते, पण त्याची आता काही सोयच उरली नव्हती. रस्त्याने जाताना आजूबाजूला नजरेला पडनारे स्थानिक लोकांचे कोंडाळे छातीत अक्षरशा धडकी भरवत होते. त्या अंधार्‍या रात्री ते भिल्ल आणखी आणखी काळेकुट्ट वाटत होते. सगळ्यांचा नजरा आमच्यावरच रोखल्या होत्या. त्यांच्या नजरेला नजर न देता गप सरळ नाकासमोर बघून चालन्यातच शहाणपणा होता. अपर्णाने माझा हात घट्ट पकडून ठेवला होता. मला काय दुर्बुद्धी सुचली जे मी या मुलीला असल्या जागी बरोबर घेउन आलो असे वाटू लागले. माझ्याबरोबरच्या दोन सहकार्‍यांची सुद्धा तशीच अवस्था असावी. त्यांच्यासाठी हा रस्ता सवयीचा झाला असला तरी मुलगी बरोबर असल्याने त्यांना देखील असुरक्षित वाटू लागले होते. मगाशी जेवताना एवढ्या गप्पा मारणारे ते दोघे आता मात्र चिडीचूप होते. ऑफिसच्या आवारात शिरलो. गेस्ट हाऊसची बिल्डिंग त्या भयान अंधारात एखाद्या विरान डाकघरासारखी वाटत होती. त्या एकंदरीत वातावरणाला एवढे घाबरलो होतो की बरोबरच्या दोन साथीदारांची क्वार्टर आल्यानंतर पुढे आमच्या गेस्टहाऊस पर्यंत जायला आम्ही वॉचमनला बरोबर घेतले.

वॉचमनला टिप देऊन कटविले आणि दार बंद करून घेतले तोच अपर्णा आतून किंचाळत परत बाहेरच्या खोलीत धावत आली. भिंतीवर पाल की काय पाहिली होती तिने. तशी ती एवढी काही डरपोक नव्हती पण कदाचित अजून मगासच्या वातावरणातून बाहेर आली नसावी असे वाटून आत जाउन पाहिले तर क्षणभर मी सुद्धा चरकलो. पाल कसली चक्क सरडा वाटत होती ती आकाराने. लांबूनच शुक शुक करून आणि पाय आपटून तिला पळवायचा प्रयत्न केला तशी ती खिडकीच्या पडद्यामागे गेली… पण ती गेली तशी पडद्याच्या दुसर्‍या बाजूने आणखी एक सळसळत बाहेर आली. घरभर नजर फिरविली तर अरे बापरे…, पालींचे साम्राज्य पसरले होते सगळीकडे.

तरी एक गोष्ट चांगली होती की आमचे बेडस रूमच्या मधोमध होते, कुठे भिंतीला लागून नव्हते. मगाशी याच रूमच्या व्हरांड्यातून अनुभवलेली संध्याकाळ आणि आताची रात्र, दोन टोकाचे अनुभव होते. आतासे कुठे साडेआठ-नऊ वाजत होते, त्यामुळे झोपही अशी काही येत नव्हती. पण जागे राहून ती रात्र आणखी भयान होत जाताना पाहण्यापेक्षा सरळ झोपून जाणे हाच चांगला पर्याय होता. एकदा सकाळ झाली की परत तेच विलोभनीय दृष्य असणार होते. म्हणून अपर्णाला झोपायचा सल्ला दिला तर खरा, पण स्वताला डोळे मिटायची सुद्धा भीती वाटत होती. तसेच एकमेकांच्या नजरेत नजर घालून बराच वेळ बघत होतो. माझ्या नजरेत आधार शोधणारी तिची नजर नकळत मलाच आधार देउन जात होती. नकळत डोक्यातले सारे विचार शून्य झाले, जणू काही ती काळरात्र काही क्षणांपुरती थांबली होती आणि आमच्यातील अव्यक्त असे नाते अलगदपणे उलगडले जात होते. तेवढ्यातच बाहेरच्या दारावर थडथड झाली. आणि आमची तंद्री भंगली. आतूनच विचारले, “कोण आहे…?” तर उत्तरादाखल त्याहीपेक्षा मोठी थडथड… जणू काही दार उघडा नाहीतर तोडून आत येतो असेच सुचवायचे होते.

अपर्णाला नजरेनेच धीर देऊन मी दार उघडायला बाहेर आलो. पण पाठोपाठ अपर्णासुद्धा आली. कदाचित तिला एकटीला आत थांबायची भिती वाटत असावी किंवा मला सोबत म्हणून आली असावी. दार उघडून पाहतो तर समोर ३-४ अनोळखी लोक. त्यात मगाशी आम्हाला सोडायला आलेला रात्रपाळीचा वॉचमन सुद्धा होता. त्यालाच विचारले काय झाले, तर बाजूचा उत्तरला, “कुछ नही साब, बडे साहब आपसे मिलना चाहते है.”

अरे कोण बडा साहब? आणि ही काय वेळ होती भेटायची? रात्रीचे नऊ म्हणजे तिथे बारा वाजून गेल्यासारखेच होते. अश्यावेळी हे अनोळखी लोक दारात. एकाला न्यायला ४ जण… एक ना दहा, हजार प्रश्न एकाचवेळी डोक्यात आले. वाटले की कल सुबह मिलते है असे सांगून कटवावे सरळ. तेवढ्यात आणखी एक जण गरजला, “चलो जल्दी करो साब, टाईम नही है अपने पास.” त्याच्याकडे पाहिले तर काळाकुट्ट धटिंगण होता. जर मी यायला नकार दिला तर मला सहज खांद्यावर टाकून आणता येईल यासाठी त्याला घेऊन आले असावेत. वाद घालन्यात अर्थ नव्हता की त्यांच्यासोबत जाण्याशिवाय दुसरा कोणता पर्याय नव्हता. प्रश्न होता तो फक्त अपर्णाचा. तेवढ्यात तीच माझ्या कानात येऊन पुटपुटली, “वेलकम टू गडचिरोली… हे नक्किच नाना लोक आहेत, चल गपचूप.” संकटातसुद्धा काहीतरी पीजे मारून नाहीतर बकवास करून टेंशन कमी करायचे हा अपर्णाचा फंडा होता, पण या वेळी मात्र तिचा हा प्रयत्न खूप केविलवाणा भासत होता. कारण समोर काय उभे ठाकले आहे हे तिच्या चेहर्यावर दिसून येत होते.

त्या काळोखात गेस्टहाऊसच्या गोलाकार पायर्‍या उतरताना घट्ट पकडून ठेवलेल्या अपर्णाच्या हाताचा थंडगार स्पर्श मला जाणवत होता. खाली एक जीप आमची वाट बघत उभी होती. आम्ही जवळ पोहोचायच्या आधीच ईंजिन स्टार्ट करायचा आवाज झाला. खरेच त्यांच्याकडे टाईम नव्हता. त्या खाचखळग्यांनी भरलेल्या अंधारी रस्त्याने सुद्धा जीप सुसाट पळत होती. आम्हाला पाठीमागे बसविण्यात आले होते. समोर बसलेल्या दोघांची नजर सतत आमच्यावर रोखली होती. जणू काही चालत्या जीपमधून बाहेरच्या काळोखात उडी मारायचे धाडसच आम्ही करणार होतो. सुरुवातीला नक्की कुठे जात आहोत याचा अंदाजा घेण्याचा प्रयत्न केला पण मग तो सुद्धा सोडून दिला. फिरवून आम्हाला गेस्टहाऊसच्या मागच्या गल्लीत आणले असते तरी समजले नसते. सहजच मुंबई-पुण्याचे रिक्षावाले आठवले. नाही म्हणायला रस्त्यात दोन वेळा पाण्याचा खळखळाट जाणवला. पण गावच्या ठिकाणी असे नदी-नाले जागोजागी असतात. तसेही आमच्या डोळ्यांवर पट्टी बांधण्यात आली नव्हती, म्हणजे गुप्तता वगैरे बाळगण्याचे कष्ट त्यांनीही घेतले नव्हते. कदाचित आमची तोंडे कायमची बंद करण्याचा त्यांचा हेतू असावा. अंगावर सररकन शहारा आला. डोक्यातले विचारचक्र थांबायचे नाव घेत नव्हते पण सुमारे २०-२५ मिनिटांच्या प्रवासानंतर जीप मात्र थांबली.

जीपमधून उतरल्यावर आजूबाजूला पाहिले तर घनदाट जंगल. रस्ता नावाचा प्रकार सुद्धा नव्हता. इथपर्यंत आमची जीप आली कशी याचेच आश्चर्य वाटले. आता इथे आमचे एनकाऊंटर होणार बहुतेक. मनात आलेला विचार परत कसाबसा झटकून टाकला. तेवढ्यात एकाने मोबाईल वर फोन लावला. म्हणजे अजून BSNL नेटवर्कच्या हद्दीत होतो तर… त्यांचे फोनवर काय बोलणे झाले देवास ठाऊक, पण इथून पुढे चालतच जायचे होते. अजूनही ते लोक मला ‘साहब’ म्हणूनच हाक मारत होते आणि हीच काय ती दिलासा देणारी बाब होती.

चालताना पायाला खडे टोचू लागले तसे जाणवले की आपण तसेच स्लिपरवर आलो आहोत. दोघांचे मोबाईल, पैशाचे पाकिट, घड्याळ सारे काही रूमवरच सोडून आलो होतो. झोपायच्या आधी रोज घरी फोन करायचो. माझा फोन नाही बघून कदाचित आईने आज स्वता केला असेल, तो सुद्धा तसाच वाजत असेल. जास्त उशीर झाला तर त्या बिचारीला टेंशन येईल. आई आठवली तशी व्याकुळता आणखी वाढू लागली. कदाचित हेच हाल त्या अपर्णाचे झाले असतील. खरे म्हणजे या क्षणी मला खंबीर बनून तिला आधार देण्याची गरज होती. हातातील तिचा हात अलगद दाबून तिला नजरेने धीर द्यायचा प्रयत्न केला. त्या अंधारात सुद्दा तिचे डोळे रडवेले झालेले दिसले. दातांमध्ये खालचा ओठ दाबून कसाबसा तिने आलेला हुंदका टाळला. मगासपर्यंत मी मुकाट्याने जे घडतेय ते घडू देत होतो आणि जास्त विचार न करता पुढे काय होतेय याची वाट बघत होतो. पण आता मात्र काहीतरी विचार करायची गरज होती, नाहीतर कदाचित वेळ निघून जाणार होती. बरे ते आपसात काय बोलत होते त्यातील एका शब्दाचा अर्थ लागेल तर शप्पथ. त्यांचे सगळे संभाषण तेलगू मध्ये चालू होते. सिरोंचा हे महाराष्ट्र आणि आन्ध्रप्रदेशच्या सीमेवर येत असल्याने तेथील लोकांना हिन्दी, मराठी, तेलगू या तिन्ही भाषा बर्यापैकी अवगत असतात. त्यातील एकाला हिम्मत करून विचारले, “हम जा किधर रहे है, किनसे मिलना है, और कितनी देर लगेगी??” एका दमात २-३ प्रश्न विचारून टाकले. एवढ्या वेळच्या शांततेनंतर अचानक फुटलेल्या माझ्या वरच्या पट्टीतील आवाजाने क्षणभर अपर्णासुद्धा चपापली आणि मला नजरेनेच शांत राहायचा सल्ला दिला. पण त्यांची यावर काहीही प्रतिक्रिया नव्हती. हतबल झाल्यासारखे वाटत होते. अपर्णा बरोबर नसती तर खरेच वाट दिसेल तिथे वेड्यासारखा पळत सुटलो असतो. तेवढ्यात समोर एक घर दिसू लागले. आम्हाला बाहेर थांबायला सांगून दोघे जन आत गेले. गेस्ट हाऊसचा वॉचमन आणि मगासचा तो राकट दांडगट काळाकुट्ट धटिंगण आमच्याबरोबर बाहेरच थांबले होते. अचानक आतून कसल्यातरी झटापटीचा आवाज येऊ लागला. बघताबघता आवाज वाढू लागला आणि पाठीमागून एक अस्फुट किंकाळी… परत भयाण शांतता… आवाज मात्र नक्कीच ओळखीचा वाटत होता…

मगासचा एक माणूस बाहेर आला आणि इशार्‍यानेच आम्हाला आत बोलाविले. बरोबरचे दोघेजण बाहेरच रखवालीला थांबले. मी आणि अपर्णा आत गेलो. घर म्हणजे एकच मोठा हॉल होता. बाहेरून लक्षात आले नव्हते पण पुर्ण लाकडाचे स्ट्रक्चर होते. सिविल ईंजिनीअर तेही स्ट्रक्चरल डिझायनर असल्यामुळे कोणत्याही घरात प्रवेश केला की आधी त्याचे एका ईंजिनीअरच्या द्रुष्टीकोणातून निरीक्षण करायची सवय आहे मला, पण आज मात्र वेळ पडली तर इथून निसटायचे कसे हाच विचार डोक्यात होता. एवढ्या मोठया रूमला एकच दरवाजा होता, जिथून आम्ही आत आलो होतो आणि त्याच्या बाहेर देखील तो मगासचा धटिंगण उभा होता. नाही म्हणायला दोन बाजूने खिडक्या होत्या, पण त्यांच्यावरची जळमटे पाहता त्या वर्षानुवर्षे उघडल्या गेल्या नसाव्यात. रूमच्या मधोमध पंखा टांगतात तसे छतावरून वायर सोडून त्याला एक बल्ब लटकवला होता. तोही जेमतेम प्रकाशाचा. त्याच्या भोवती फिरणार्‍या रातकिड्यांच्या सावल्यांमुळे रूममधील प्रकाश आणखी निस्तेज वाटत होता. तेव्हढ्यात एका कोपर्‍यातून कण्हन्याचा आवाज आला. पाहताच छातीत धडकी भरली. तो अजय पोटे होता. माझ्याबरोबरच सिलेक्ट झालेल्यांपैकी एक. अंगाचे मुटकुळे करून पडला होता. मगाशी जो झटापटीचा आवाज ऐकू आला होता त्याचे कारण हे होते तर. त्याच्याजागी मी आता स्वताला बघू लागलो होतो. कदाचित माझे पण थोड्यावेळात हेच हाल होणार होते. पण मग अपर्णाचे काय… सगळे विचार परत फिरून फिरून अपर्णावर येउन थांबत होते.

समोरून आलेल्या आवाजाने भानावर आलो. रूममध्ये आणखी एक माणूस होता. कदाचित त्यांचा म्होरक्या असावा. मला त्याच्यासमोरच्या खुर्चीवर बसायला सांगितले. मुकाट्याने बसलो. हॉट सीट की काय ते यालाच बोलत असावेत. अपर्णा माझा खांदा पकडून माझ्या मागे उभी राहिली. म्होरक्याने इशारा करताच त्याच्या दोन साथीदारांपैकी एक जन बाहेर गेला तर दुसरा माझ्या उजव्या बाजूला येउन उभा राहिला. आणि मग प्रश्नोत्तरांचा राऊंड सुरू झाला..

“नाव?”

“अभिषेक…, अभिषेक नाईक”

“आणि ही कोण, बायको का?”

“नाही, मैत्रीण आहे माझी”

“मग इथे कशाला घेउन आलास?”

“असेच, सहज, फिरायला म्हणून.”

“फिरायला.” एक छद्मी हास्य..

“मग तू कशाला आला आहेस?”

“कशाला म्हणजे..? परिक्षा पास झालो आणि इथे सिरोंचाला पोस्टींग झाली, सहाय्यक अभियंता म्हणून…”

वाक्य पुरे होते ना होतेच तो खेकसला, “ज्यादा हुशारी करू नकोस # # #, नाहीतर तुझे पण तेच हाल करेन जे तुझ्या साथीदाराचे केले आहे”

गेले दोन दिवस जे साहेब साहेब ऐकायची सवय झाली होती त्याची धुंदी क्षणात उतरली.

तो अजय पोटे बद्दल बोलत होता, पण तो माझा नक्की कसला साथीदार होता, कालच तर ओळख झाली होती आमची.

तेव्हढ्यात तो परत गरजला, “बोल पटपट चल.., आणि कोण कोण आहेत तुमच्यात? आणि कसली खबर काढायला आला आहात?”

कदाचित तो मला सरकारी खबरी समजत असावा. पण आता मी तो नाही आहे हे त्याला मी कसे समजवणार होतो हे मला समजेनासे झाले. एखादी गोष्ट आपण आहोत हे समजवू शकतो, सिद्ध करू शकतो, पण नाही आहोत हे कसे समोरच्याला पटवायचे. बरे पटविले तरी पुढे काय? इथून सुटका? छे… ती त्याही परिस्थितीत शक्य नव्हती. असेही मरायचे होते आणि तसेही मरणारच होतो. मांजरीचे पळायचे सगळे रस्ते बंद झाल्यावर जसे तिच्यात लपलेली वाघीण बाहेर पडते आणि प्रतिहल्ला करते तसेच काहीसे माझे झाले. अचानक माझ्या आवाजात देखील जोर आला.

“मला काही माहित नाही तुम्ही काय बोलत आहात, मी कोणाचा खबरी-बिबरी नाही आहे. असतो तर एकटा आलो असतो, बरोबर हिला आणले नसते, प्लीझ आम्हाला जाउ द्या. आम्ही कोणाला तुमच्याबद्दल सांगणार नाही…” एवढे बोलून मी खुर्चीतून उठायला गेलो तोच बाजुच्या इसमाने एक थाडकन लाथ मारली कि मी खुर्चीसकट कोलमडलो. मी पडलो तसा तो आणखी पुढे सरसावला. कदाचित आणखी एक लाथ पडणार होती माझ्या पेकाटात. हे बघून अपर्णा त्याच्या अंगावर झेपावली. तिचा काय निभाव लागणार होता म्हणा त्याच्यासमोर, त्याने तिलाही झटकून दिले. पण त्यामुळे मला जरा सावरायला वेळ मिळाला. रागाच्या भरात मी खुर्ची उचलून त्याला मारायला गेलो तोच उजव्या हातातून एक सनक गेली. मगाशी त्या गुंडाने मारलेली लाथ हाताच्या कोपरावर बसली होती. ती संधी साधून त्याने माझी खुर्ची हवेतच पकडली आणि खेचून घ्यायचा प्रयत्न केला. आमची झटापट बघून त्यांच्या म्होरक्याने माझ्यावर पिस्तोल रोखले. आयुष्यात कधी विचार देखील केला नव्हता अश्या एका प्रसंगाला प्रत्यक्षात सामोरे जात होतो. स्वताकडे अशी पिस्तोल रोखलेली बघून खरे तर माझी गाळण उडायला हवी होती, पण जशी ती पाहिली तशी हातातील खुर्ची त्या म्होरक्याच्या अंगावर फेकायचा प्रयत्न केला. खुर्चीला दुसर्या बाजुने त्या गुंडाने पकडले असल्याने ती कुठे फेकली तर गेली नाही पण हवेतल्या हवेत डाव्या बाजुला कलंडली आणि खळकन आवाज होऊन सार्‍या रूम मध्ये अंधार पसरला.

हे सारे अनपेक्षित आणि नकळतपणे घडले होते. पण झालेल्या अंधाराचा फायदा घेणे गरजेचे होते, आणि तो सुद्धा लगेच. कारण मगाशी मी या लोकांना मोबाईलवर बोलताना पाहिले होते. कदाचित ते याच म्होरक्याशी बोलत असावेत. म्हणजे इथे यांच्याकडे मोबाईल नक्की असणार. एवढ्याश्या खोलीत आम्हाला हुडकून काढण्यासाठी त्या मोबाईलचा प्रकाशसुद्धा पुरेसा होता. म्हणून इथून त्वरीत बाहेर पडने गरजेचे होते. पण बाहेर तो मगासचा धटिंगण आणि त्याचा एखाद दुसरा साथीदार अजून असणार होतेच. कदाचित ते जवळ नसावेत किंवा आत काय घडले आहे याची त्यांना कल्पना नसावी. कारण बल्ब फुटण्याच्या आवाजाव्यतिरिक्त कोणताही मोठा आवाज झाला नव्हता. रूमला दरवाजा देखील एकच होता. आणि त्याच दिशेला कुठेतरी वाटेत एक गुंड उभा होता. तेही हातात खुर्ची घेउन. कारण ती खुर्ची कुठे पडल्याचा आवाज ऐकू आला नव्हता. बल्ब फुटल्याफुटल्या मी ती खुर्ची सोडून अपर्णाचा हात पकडला होता. या अंधारात सर्वात महत्वाचे होते ते आमची चुकामूक न होऊ देणे. आणि आता तिला घेउनच या रूमच्या बाहेर पडायचे होते.
पुढील घटनाक्रम फार वेगाने घडला. समोरच्या गुंडाच्या पोझिशनचा अंदाजा घेउन सरळ त्यालाच जोरात धडक मारली, आणि होती नव्हती तेवढी ताकद काढून एकाच हाताने त्याला ढकलून दिले. तो सुद्धा अपेक्षेपेक्षा जास्त कोलमडला आणि कदाचित त्याच्या म्होरक्यावर जाउन पडला असावा. कारण त्या दोघांचे धडपडण्याचे आवाज ऐकू आले. कदाचित अंधारामध्ये चाचपडत आधार शोधण्याच्या मानसिकतेमुळे आपल्या शरीराचा बॅलन्स वीक होत असावा, त्यांचे तसेच झाले असावे, नाहीतर त्यांना असे धक्का देऊन पाडणे माझ्या आवाक्यातली गोष्ट नव्हती. पण हीच संधी होती, अपर्णाला घेऊन सुसाट बाहेर पळालो.

पण ऊफ्फ… दरवाज्याबाहेर पडतो ना पडतो तोच कोणालातरी धडकलो. ज्याला धडकलो त्याची शरीरयष्टी पाहता नक्कीच हा तो धटींगणच होता. नाक क्षणभर सुन्न झाल्यासारखे वाटले. अपर्णाचा हात सुद्धा हातातून सुटला. त्याने मला घट्ट पकडून ठेवले. याच्याशी आता झगडून फायदा नव्हता, म्हणून मी सुद्धा माझ्यापरीने त्याला पकडून ठेवले आणि जोरात अपर्णाला “पळ इथून, मी येतो मागून” असे ओरडलो. पुढची १५-२० सेकंद मी, अपर्णा माझा विचार न करता पळावी म्हणून ओरडत होतो. चांदण्याच्या प्रकाशात तिची सावली धावताना दिसली. तेवढ्यात समोरून आणखी एक जन धावत आला. त्याने अपर्णा पळाल्याच्या दिशेने टॉर्च मारला, पण त्याचा जेमतेम प्रकाश जवळच्या दोन झाडांना भेदून फार पलीकडे जाऊ शकला नाही. थोड्यावेळासाठी मी त्या दिशेने एकटक बघत बसलो. कधीकधी एखादी व्यक्ती केवळ सोबत म्हणून आपल्याबरोबर असते, पण नकळत तिची साथ आपल्याला किती आधार देत असते हे ती नजरेपलीकडे गेल्यावरच समजते. आता त्या लोकांच्या तावडीत मी एकटाच होतो.

मला परत आत नेउन खुर्चीला बांधून ठेवण्यात आले. जाताना माझ्या पोटात एक जोरदार गुद्दा लगावायला ते विसरले नाहीत. बाहेरून कडी लावण्याचा आवाज ऐकू आला. आता बाहेर नक्की किती जन होते की एकही नाही हे कळायला मार्ग नव्हता. मी तसाच बाहेरून काही आवाज येतो का याची चाहूल घेत बसून होतो, पण रातकिड्यांच्या किर्रर शिवाय आणखी कसलाच आवाज नव्हता. अंग जाम दुखत होते. एवढा वेळ त्याकडे लक्ष नव्हते पण आता जाणवू लागले होते. यापुढे आणखी मार खायची जराही इच्छा नव्हती. त्यापेक्षा सरळ गोळी खाऊन मरणे परवडले असे वाटू लागले. त्यातच डोक्यात अपर्णाचा सुद्धा विचार होताच. कुठे गेली असेल, कशी असेल, हे लोक तिच्या मागावर तर गेले नसतील, आणि सापडलीच त्यांच्या तावडीत तर तिला इथे परत घेउन येथील की तिथेच तिचे काही बरेवाईट करतील.

जवळपास अर्ध्या तासाने कडी उघडण्याचा आवाज ऐकू आला. वाटले तेच आले परत, पण बघतो तर ती अपर्णा होती. मला वाटले पण नव्हते की ही वेडी इथेच कुठे तरी दडून बसली असेल आणि अशी मला सोडवायला परत येईल.

पण आली…..

आणि फसली….

तिच्या पाठोपाठच आणखी दोन जन आत शिरले. कदाचित जवळपासच असावेत त्यामुळे चाहूल लागताच हजर झाले.

“चलो साहब, यहासे निकलना है.” यावेळी त्यांचा आवाज बर्‍यापैकी मवाळ होता. पण पुढे काय वाढून ठेवले होते देवास ठाऊक. गपगुमान त्यांच्यामागून निघालो. बाहेर त्यांचा म्होरक्या आणखी एका साथीदारासोबत उभा होता. त्यांच्यात काय बोलणे झाले समजले नाही. कदाचित तेलगू भाषेत असावे पण मग आम्हाला घराच्या मागच्या बाजूला नेण्यात आले. तिथे आणखी एक गाडी उभी होती. बहुधा मधला वेळ ते याच गाडीत बसले असावेत जे नेमके अपर्णाच्या पाठोपाठ हजर झाले. परत आमचा गाडीचा प्रवास सुरू झाला. त्या घनदाट जंगलातूनसुद्धा तो ड्रायव्हर इतक्या सराईतपणे गाडी चालवत होता की जणू एखादा अदृष्य रस्ता त्यालाच काय तो दिसत होता. पंधरा-वीस मिनिटांच्या प्रवासाने आम्ही एका गोदामाच्या जवळ पोहोचलो. आम्हाला आत नेण्यात आले. लाकडाची मोठी वखार दिसत होती. इथे मात्र बरेच जन होते. आम्ही आलो तरी त्यांची आपापली कामे चालूच होती. लाकडाच्या तस्करीबद्दल ऐकून होतो, कदाचित हा त्यातीलच प्रकार असावा. पण आता इथून निसटणे सोपे नव्हते हे समजून चुकलो. तरीही इथे मगासच्या अंधार्‍या आणि कोंदट वातावरणापेक्षा बरे वाटत होते. गोदाम बरेच मोठे आणि पुरेसे प्रकाशित होते. आम्हाला एका माणसासमोर नेऊन उभे केले. कदाचित हा त्या सर्वांचा बॉस असावा. “फिलहाल अंदर के रूम मे डाल दो. सुबह देखेंगे इनका क्या करना है.” त्याची अशी ऑर्डर मिळताच आमची रवानगी आतल्या रूम मध्ये झाली. रूम कसली, चार बाय सहाची काळकोठरीच होती ती. जेमतेम दोन माणसे पाय पसरू शकतील एवढी जागा. दार जसे बंद करून घेतले तसा पूर्ण काळोख झाला. दरवाजाच्या फटीतून काय तो तेवढा प्रकाश आत येत होता. थोडावेळ आम्ही तिथेच पाय दुमडून बसून राहिलो. पण झोपेचा अंमल जाणवू लागला होता. हळूहळू पाय पसरले आणि कसेबसे आडवे झालो. दाराला कान लावून बाहेर काय चालू आहे याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण छे.. काहीच समजत नव्हते. बघताबघता कधी डोळा लागला समजलेच नाही.

पहाटे कधीतरी जाग आली, बर्‍यापैकी प्रकाश आत आला होता. पाहतो तर त्या छोट्याश्या अडगळीच्या रूमला देखील वरच्या बाजूला एक बर्‍यापैकी मोठी खिडकी होती, ज्यातून आम्ही आरामात बाहेर सटकू शकत होतो. अचानक सुटकेचा मार्ग दिसल्याने झोप उडून गेली. ऊडी मारून त्या खिडकीचा खालचा काठ पकडला, आणि अंग वर खेचून घेउन कसेबसे डोके बाहेर काढून काही दिसते का याचा अंदाज घेउ लागलो. पण बघता क्षणीच निराशा झाली. कारण सगळा पाणथळीचा भाग दिसत होता. आजूबाजूला बरीच चिखल की दलदल पसरली होती. म्हणजे खिडकीतून उडी टाकायचो आणि सरळ चार फ़ूट आत जाऊन रुतायचो. निराश होऊन खाली उतरलो. अपर्णा अजून तशीच झोपली होती. तिला उठवायची इच्छा नाही झाली. तसाच दाराला कान लावून बसून राहिलो. थोड्याच वेळात दार उघडले गेले. आम्हाला बाहेर काढले. काल रात्रीचा बॉस आपल्या सहकार्‍यांशी बोलत समोर उभा होता. इथेही संभाषण तेलगू भाषेतून, त्यामुळे यावेळी सुद्धा काही समजण्यास मार्ग नव्हता. तेवढ्यात बाजूच्या टेबलवर नजर गेली. बघतो तर एक गावठी कट्टा म्हणजेच एक पिस्तोल होते. सहज उचलले. आत गोळ्या होत्या की नाही हे माहीत नव्हते. त्यामुळे समोरच्यांवर रोखून धरू की नको हे ही समजत नव्हते. तितक्यात समोरील एकाची नजर माझ्यावर पडली. त्याने द्या ती इकडे बोलत हात पुढे केला आणि मी सुद्धा पुढे आलेल्या हातावर जसा अलगद प्रसाद ठेवतात तितक्याच सहजपणे ती त्याला सुपुर्त केली. अपर्णाने माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले. असा काय हा मेंगळटसारखा वागला, असा भाव तिच्या चेहर्‍यावर होता. पण खरेच असतीही गोळी त्या बंदूकीत तरी पुढे काय, ती ताणून धरून त्या मातब्बर लोकांच्या तावडीतून फरार होने ही हिन्दी सिनेमात दाखवितात तेवढी सोपी गोष्ट नव्हती.

आम्हाला परत तेथून हलविण्याचे ठरले. पण यावेळी मात्र आमच्या दोघांच्या डोळ्याला पट्टी बांधली गेली. एव्हाना गाडीतून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी फ़िरायची आम्हाला सवय झाली होती, पण यावेळी मात्र निर्वाणीची वेळ जवळ आल्यासारखे वाटत होते. गाडी सुरू झाली. डोक्यातले सर्व विचार थांबवून आता फ़क्त देवाचे नाव घेत होतो. १०-१५ मिनिटांच्या प्रवासानंतर अपर्णाला त्रास होऊ लागला, तसे त्यांना गाडी थांबवायची विनंती केली. अपर्णाला उलटी होत होती, म्हणून थोड्यावेळासाठी गाडी थांबवून आम्हाला दोघाना मोकळे केले. आम्ही एका कच्च्या रस्त्यावर होतो, म्हणजे निदान जंगल तरी मागे सोडून आलो होतो. अपर्णाचा उलटीचा कार्यक्रम आटपला तसे परत आमचे हात आणि डोळे बांधण्यात आले. हा प्रवास शेवटचा आहे असे काहीसे स्ट्रॉंग फीलींग येत होते आतून पण नक्की सुटकेचा आहे की आमच्या शेवटाच्या दिशेने आहे हे समजत नव्हते. आणि समजत नव्हते ते त्यांची आपापसातील भाषा. सिरोंचामध्ये नक्षलवादी भागात टिकायचे असेल तर कसे वागावे याच्या शंभर सूचना ऐकून आलो होतो, पण एक मात्र मी स्वताहून समजलो होतो ते म्हणजे इथे तेलगू भाषा येणे गरजेचे होते. जीपमध्ये बसल्याबसल्या परत डोळा लागला, पण थोड्याच वेळात जीप अचानक थांबली. आम्हा दोघाना बाहेर खेचून काढण्यात आले आणि काही समजायच्या आतच धडाधड गोळ्या मारण्यात आल्या. अश्याच काहिश्या स्वप्नाने खाडकन झोप उडाली तो खरेच जीप थांबली होती. डोळे आणि हात बांधलेल्या स्थितीतच आम्हाला बाहेर काढण्यात आले. नेऊन एका बाकड्यावर बसविण्यात आले. तिथून सुद्धा आणखी कुठे उठून जाऊ नये म्हणून आमचे पाय बाकड्याच्या पायाला बांधून टाकले. तोंडात रुमालाचा बोळा कोंबला गेला. आणि मग ते तिथून निघून गेले. आता नक्की कुठच्या जंगलात कुठल्या झोपडीत आम्हाला बांधून ठेवले होते हे कळायला काही मार्ग नव्हता. त्याही अवस्थेत आम्ही दोघानी एकमेकाना ऊंह उंह करून मी अजून पर्यंत तरी सहीसलामत आहे आणि इथेच तुझ्याजवळ आहे याची जाणीव करून दिली.

जवळपास तासभर आम्ही त्या अवस्थेत होतो. एव्हाना बर्यापैकी उजाडले असावा हा अंदाज आणि जर कुठे आडवाटेला नसू तर कोणीतरी सोडवायला येईन ही आशा. आणि खरेच कोणाचीतरी चाहूल लागली. आम्हाला सोडविण्यात आले. डोळ्यावरची पट्टी काढून बघतो तर धक्काच बसला. आम्हाला बांधून ठेवली ती जागा दुसरीतिसरी कोणती नसून आमचेच बांधकाम विभागाचे ऑफिस होते. बाहेरच्या बाकड्यावरच आम्हाला बांधून ठेवण्यात आले होते. ज्यांनी आम्हाला सोडवले ती आमच्याच डिपार्टमेंटची माणसे होती. त्यांना मी माझी ओळख पटवून दिली. झालेल्या प्रकाराची कोणासमोरही वाच्यता करणे योग्य नव्हतेच, म्हणून आम्ही त्वरीत गेस्टहाऊसवर गेलो आणि सामानाची बांधाबांध सुरू केली. इथून शक्य तितक्या लवकर आलापल्लीला परतने गरजेचे होते. तिथून चन्द्रपूर आणि पुढे मुंबई. मनात फक्त परतीचे विचार चालू होते. कोणाला भेटायचे नव्हते की कोणाला काही सांगायचे नव्हते. पण अचानक अजय पोटे आठवला. त्याचे काय झाले असेल? तो अजूनही त्यांच्या तावडीत असेल का? की तो खरेच खबरी तर नसेल? काही का असेना त्याच्या सुटकेसाठी कोणालातरी जे घडले ते सांगणे गरजेचे होते. पण कोणाला? विश्वास ठेवायचा तरी कोणावर? शेवटी जमलेच तर त्याला मदत होईल असे काही करायचे पण उगाच आता स्वताचा आणि अपर्णाचा जीव आणखी धोक्यात घालायचा नाही या निष्कर्शाप्रत आलो.

घड्याळात वेळ चेक केली, आतासे सकाळचे साडेआठ वाजले होते. पटापट सामानाची आवराआवर करून नऊ पर्यंत बसस्टॅण्ड गाठले. तिथून आलापल्लीला जाणारी बस पकडणार होतो पण एक प्रायवेट गाडीवाला थेट चंद्रपूरला सोडायला तयार झाला, अर्थात जादा पैसे घेऊनच.. पण पैश्याचे मोल होते कोणाला त्यावेळी. सिरोंचा ते चंद्रपूर सुमारे ५ तासांचा प्रवास होता. मध्ये एका ठिकाणी चहापानासाठी गाडी थांबविली तसे पाटीलसाहेबाना (Asst. Eng. Alapalli) फोन लावला आणि जे जे घडले ते सारे कथन केले. त्यांच्याकडून जे समजले ते खरेच धक्कादायक होते. त्यांचे नक्षलवाद्यांशी काय धागेदोरे होते की नाही ते त्यानाच ठाऊक पण हे असे काही घडणार याची त्यांना आधीच कल्पना होती. नवीन जॉईन झालेल्यांपैकी एक जन आपली खबर काढण्यासाठी आला आहे अशी बातमी नक्षलवाद्यांना लागली होती आणि त्याला ते संपवणार हे पाटील साहेबांना माहीत होते. बाकी तो कोण होता हे खुद्द पाटील साहेबांनासुद्धा माहीत नसल्याने त्यानी मला कोणतीही आगाऊ सूचना देउन सावध केले नव्हते, अर्थात याबद्दल आता ते माझी माफी मागत होते. त्यांच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता. अजय पोटेचे काय झाले असेल हे पण मनातून काढून टाकले. त्याचे भविष्य तो स्वताच घेऊन आला होता. परत गाडीत येऊन बसलो. मनात आता कोणताही अनुत्तरीत प्रश्न उरला नव्हता. खर्या अर्थाने मला परतीचे वेध लागले होते.

अपर्णाने काय झाले असे नजरेनेच विचारले. उत्तरादाखल फक्त हसलो आणि तिला अलगद थोपटले. परतीचा प्रवास सुरू झाला होता. बरोबर साथीला होता तो एक कधीही विसरला जाणार नाही असा अनुभव आणि कधीही गमवायचा नाही असा एक जोडीदार, अपर्णाच्या रूपात…
-x- समाप्त -x-
——————————————————————————————–

कथेतील सर्व पात्र, घटना काल्पनिक आहेत. त्याचा कुठल्याही जिवीत अथवा मृत व्यक्तीशी सार्धम्य आढळल्यास तो योगायोग समजावा.
…Tumcha ABHISHEK